Home Blog Page 233

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदींचा सज्जतेचा इशारा; देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडाही जाणवला होता. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूबाबतच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मोदी यांनी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये १५०० ऑक्सिजन प्लान्ट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याशिवाय ऑक्सिजन प्लांट्सची देखरेख आणि त्यांच्या कामाबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही मोदींनी भर दिला.

दरम्यान, या ऑक्सिजन प्लांट्ससाठी पंतप्रधान मदत निधीमधून खर्च दिला जाणार आहे. तसंच यामुळे देशात ४ लाख ऑक्सिजन बेड्स उभारण्यासही मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी काही लोकं असली पाहिजे ज्यांना ऑक्सिजन प्लांट्सची देखभाल आणि त्याच्या कामकाजाबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल, असंही मोदी बैठकीदरम्यान म्हणाले. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान हाहाकार माजला होता. याशिवाय सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्सची कमतरता जाणवली होती.

दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारच्या कामाकाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु आता खरबदारी म्हणून सरकारनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसंच लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारांसोबत मिळून काम करण्यास सांगितलं आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.

‘ईडी’ कडून परमबीर सिंग यांचीही लवकरच चौकशी !!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ‘ईडी’ कडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ‘ईडी’ने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. याप्रकरणी ‘ईडी’कडून तपास सुरुच असून आता ‘ईडी’ अधिकारी लवकरच परमबीर सिंग यांना चौकशीचे समन्स बजावणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

या प्रकरणी सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ‘ईडी”ने आपला गुन्हा दाखल केला आहे. “ईडी’ने अनिल देशमुख आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर ‘ईडी’ने विशेष कोर्टातून सचिन वाझे याची जेलमध्ये जाऊन चौकशी करण्याची काल परवानगी मिळवली आहे.

‘ईडी’चे अधिकारी उद्या तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करणार आहेत. सचिन वाझे याच्या चौकशीने तपासाची ही साखळी पूर्ण होत नाही. यातील मुख्य तक्रारदार परमबीर सिंग हे आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावणं ‘ईडी’ला आवश्यक आहे. त्यामुळे सचिन वाझे याची चौकशी पूर्ण होताच परमबीर सिंग यांना ‘ईडी’चे अधिकारी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याचं ‘ईडी च्या सूत्रांच म्हणणं आहे

फडणवीसांनी भाजप मधील सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून संपवले; शिवसेनेची टीका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांनी केली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे पाहिले जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर पक्षातलेच एकनाथ खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत टोला ही त्यांनी लगावला आहे.

भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना देखील खुद्द त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असं सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांची स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर टीका; त्यावर चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे ? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा खरमरीत इशारा वाघ यांनी दिला आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखरियाल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता भाजपला कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायच्या. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचं पाहत आहे. म्हणून तो चित्रपट आला होता ‘शिक्षणाचा आयचा घो’ बरोबर आहे ते, असं संजय राऊत त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले होते.

सहा हजार पदे लवकरच भरणार, शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सुमारे सहा हजार शंभर (६१००) शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.