Home Blog Page 237

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्स..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी सेंट्रल रेल्वेने स्पेशल ट्रेन्सची सोय केली आहे. ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

जसजसा गणोशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

गणपतीसाठीच्या विशेष टेन्सची माहिती

१. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी (आरक्षित)

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान दररोज चालवली जाईल. रात्री १२.२० मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता ही ट्रेन सावंतवाडी येथे पोहचेल. त्यानंतर ही ट्रेन सावंतवाडी येथून २.२० वाजता रवाना होईल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल.

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.

२. मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी (पूर्णपणे आरक्षित)

मुंबई सीएसएमटी- रत्नागिरी स्पेशल ट्रेन ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान मुंबईहून दर सोमवारी आणि शुक्रवार चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी स्थानकातून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन सुटेल. त्याचदिवशी रात्री ही गाडी १०.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. त्यानंतर रत्नागिरीहून पुन्हा ही गाडी ११.३० वाजता मुंबई सीएसएमटीसाठी रवाना होईल. जी दुसऱ्या दिवशी ८.२० वाजता पोहचेल. रत्नागिरीहून दर रविवारी आणि गुरुवार ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल.

मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी -मुंबई सीएसएमटी ही गाडी संगमेश्वर रोड, आरावली रोड, सावर्दा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि दादर स्थानकांवर थांबेल. मुंबईहून सुटणारी गाडी मागील सर्व स्थानकांवर थांबेल आणि ठाणे स्थानकात अतिरिक्त थांबा असेल.

३. पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल (पूर्णपणे आरक्षित)

पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी ०७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पनवेल येथून सकाळी ८ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी सावंतवाडी रोडला रात्री ८ वाजता पोहोचेल. सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन सावंतवाडी रोड येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ८.४५ वाजता सुटेल दुसर्‍या दिवशी सकाळी ७.१० वाजता गाडी पनवेलला पोहोचेल.

पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल ट्रेन रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.

४. पनवेल-रत्नागिरी-पनवेल (पूर्णपणे आरक्षित)

पनवेल – रत्नागिरी स्पेशल ट्रेन पनवेल येथून ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल. त्याच दिवशी गाडी ३.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी – पनवेल गाडी ६ ते २० सप्टेंबर दरम्यान दर सोमवारी व शुक्रवारी रात्री ११.३० वाजता रत्नागिरीहून सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता ही गाडी पनवेलला पोहोचेल.

पनवेल-रत्नागिरी-पनवेल ही विशेष गाडी रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.

वरील गाड्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. वरील सर्व प्रवासी गाड्यांसाठी ८ जुलै २०२१ पासून बुकिंग करु शकतात. Passenger Reservation System (PRS) काऊंटर आणि IRCTC च्या वेबसाईटवर ही बुकिंग होणार आहे.

विधीमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणासासंदर्भात महत्त्वाचा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत हा ठराव मांडला.

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ५ मे, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२) मधील कलम २ (ञ), कलम ४(१)(क) आणि कलम ४(१)(ख) अवैध ठरवितांना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे.

केंद्र सरकारने पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य आहे. तसेच आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असून त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरीत करणे आवश्यक आहे.

त्या अन्वये न्यायालयांच्या न्यायनिर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची पन्नास टक्के इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा हा ठराव विधिमंडळात पारित करण्यात आला आहे.

प्रताप सरनाईक यांना हायकोर्टाचा दिलासा: २८ जुलैपर्यंत कारवाई करण्यास मनाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळत आहे. मनी लॅान्ड्रींग प्रकरणी ईडीने सुडबुद्धीने कारवाई करु नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक करु नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यान सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा पूर्वेश, विहंग आणि मेहुणा योगेश चांदेगला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज हायकोर्टाने सुनावणी देत आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवत दाद मागितली आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लिन चिट द्यावी, अशी मागणीच सरनाईक यांनी आज केली आहे.

