Home Blog Page 239

राज्य सरकारचे नवीन कृषी विधेयक मंजूर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. त्या आधी आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

राज्य सरकारचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्य सरकारचा नवा कृषी कायदा मंजुर व्हावा असं महाविकास आघाडीतील पक्षांची विशेषत: काँग्रेसची इच्छा होती. आता हा कायदा सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आला आहे. त्यावर आता सर्व क्षेत्रातून अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम २०२१, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण आश्वासित किंमत आणि शेतीसेवा विषयक करार) महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२१ आणि शेतकरी उत्पादन व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम, २०२० असं या तीन विधेयकांची नावं आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात आपण सुधारणा करणार आहोत, त्याचा अभिप्राय घेण्यासाठी आपण दोन महिन्याचा कालावधी देत आहोत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

एक आत्महत्या झाली तर आपण संवेदना प्रगट करतो पण दिल्लीतील आंदोलनात आतापर्यंत २०० शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय असं ना. छगन भुजबळ म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्राच्या कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आता राज्यातील हे तीन विधेयक आपण चर्चेकरता खुली ठेवली आहेत. शेतकरी आणि शेतकरी संघटना यांची काही भूमिका असू शकेल, त्यांनी ती मांडण्यासाठी आपण वेळ दिला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना संरक्षण नाही, त्यामुळे हा कायदा शेतकरीविरोधी असल्याचं सांगत देशभरामध्ये आंदोलन झाली. बिगर भाजप राज्यात हा कायदा लागू करणार नाही अशी भूमिका अनेक राज्यांनी घेतली. महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी सरकारने या कायद्याला विरोध केला. आता या कायद्यात सुधारणा करुन राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विधी व न्याय विभागाने हा मसूदा बनवला आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर काय शिक्षा असणार आणि त्यासंबंधी विविध तरतूदी काय असतील ते या विधेयकात मांडण्यात आलं आहे.

फोन टॅपिंगवरून विधानसभेत सत्ताधारी नेते आक्रमक; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी विधेयकासह फोन टॅपिंगचा मुद्दाही चांगलाच गाजला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचाही परामर्श, काळजी आणि त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.

अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो’ अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्य या नात्याने मंत्री म्हणून नव्हे तर सभागृहातील अनेक सदस्यांना जर महाराष्ट्रापेक्षा वेगळी केंद्रीय एजन्सी फोन टॅपिंगवर ठेवत असेल तर आमच्या सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असंही जयंत पाटील म्हणाले. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, केंद्रीय एजन्सीकडून राज्यातील सभागृहातील किती सदस्यांचे फोन टॅपिंगला ठेवले आहेत, याची माहिती सभागृहात ठेवावी. या परिस्थितीत सर्व सन्माननीय सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सभागृहाच्या सन्माननीय अध्यक्षांची आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

नाना पटोलेही आक्रमक


२०१६-१७ मध्ये मी खासदार असताना माझ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. अशाप्रकारे लक्ष ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव अमजद खान ठेवण्यात आलं होतं. केंद्रातील सध्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पीएचा नंबर, खासदार संजय काकडे यांचाही फोन नंबर टॅप केला गेला. अशाप्रकारे कुणाच्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं सांगत नाना पटोले सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर २०१६-१७ दरम्यान झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करुन त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.

राज्यात १५,५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी; अजित पवारांची माहिती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील विविध विभागातील १५,५११ रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. त्यानुसार २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. गट अ – ४४१७, गट ब – ८०३१, गट क – ३०६३. अशी एकूण १५,५११ इतकी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई; ही तर आणीबाणीच : फडणवीस आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

आघाडी सरकारने १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला.

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. त्याचवेळी विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला ? माईक देण्याची परवानगी कुणी दिली ? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.

अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमदारांना माईक परत देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं मार्शल भाजपच्या आमदारांना सांगत होते. मात्र, भाजपचे आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. त्याचवेळी मार्शल माईक काढून घेत असताना मीडियाचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. मीडियालाही दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला.

देवेंद्र फडणवीस संतप्त

या संपूर्ण प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शल करवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करा : जयंत पाटील

मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो. मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी तयार; पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या १-२ दिवसांत विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या मंत्र्यांची यादी जवळपास अंतिम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अनेक नेते ज्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. काही नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा संध्याकाळपर्यंत हिमाचलवरून दिल्लीत परतणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील इंदूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण ५३ मंत्री आहेत. नियमांनुसार मंत्र्यांची संख्या ८१ असू शकते. अनेक नावांची यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषत: ज्या राज्यात पुढील वर्षी निवडणूका होणार आहेत येथील कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार हे यंदा पाहणं गरजेचे आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल आणि वरूण गांधी या तीन नावाची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश नक्की असल्याचं बोललं जात आहे. आसाममध्ये सोनावाल यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात येईल असं म्हटलं जात होतं. आसाममधील भाजपमधील अंतर्गत वाद संपुष्टात आणण्यासाठी सोनोवाल यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच आक्रमक चेहरा असलेल्या वरूण गांधीं यांचाही केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहेत. पशुपति पारस आणि मुलगा चिराग पासवान यांच्यात मतभेद झाल्यानंतर आता पशुपति पारस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल असं बोललं जात आहे. बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

त्याचसोबत मनमोहन सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले दिनेश त्रिवेदी यांच्याही नावाची चर्चा आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी त्रिवेदी यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. ओडिसा येथून बैजयंत पांडा यांनाही केंद्रात संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम यांनी ७ लाखांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

महाराष्ट्रातील आणखी एक कॅबिनेटसाठी चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिल्लीतून फोन आला असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेतून काँग्रेस, काँग्रेसमधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपा असा नारायण राणेंचा राजकीय प्रवास झालेला आहे.

कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता ज्येष्ठ मंत्री आणि भाजपा अध्यक्षांसोबत बैठक घेणार होते मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.