Home Blog Page 232

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांचा प्लास्टिक हद्दपार करण्याचा वसा…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे.

प्लास्टिकचा कचरा हा राज्यात सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. प्लास्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. माणसाप्रमाणेच प्राणी आणि जलचर यांच्यासोबत सुपीक जमीन नापीक करीत आहे. प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरणप्रेमी आणि ‘राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार श्री.अवधुत सावंत’ हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्लास्टिक होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करून टन च्या हिशोबात प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्या कारवाई करत त्यातून महापालिकेला आर्थिकदृष्ट्या महसूल मिळवून देत अनेक वर्षांपासून लढा देत होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. प्लास्टिक वापरण्याची सवय जुनी असल्याने ती लागलीच सुटणे तसे कठीणचं होते. त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापरण्यावर कारवाई सुरू झाली की, फक्त पिशवी गायब होते.

पण नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याची सवय लागावी, यासाठी ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते ह्या काम करीत आहेत. त्यांच्या या कामात त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेचीही साथ मिळाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘शून्य कचरा’ मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये सोसायटीतून येणारा ओला कचरा व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे ‘ड्राईव्ह’ केले आहेत. त्या ‘ड्राईव्ह’नुसार नागरिक आपल्या घरातील वस्तू आणून महापालिकेकडे जमा करतात. त्यामध्ये घरातील जुने कपडेही गोळा केले जातात. याशिवाय महापालिकेने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रमही सुद्धा सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत घरातील जुने पण वापरण्याजोगे कपडे नागरिकांनी महापालिकेच्या उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीजवळ आणून द्यायचे आहेत. शहरातील गरजू व्यक्ती यातील काही कपडे घेऊन जातात. उर्वरित कपडे महापालिका ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेला देते. या संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते या बचतगटदेखील चालवितात. या बचतगटातील महिला महापालिकेकडून आलेले कपडे धुवून घेतात. त्यांना सॅनिटाईझ केले जाते. त्यानंतर त्या कपड्यापासून कापडी पिशवी बनविली जाते. कापडी पिशवी बनविण्याच्या या उपक्रमामुळे बचतगटातील ४५ महिलांना काम मिळाले आहे. या पिशव्या बाजारात पाच रूपये किंमतीने विकल्या जातात. या महिला महिन्याला १५ हजार पिशव्या तयार करतात. एक पिशवी शिवण्यासाठी त्यांना अडीच रूपये मिळतात. पण जुन्या कपड्याच्या पिशव्या तयार करताना मेहनत जास्त लागत असल्याचे ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते सांगतात.

स्वाती यांचे बालपण मुंबईतील घाटकोपर या परिसरात गेले. त्यांचे शिक्षण हे घाटकोपर येथील मराठा विद्यामंदिर या शाळेत झाले. त्यानंतर ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी झाल्यानंतर त्यांनी लगेचच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचे २००५ मध्ये लग्न झाले आणि त्या कांजूरमार्ग येथे राहायला आल्या. २००८ मध्ये त्या डोंबिवलीकर झाल्या. डोंबिवलीत आल्यानंतर आपोआपच त्या सामाजिक कार्याकडे ओढल्या गेल्या. त्याकाळात बचतगटही मोठ्या जोमात चालत होते. त्यामुळे आपणही बचतगटाची स्थापना करावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार २०१२ मध्ये त्यांनी बचतगटाची स्थापनाही केली. ‘एकता बचतगट’ त्यांनी सर्वप्रथम स्थापन केला. त्यातून अनेक योजना राबवित गेले.

विधवा पेन्शन योजना, महाराष्ट्र घरेलु महिला कामगार नोंदणी असे विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. महाराष्ट्र घरेलु कामगार महिला नोंदणीतून त्यांनी १८०० ते २००० महिलांची नोंदणी केली आहे. २०१६ मध्ये ५५ वर्षांवरील २५० महिलांना त्यांनी दहा-दहा हजार रुपये मिळवून दिले होते. ५६ विधवा महिलांसाठी पेन्शन योजना राबविली होती. तरुण मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये ३०० ते ४०० तरूणांना नोकरी मिळाली. एक बचतगट स्थापन करून स्वाती मोहिते ह्या तेवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी ८० ते ९० बचतगटांची स्थापना केली. त्या बचतगटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली. महिलांना केवळ काम मिळवून दिले नाही तर व्यवसाय उभाह करण्यासाठी लागणारे कर्जही उपलब्ध करून दिले. ब्युटीपार्लर कोर्सचे प्रशिक्षणही महिलांना दिले. ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्था बचतगटाच्या माध्यमातून ज्या कापडी पिशव्या बनवितात त्या फेरीवाल्यांना दिल्या जातात.

