Home Blog Page 234

रस्त्यावर वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी करणाऱ्याला खाकी वर्दीचा झटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाहतुकीचे नियम डावलून ‘नो पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला ” थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन ” व पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र त्यांची मस्ती जिरून चक्क ढसाढसा रडायला लागले. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ मध्ये मोटारकार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला.

तोच तेथील एका दुकानातून अरुण रतन सिंग (३६) व त्याची पत्नी मीना (३३) रा. साई आंगण, रामदेव पार्क, मीरारोड हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करू लागले.

अरुणने तर “तुझी वर्दी उतरव मग बघा तुला कसा चिरून टाकतो” असे धमकावले. मीनाने तर, तुला विकून गाडी दुरुस्त करेन अशी दमदाटी केली. लोकांची गर्दी जमली पण कोणी पुढे आले नाही. अखेर नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रस्त्यावर हिरोगीरी आणि भाईगिरी करणाऱ्या अरुण ला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचा असे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा-बायको माफी मागून पुन्हा आम्ही असे करणार नाही म्हणून गयावया करीत विनवण्या करत होते.

महाविकास आघाडीचा झेंडा पुणे महापालिकेवर फडकवण्याची तयारी करा : संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याहस्ते आज करण्यात आलं. त्यावेळी राऊत यांनी पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायला हवा, असा आदेशच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही टोला लगावलाय.

महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरलाय. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला संजय राऊत यांनी पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता. मी पुन्हा येईन. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थित लोक खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळालं.

संजय राऊत कार्यक्रमाला पोहोचले आणि बोलायला उभे राहिले तोपर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमस्थळी आले नाही. त्यावेळी बोलताना राऊतांनी महापौरांना टोला लगावला. महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दात राऊतांनी मोहोळ यांना टोला हाणला.

पुण्यात आम्ही महाविकास आघाडी बनवू, याबाबत वाटाघाटी करु, एकत्र बसून चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत आम्ही ८० जागा लढवू शकत नाही का ? असंही राऊत म्हणाले. यापूर्वीही राऊत यांनी आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, असं राऊत म्हणाले होते. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

आरोग्य केंद्राचा निर्णय : कोरोना संकटात २३१०० कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. काल रात्री खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मनसुख मंडाविया आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी कॅबिनेटमधील निर्णयांची माहिती दिली.

नव्या मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी ५ वाजता बोलावण्यात आली होती. जवळपास तासभर ही बैठक चालली. मंडयांचं सशक्तीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच १ लाख कोटी रुपये मंडयांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. एपीएमसी मंडया आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी मंडयांना अधिक संसाधनं दिली जातील. मंडया संपवल्या जाणार नाहीत, असं कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.

कोरोनाचं संकट पाहता आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. २० हजार नवे आयसीयू बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी २३१०० कोटी रुपयांचं आपत्कालीन हेल्थ पॅकेज तयार करण्यात आलं आहे, असं मंडाविया यांनी सांगितलं.

आरबीआय कडून १४ बँकांना कोट्यवधींचा दंड, “या” बँकांचा आहे समावेश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १४ बँकावर कडक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह १४ बँकांना आर्थिक दंड आकारला आहे. या १४ बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका आणि एक लहान वित्त बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनेच जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना बँक फायनान्सच्या काही तरतुदींचे पालन न करणे, ‘कर्ज-आगाऊ आणि इतर निर्बंध’ यासाठी ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकांवर आरबीआयने आकारलेला दंड हा प्रामुख्याने अडचणीत असलेल्या दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि त्याच्या गट कंपन्यांसह बँकांच्या व्यवहारांशी संबंधित आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या कंपन्यांच्या गटाच्या खात्यांच्या तपासणीत असे आढळले की, आरबीआयने दिलेल्या वरीलपैकी एक किंवा अधिक निर्देशांच्या तरतुदींचे पालन करण्यास बँका अपयशी ठरल्या आहेत. तसेच बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात बँकांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच याचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

या १४ आहे बँकेचा समावेश

  • बंधन बँक लिमिटेड
  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • क्रेडिट सुइस एजी
  • इंडियन बँक
  • इंडसइंड बँक लिमिटेड
  • कर्नाटक बँक लिमिटेड
  • करूर वैश्य बँक लिमिटेड
  • पंजाब आणि सिंध बँक
  • साउथ इंडियन बँक लिमिटेड
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
  • ‘जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड

४८ तासांत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांनी भाजपचे स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांना बजावली मानहानीची नोटीस!

संपादक: मोईन सय्यद/ मीरा भाईंदर प्रतिनिधी

मिरारोड- जमिनीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांचेवर आरोप करणे भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना आता चांगलेच महागात पडण्याची चिन्हं दिसत असून पत्रकार परिषदेत मुजफ्फर हुसैन यांचे नाव घेऊन बिन बुडाचे आरोप केल्याचा दावा करून काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांनी दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की जर दिनेश जैन यांनी ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी न मागितल्यास त्यांचे विरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मीरारोड पूर्वेकडील शांती नगर सेक्टर- ९ मधील मौजे पेणकर पाडा, सर्व्हे क्र. ३८/२ जुना, २०६/२ नवीन या आरक्षित भूखंड प्रकरणी स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांनी जून महिन्यात पत्रकार परिषद घेऊन मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन व त्यांच्या मालकीच्या असलेल्या अस्मिता बिल्डरवर आरोप केले होते. दिनेश जैन यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर करून आरोप केला होता की, मुजफ्फर हुसैन यांनी मीरा भाईंदर महानगरपालिके कडून संबंधित जागेचे विकास हस्तांतरण प्रमाणपत्र (TDR) घेतले परंतु महानगरपालिकेला ती जागा हस्तांतरित केली नाही त्यामुळे महानगरपालिचे फार मोठे नुकसान झाले असून महानगरपालिकेने या संदर्भात तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मुजफ्फर हुसैन यांनी हे सर्व आरोप खोडून काढीत आपली बाजू स्पष्ट करीत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना जाहीर आवाहन केले होते की दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसाच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने मुझफ्फर हुसैन यांनी आता स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली असून नोटीस प्राप्त झाल्याच्या ४८ तासात सदर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करीत विनाअट जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे नोटीसीद्वारे  कळविण्यात आले आहे.

याबाबत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांचेशी संपर्क साधला असता मला अजून तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, जेव्हा नोटीस मिळेल तेव्हा माझ्या वकिलांशी सल्लामसलत करून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण चांगलेच तापणार असणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.