Home Blog Page 236

सक्त नियम पाळून १५ जुलैपासून शाळा सुरु करण्यास परवानगी; शिक्षणमंत्र्यांची घोषणा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु व्हावी अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे काही ठिकाणी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. पण दुसरी लाट आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आता आमचे संपूर्ण लक्ष हे येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आहे. कोरोना काळात मुलांवर परिणाम होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत.

त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.


ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल व कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल त्यात परिस्थिती अनुकूल असेल तर गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून निर्णय
गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

१५ जुलैपासून महिनाभर कोरोना नसलेल्या आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. शासनाने दिलेल्या एसओपीची अंमलबजावणी याठिकाणी व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

काही गाव आणि शहरांमध्ये कनेक्टीव्हीटी किंवा इलेक्ट्रीसिटी नसल्याने डिजीटल शिक्षण देण्यात अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा ठिकाणी देखील नियमांचे पालन करुन ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. कोविडमुक्त गावातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ जुलैला परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार आखून दिलेले नियम शाळांना पाळणे बंधनकारक आहे.

जूनमध्ये राज्यात १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जून २०२१ मध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेर ७८ हजार ३९१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९० हजार २६० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मुंबईत जूनमध्ये ६ हजार ३३० बेरोजगारांना रोजगार

मंत्री मलिक म्हणाले की, माहे जून २०२१ मध्ये विभागाकडे ३३ हजार ३२९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार १०९, नाशिक विभागात ६ हजार ५९४, पुणे विभागात ९ हजार ६०४, औरंगाबाद विभागात ५ हजार १४१, अमरावती विभागात १ हजार २९४ तर नागपूर विभागात १ हजार ५८७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जूनमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १५ हजार ३३६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ३३०, नाशिक विभागात ३ हजार १११, पुणे विभागात ४ हजार ०७८, औरंगाबाद विभागात १ हजार ६५२, अमरावती विभागात ७९ तर नागपूर विभागात ८६ इतके बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली.

कल्याण-डोंबिवली मनपाच्या मोबाईलव्हॅन लसीकरणाला सुरवात..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पुर्वेतील ‘आय’ प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, या हेतूने ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली काशीकर, प्रभाग अधिकारी दिपक शिंदे उपस्थित होते.

‘आय’ प्रभाग कार्यालयाजवळ तसेच जाईबाई विद्यामंदिर, साई नगर, कल्याण पूर्व येथेही आज उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्याहस्ते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर व डॉ.पूर्वा भानूशाली यांच्या प्रमुख उपस्थितीत मोबाईल लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी ४ बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून २ बसेस मध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल आणि उर्वरित २ बसेस नागरिकांना लसीकरणानंतर देखरेखीखाली ठेवण्यासाठी उपलब्ध राहतील. दोन्ही ठिकाणी सुमारे ७०० नागरिकांचे लसीकरण आज दिवसभरात करण्यात आले.

महापालिकेच्या महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्रातही आज धान्य बाजारातील माथाडी कामगारांसाठी विशेष लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तेथे सुमारे १५० माथाडी कामगारांचे लसीकरण करण्यात आले.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या.कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ.रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे समितीचे सदस्य होते.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

दिलीपकुमार यांनी बॉम्बे टॉकिजनं १९४४ साली निर्माण केलेल्या ज्वार भाटा या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर १९९८ ला आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर देशातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या परिवाराच्या प्रति सांत्वना व्यक्त केल्या आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात केला जाईल अशी माहिती दिली आहे.