या कामात त्यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नवीन कपड्यांच्याही पिशव्या या बचतगटातील महिला बनवितात. त्या पिशव्या दहा रूपयाला बाजारात विकल्या जातात. ‘लॉकडाऊन’च्या काळात घर कामगार महिलांच्या खात्यात सरकारतर्फे दीड हजार रूपये जमा करण्यात येणार होते. ती रक्कम महिलांना मिळावी याकरिता अर्ज भरण्याचे कामही स्वाती यांनी बचतगटांच्या माध्यमातून केले आहे. यामध्ये १८०० महिला लाभार्थी आहेत. त्यापैकी २७५ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. १५० महिलांना त्यांचा लाभही मिळाला आहे. महिला या सक्षम आहेत, त्यांना सबल करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे महिलांना सबल करणे, हेच आमचे पुढील उद्दिष्ट असल्याचे स्वाती मोहिते प्रसिद्धी माध्यमांना सांगतात.

घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या,आपले शहर स्वच्छ राहावे म्हणून स्वच्छतादूत म्हणून काम करणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन्मान देऊन गौरविले आहे. या व्यतिरिक्तही अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. अशा निरलस जनसेवा करणार्‍या आणि महिलांना सबल करण्यासाठी झटणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी ‘राष्ट्रीय पदक’ विजेत्या पत्रकार अवधुत सावंत यांच्याकडून जाहीर रित्या भरभरून शुभेच्छा.

लसीकरण झाले नसल्याने धोका असल्याचे मत; त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची अनुकूलता नाही..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान १८ वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली

शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेऊन यामध्ये आतापर्यंतच्या डेटावरून राज्यातील सुमारे ८५ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

शाळा सुरू करण्याबाबत ८५ टक्के पालकांचा होकार; शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर..

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्यात शाळा सुरु करण्यासाठी अनुकूल नाहीत त्यामुळे राज्यात शालेय शिक्षण विभाग तयारी करत असले तरी शाळा सुरु करू नयेय, असे मत खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोंदवले आहे. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. अशातच तिसरी लाटही तोंडावर आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास स्वतः मी तरी अनुकूल नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा १५ जुलै पासून सुरु होणार !

राज्यात बाहेरुन येणाऱ्यांसाठी ४८ तासांच्या आतील कोरोना आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा
आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात प्रवेश करताना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना ४८ तासांची मुदत असलेला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यांना मात्र राज्यात प्रवेश मिळणार आहे. आज जालनामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

नियमांचे उल्लंघन करणारे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत सध्या कोवीड ३ अंतर्गत निर्बंध लागू असूनही गेल्या काही दिवसांपासून त्याचे उल्लंघन सुरूच होते. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाने कोवीड नियम उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार आणि दुकानांवर कारवाई केली.

कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रात लेव्हल ३ अंर्तगत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असून अत्यावश्यक नसणारी दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कारवाई केली. तर कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रभागामधील फेरीवाल्यांवरही कारवाई करत हे फेरीवाले हटवण्यात आले.

तर दुपारी ४ नंतरही नियमांचे उल्लंघन करून कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील हॅाटेल दिपक, दिक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदिश पॅलेस बार, साई पूजा बार सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने ते सील करण्यात आले. जे प्रभागामधील पुना लिंक रोडवरील सिरॅमिकची दुकाने, मोमीन टेलीकॅाम आदी दुकानेही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आली.

त्याचसोबत सार्वजनिक मैदाने, बगीचे येथे सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवणे आवश्यक आहे. तथापी त्यानंतरही अशा ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात आले. ही कारवाई यापूढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

ईडीच्या ‘पीडा’ सोसल्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांचे मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच आगमन; ‘शिवसंपर्क अभियाना’ ची केली सुरुवात!

