Home Blog Page 231

पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना फसविले..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर च्या पोलिसांनी गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसवल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी चेतन जीवराज दंड याने २०१४ पासून ‘देसार इन्वेस्ट्मेन्ट्स’ या नावाने कंपनीची जाहिरात ‘फेसबुक’ आणि ‘गुगल’ वर प्रसारित केली. प्रत्यक्षात त्याने अशी कोणतीही कंपनी रजिस्टर केली नाही. रजिस्ट्रेशन न करताच त्या कंपनीच्या देसार इन्वेस्ट्मेन्ट्सच्या नावाखाली त्याने लोकांना यात गुंतवणूक करायला प्रवृत्त करण्यासाठी गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा ५% प्रमाणे परतावा देण्याचे आमिष दाखवीले.

फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर काहीकाळ त्यांना ठरल्याप्रमाणे परतावाही दिला. मात्र नोव्हेंबर २०१९ पासून फिर्यादी व साक्षीदार यांना कोणताही परतावा दिलेला नाही तसेच त्यांची मुद्दलही त्यांना परत न करता २,१३,२५,०१७ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आणि ६ जुलै रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

अशा बनावट कंपन्या गुंतवणुकीतून अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवू शकतात त्यामुळे अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून जनहितार्थ करण्यात येत आहे.

आयुक्तांनी दिला सार्वजनिक स्वच्छतेवर भर, सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे दिले निर्देश !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या १० प्रभागात एकुण ४१९ शौचालयात ४२९२ सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय (एकुण २४९ सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी २८ शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित १० शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे.जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते. सदर संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या साध्यस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्‍या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून सदर निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात ‘पे ॲण्ड युज’ ची एकुण २६ शौचालये (एकुण २३५ सिट) असून सदर शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.

विभागीय उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत आहे.

निर्बंध आणखी शिथिल व्हायला हवेत ! अर्थचक्र गतिमान करण्यावर पालिकेची भर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पालिकेची भूमिका : अर्थचक्र गतिमान करण्यावर भर

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली. ‘डेल्टा प्लस’च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात ठेवून २८ जूनपासून जुनेच निर्बंध लागू ठेवले आहेत. त्यामुळे सगळे व्यवहार थंडावले असून, अर्थचक्र मंदावले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्बंध शिथिल करण्यास हरकत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचे समजते.

कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाने ही बैठक आयोजित केली होती. कोरोनामुळे लागू होत असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निर्बंधाबाबत कोरोना कृतिदलाशी चर्चा करून काही दिवसांत राज्य सरकार निर्णय घेईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत आता ‘जम्बो’ रुग्णालयांची संख्या वाढली असून, पुरेशा खाटाही उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी अन्य सुविधाही उपलब्ध असल्यामुळे थोडे निर्बंध खुले केल्यास रुग्णसंख्या वाढली तरी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम असल्याने रुग्णसेवा पुरविणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात खुले केल्यास फारसा परिणाम होणार नाही असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केले.

वाहन पार्किंगसह ‘चार्जिग’ ची सुविधा नव्या इमारतींमध्ये लवकरच बंधनकारक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची महत्वपूर्ण माहिती..

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना (ई.व्ही.) प्रोत्साहन देण्याकरिता २०२२ पासून नवीन निवासी प्रकल्पात विकासकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिग सुविधेचा पर्याय घर खरेदीदारांना देणे बंधनकारक करण्याचा विचार आहे. याशिवाय निवासी इमारतींच्या आवारात खासगी चार्जिग पायाभूत सुविधा उपलब्ध करता याव्यात, यासाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचे २०२१ च्या ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणा’त प्रस्तावित आहे. हे धोरण प्रत्यक्षात आल्यास राज्यात विकलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना धोरणाचा कालावधी संपेपर्यंत (२०२५) रस्ते करातून माफी दिली जाईल.

या प्रस्तावित धोरणाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. नव्या धोरणानुसार २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा असावा, एप्रिल २०२२ पासून मुख्य शहरांमधील सर्व नवीन शासकीय वाहने इलेक्ट्रीक असावी, पाच प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे २५ टक्के विद्युतीकरण, सात शहरांमध्ये चार मुख्य महामार्गावर सार्वजनिक व निम सार्वजनिक चार्जिग सुविधांची (संख्या २५००) उभारणी, यासाठी प्रयत्न केले जातील. विविध स्तरावर प्रोत्साहन ही उद्दिष्टे साध्य करण्याकरिता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, विक्री, चार्जिग अशा वेगवेगळ्या स्तरावर प्रोत्साहन दिले जाईल. या अंतर्गतच नव्या निवासी इमारतीत २० टक्के, संस्थात्मक आणि व्यावसायिक संकुलात २५ टक्के तर शासकीय कार्यालयांमध्ये १०० टक्के इतके ई.व्ही. पार्किंग देण्याचे बंधनकारक करण्याचा विचार आहे. या शिवाय वाहन नोंदणी, नूतनीकरणातही या वाहनांना सूट दिली जाईल असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

११ गुन्हे दाखल असलेल्या चैन स्नॅचरला विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केला गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १६.०५.२०२१ रोजी सकाळी ०५.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी सौ.अनिता अनिल राऊळ (वय: ५५ वर्षे), राहणार नीलकंठ विहार, सुभाष रोड, नवापाडा, डोंबिवली (पश्चिम) त्यांच्या पतीसह भागाशाला मैदान, डोंबिवली (पश्चिम) येथून चालत जात असता आरोपी फजल आयुब कुरेशी (वय: 25 वर्षे) राहणार सूचक नाका, टाटा पावर जवळ, कल्याण (पूर्व) याने सफेद रंगाच्या ऍक्टिवा गाडीवरून मागून येऊन फिर्यादी अनिता राऊळ यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम व ८.५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसुत्रे खेचून घेऊन पळून गेला होता म्हणून त्याच्या विरुद्ध विष्णूनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि श्री. गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने निश्चित करून आरोपीस गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून त्याचा ताबा घेऊन त्यास अटक करत गुन्ह्याच्या तपासाअंती सदर आरोपीकडून गुन्ह्यामध्ये खेचलेले ८ ग्रॅम वजनाचे एक व ८.५ ग्रॅम वजनाचे एक असे एकूण १६.५ ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे हस्तगत केली आहेत.

सदरची कारवाई ही डोंबिवली विभागाचे मा. सहाय्यक आयुक्त श्री.जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. गणेश वडणे, पो.हवा पाटणकर, पो.ना कुरणे, पो.ना सांगळे, पो.ना लोखंडे, पो.कॉ कुंदन भामरे, पो.कॉ बडगुजर यांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली व संबंधित आरोपीवर यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत व पुढील तपास सुरू आहे असे विष्णूनगर पोलीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.