मला ईडी कडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ईडी ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही आरोप होत आहे, असं सरनाईक म्हणाले. तसेच ‘मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईकला अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असंही सरनाईक म्हणाले. सरनाईक यांनी सभागृहात ईडी कडून होत असलेल्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.

८ वी ते १२वी च्या शाळा सुरु होणार? – राज्य सरकारचा मोठा निर्णय

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाचा वेग मंदावताच अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोरोना काळात बंद राहिलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत आहेत. आता ८ ते १२ वीं पर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ठाकरे सरकारने या संबंधातील निर्णय घेण्यात सरकारच्या बाजूने हा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्रातील शालेय शैक्षणिक विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हि घोषणा केली आहे. मात्र राज्यात ज्या भागांमध्ये सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्याच भागांमध्ये हा निर्णय लागू होईल. १२ ते १५ जुलै मध्ये ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाच्या अंतर्गत कोरोना मुक्त क्षेत्रातील ग्राम पंचायतींच्या अधिपत्त्याखाली येणाऱ्या गावातील शाळांमध्ये ८वी ते १२वी पर्यंत चे वर्ग सुरु करण्यात येतील. परंतु संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार ग्राम पंचायतींना दिले आहेत.
सर्व मुलांना एकत्र बोलावण्यापेक्षा दिवस अथवा तासांची अदलाबदली करून कमीतकमी गर्दी जमेल असे वेळापत्रक तयार करावे जेणेकरून सामाजिक डिस्टंसिंगचे पालन करणे सोपे होईल.

शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एका बेंच वर एका विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, दोन विद्यार्थ्यांच्या दरम्यान ६ फुट अंतर, एका रूम मध्ये १५ ते २० विद्यार्थी संख्या असावी. पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचे नियम पाळणे, मास्क वापरणे, लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना त्वरित घरी पाठवणे, कोरोना टेस्टिंगसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
शालेय स्वच्छता आणि आरोग्य यावर लक्ष देणे आवश्यक. शाळांमध्ये सॅनिटायझर व अनेक गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

तसेच एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर सुरु असेल तर ते त्वरित स्थानांतरित केले जावे आणि शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात यावा. शिक्षकांची कोरोना चाचणी करणेही अनिवार्य करण्यात यावे.

तर भाजपचे १८ आमदार निलंबित झाले असते : अजित पवार

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून काल विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे. राज्यपाल सत्ताधारी पक्षांनी पाठवलेल्या १२ आमदारांच्या फाईलवर कार्यवाही करत नसल्यानं भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आले, अशी चर्चा कालपासून सुरू आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज भाष्य केलं. निलंबनाची कारवाई जाणूनबुजून करण्यात आलेली नाही, असं पवारांनी सांगितलं.

निलंबनाची कारवाई जाणूनबुजून करण्यात आलेली नाही. राज्यपालांनी १२ आमदार प्रलंबित ठेवले म्हणून १२ आमदार निलंबित केले अशातला काही भाग नाही. त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यातल्या काही त्यांनी स्वत:हून मान्यदेखील केल्या. पण १२ विरुद्ध १२ असं काही नाही. ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ अशातला तो प्रकार होता. त्यांच्या १८ आमदारांनी गोंधळ घातला असता तर १२ च्या जागी १८ आमदार निलंबित झाले असते, असं अजित पवार म्हणाले.

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव अतिशय संयमानं वागल्याचे कौतुकोउद्गार अजित पवारांनी काढले. भास्कर जाधव यांचा स्वभाव माझ्यासारखाच तापट आहे. त्यांना लगेच राग येतो. मात्र तापट स्वभाव असतानाही काल ते अतिशय शांत होते. त्यांनी सगळ्या गोष्टी मुद्देसूदपणे सांगितल्या. समोर इतका गोंधळ असताना, अपशब्द वापरले जात असतानाही ते शांत राहिले. शिवसैनिक असूनही त्यांनी फिजिकल काही केलं नाही, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांच्या शेजारीच बसले होते.