भाईंदर – ईडीच्या पीडा सोसल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरात दिसले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्या पासून जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रताप सरनाईक भूमिगत झाल्यासारखे गायब झाले होते.
आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून ‘शिवसंपर्क अभियाना’चा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरावासियां करिता आपल्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स आणि २ मोक्ष रथ या दोन वाहनांच्या चाव्या महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
१२ जुलै ते २४ जुलै या काळात महाराष्ट्र राज्यात शिवसेनेकडून ‘शिवसंपर्क अभियान’ राबवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचा शुभारंभ आज मीरा-भाईंदर शहरात झाला असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाचे लोकार्पण भाईंदरमध्ये करण्यात आले. मीरा-भाईंदर शहराला या कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाची सुविधा २४ तास मोफत मिळणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचे मीरा-भाईंदरमधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाच्या चाव्या सुपूर्द केल्या.

कोरोना साथरोगाच्या पहिल्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य आणि आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. अनेक आरोग्य विषयक उपक्रम त्यांच्याकडून सातत्याने राबवले जात होत्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कठीण प्रसंगी मात्र सेनेचे आमदार प्रताप सरनाईक शहरात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विषयी जी काही माहिती मिळत होती ती प्रसार माध्यमांकडूनच मिळत होती. मात्र आज अनेक दिवसां नंतर आज मीरा भाईंदर शहरात त्यांचे आगमन झाले आणि त्यांच्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व २ मोक्ष रथ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यासाठी जवळपास १ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या कार्डियाक ऍम्ब्युलन्स अत्याधुनिक असून त्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे. रुग्णाला घेऊन एखाद्या ठिकाणाहून हॉस्पिटलपर्यंत जाताना कार्डियाक ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुविधाही असणार आहे. त्यात एक डॉक्टर नर्स यांची बसण्याची सोय, ऑक्सिजन सुविधा व आवश्यक त्या इतर आरोग्य सुविधा आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघात मीरा भाईंदर शहरात ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स विनामूल्य लोकांना सेवा देणार आहे. त्याचा गरजू रुग्णांना आधार होईल.

मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी ‘मोक्ष रथ’

शहरातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पार्थिव शरीर तिरडीवर स्मशानभूमीपर्यंत अनेक लोक नेत नाहीत, पार्थिव नेण्यासाठी वाहन उपलब्ध करावे लागते. अनेक वेळा महापालिकेची शववाहिनी उपलब्ध होतेच असे नाही व अनेकदा लोकांची गैरसोय होते. शहरात स्मशानभूमी दूर असल्यास मृताचे नातेवाईक व मित्रपरिवाराला तिथे चालत जाणे शक्य नसते. उन्हाळ्यात पावसाळयात अंत्ययात्रा चालत नेणे शक्य होत नाही. नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिरडीवर मृतदेह न नेता अंत्ययात्रा वाहनात मृतदेह स्मशानात नेले जातात. त्यामुळे नागरिकांची हि गरज ध्यानात ठेऊन हा अत्याधुनिक ‘मोक्ष रथ’ तयार करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरात मोक्ष रथ २४ तास विनामूल्य सेवा देणार आहे.
त्याचबरोबर अनेकदा एखाद्याचे पार्थिव दूरवर आपल्या गावी अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असते. त्यासाठी या मोक्ष रथात पार्थिव शरीर ठेवण्यासाठी बर्फ पेटी म्हणजेच ‘शीत शवपेटी’ याचीही सोय करून देण्यात आली आहे. त्याचा गरजेच्या वेळी लोकांना नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क अभियाना’ ची सुरुवात!

शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ आजपासून सुरू झाले असून हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. जनतेची अधिकाधिक सेवा व कामे करा, आरोग्य सुविधा लोकांना मिळवून द्या, असे आदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कटिबद्ध असून आम्ही आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, आणखी काही उपक्रम लवकरच सुरु करू, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी ईडीची जी चौकशी सुरू आहे त्याबद्दल मात्र त्यांनी काहीही बोलणे टाळले आहे.

 

राजकीय हस्तक्षेपाची लागण आणि लसीकरणाला नियोजन शून्यता..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाची राजकीय यंत्रणा नियोजनाच्या (Planning) बाबतीत उजवी असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या (Implementation) बाबतीत मात्र बहुतांश वेळेला माती खाते हा आजवरचा भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे.

कोरोना आपत्तीमुळे नागरिकांसमोर विविध प्रकारचे आव्हाने आहेतच आता त्यात भर पडते आहे ती लस मिळवण्याच्या आव्हानाची.

सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे नियोजनाच्या बाबतीत भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्था उजवी मानली जात असली तरी लसीकरणाच्या बाबतीत मात्र नियोजनात देखील ती अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. अन्य देश लस उपलब्ध होण्याच्या आधीच लसीकरणाचे नियोजन करत होते, तेव्हा भारत मात्र टाळेबंदी या एकमेव उपयाची दवंडी पिटत होता. भारताला जाग आली ती अगदी या वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हापासून आजपर्यंत लसीकरण मोहीम नागरिकाभिमुख होऊ शकलेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नियोजनशून्यतेचा संपूर्ण पणे दिसून येणारा अभाव.

अंमलबजावणी पातळीवर अभ्यासपूर्ण नियोजन निकडीचे

भारताची लोकसंख्या व उपलब्ध होणारी लसीची मात्रा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे हे नाकारता येणार नाही. अशा प्रकारची तफावत स्वभाविक आहे. कारण लसीचे उत्पादन हे मर्यादित स्वरूपाचे आहे. मागणी आणि पुरवठा यातील विसंगतीमुळे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, खेदाची गोष्ट ही आहे की त्याचादेखील तुटवडा आहे. राजकीय व प्रशासकीय यंत्रणा दैनंदिन पातळीवर येणाऱ्या या अनुभवातून कुठलाही बोध घेताना दिसत नाहीत आणि त्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.

वस्तुतः लसीचा तुटवडा लक्षात घेत सरकारने टप्प्याटप्प्याने वयोमर्यादा खाली आणायला हवी होती. परंतु, श्रेय वादाच्या अभिलाशापायी सरकारला त्याचा देखील विसर पडलेला दिसतो. एकीकडे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजत आहे. परंतु, आज मितीला सर्वाधिक गर्दी ही लस केंद्रावर होताना दिसत आहे. योग्य प्रकारच्या नियोजनातून ही गर्दी टाळता येऊ शकते.

असेल वशिला तर लसीकरणाला चला

गेल्या दहा-बारा दिवसात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात लसीकरणात वारंवार खंड पडत आहे. परिणामी लसीकरणाच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रावर शंभर/दोनशे लस उपलब्ध असताना पाचशे/हजार नागरिक जमा होत आहेत. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नियोजनाचा बोजवारा उडालेला दिसत असल्यामुळे लसीकरण केंद्रात चार पाच तास उभा राहून देखील लस मिळेल याची शाश्वती नसते. परिणामी नागरिक अधिकच पॅनिक होताना दिसत आहेत.

नागरिकांची अनियंत्रित गर्दी हे प्रशासना समोरील एक आव्हान आहेच. पण त्यात वर्तमानात भर पडताना दिसते आहे, ती राजकीय हस्तक्षेपाची. राज्याच्या अनेक भागांमध्ये लोकप्रतिनिधी सर्रासपणे “आपल्या माणसांसाठी” लस मॅनेज करत आहेत. तालुका जिल्हा पातळीवर सरपंच, नगरसेवक थेट लसीकरण केंद्रात उपस्थित राहून लसीकरण मोहिमेत थेटपणे हस्तक्षेप करताना दिसतात. यामुळे रांगेतील लोकांना लस मिळत नाही. परंतु, ज्यांचे हात लोकप्रतिनिधीपर्यंत पुरत आहेत. त्यांना मात्र रांगे शिवाय मागच्या दाराने लस मिळत आहे. यामुळे आज परिस्थिती अशी निर्माण झाले आहे की “असेल वशिला तरच लसीकरणाला चला”.

अनेक नागरिक शहरातून आपले नातेवाईक जसे शिक्षक, आरोग्य कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खेड्यामध्ये जाऊन लसीकरणाचा लाभ घेत आहेत. हे निश्चितपणे सुचिन्ह नव्हे.

लोकप्रतिनिधी आपण स्वतः लस शोधली आहे व स्वखर्चाने लसीची निर्मिती केली आहे, अशा अविर्भावात लसीकरण केंद्रात मुक्तपणे हस्तक्षेप करताना दिसतात. हा एक प्रकारे प्रशासकीय यंत्रणेचा पराभवच ठरतो. प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी समोर इतकी लाचार का होते आहे? हा संशोधनाचा विषय बनत चालला आहे.

ऑनलाइन मोहिमेचा पूर्ण फज्जा

Cowin App सातत्याने अपडेट केले जात नसल्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना प्रत्यक्ष पातळीवर लसीकरण उपलब्ध असताना ॲपवर मात्र लसीकरण केंद्राची माहिती उपलब्ध नसते. यामुळे ऑनलाइन लसीकरण नोंदणी मोहिमेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे आणि बहुतांश नागरिक हे आता ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केंद्रावर जाण्यास प्राधान्य देत आहेत.

सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना लसीकरण उपलब्धतेबाबत रीतसर माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आश्चर्याची गोष्ट ही की मोफत लसीकरण केंद्राबाबत ॲपवर माहिती अपडेट नसली तरी खाजगी केंद्राबाबत माहिती मात्र अपडेट असते. सरकारी केंद्रावर लसीकरणाचा तुटवडा असणाऱ्या दिवशी देखील खाजगी केंद्रात मात्र लसीकरण अखंडपणे सुरू असते. हा प्रकार म्हणजे हलवाईच उपाशी राहण्यासारखा आहे.

टोकन पद्धत अनिवार्य हवी

नागरिकांसाठी लसीकरण सुलभ होण्यासाठी संपूर्ण लसीकरण केंद्रावर शासनाने टोकन पद्धत अनिवार्य करायला हवी. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नोंदणी विभाग स्वतंत्र निर्माण करावा व त्या त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करून त्यांना टोकन नंबर द्यायला हवा. वर्तमानात काही ठिकाणी टोकन पद्धतीचा अवलंब केला जातोय. परंतु, टोकण केवळ दैनंदिन पातळीवर दिले जात असल्यामुळे रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांना जर त्यादिवशी टोकन मिळाले नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेपासून रांग लावावी लागते. एवढे करून देखील दुसऱ्या दिवशीही टोकन मिळेलच किंवा लस मिळेलच याची शाश्वती नसते .

अशा नियोजनशून्य पद्धतीमुळे होणारी नागरिकांची ससेहोलपट टाळण्यासाठी टोकण हे केवळ दैनंदिन पातळीवर न देता ते सलग पद्धतीने द्यावेत व लस उपलब्ध होईल त्या त्या प्रमाणात टोकन प्राप्त होणारे नागरिकांना लसीकरण केंद्रवर येण्याचा मेसेज द्यायला हवा. अर्थातच प्रशासनाने प्रामाणिक इच्छाशक्ती दाखवली तर लसीकरणात सुलभीकरण आणत लसीकरण प्रक्रिया नागरिकाभिमुख केली जाऊ शकते.

ज्यांचा आवाज प्रशासनापर्यंत, राजकीय व्यवस्थेपर्यंत पोचू शकतो त्यांच्यासाठी लसीकरणाचे विविध माध्यम उपलब्ध आहेत, हा वर्ग येनकेन प्रकारे लस पदरात पाडून घेऊ शकत असल्यामुळे हा लाभार्थी वर्ग आवाज उठवण्याची शक्यता नाही. प्रसार माध्यमांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा नसल्यामुळे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया याबाबतीत “हाताची घडी तोंडावर बोट” अशा थाटात आहे.

वस्तूत: प्रसारमाध्यमांनी लसीकरण केंद्रावरील जमिनीवरील वास्तवाचे चित्रीकरण करून प्रशासकीय व राजकीय यंत्रणा यांच्या डोळ्यात अंजन घालने जरुरीचे आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारी प्रसार माध्यमे देखील भरकटलेली दिसतात. परिणामी नागरिकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही आणि व्यवस्था परिवर्तन होताना दिसत नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात

कागदावरील रिपोर्ट आणि जमिनीवरील वास्तव यात जमीन-अस्मानाचे अंतर असते ही प्रशासकीय संस्कृती ध्यानात येत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ खालून वर येणाऱ्या रिपोर्ट वर विश्वास न ठेवता आकस्मिकपणे लसीकरण केंद्राला भेट देऊन जमिनीवरील वास्तव जाणून घ्यावे व त्या अनुषंगाने व्यवस्था सुधारण्यासाठी उपाय योजायला हवेत. एकूणातच लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांची अवस्था “भीक नको, पण कुत्रे आवर” अशी झालेले आहे व त्याच कारण आहे प्रशासन पातळीवरील असंवेदनशीलता.

नियोजनशून्य व असंवेदनशील कारभारामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोससाठी शासनाने आखून दिलेल्या 84 दिवसाची पूर्तता झाल्यानंतर देखील अनेक दिवस लसीपासून वंचित राहत आहेत. याचा परिणाम लसीकरणाच्या परिणामकारकतेवर होऊ शकतो याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे.