Home Blog Page 240

जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षेस तयार, नसेल तर सरकारने मला क्लीनचिट द्यावी : प्रताप सरनाईक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होत आहे. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने १२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं काम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले. यावेळी माझ्यावर होणाऱ्या आरोपांनी सरकारची बदनामी होतेय. त्यामुळे गुन्हा केला असेल तर मी शिक्षेला तयार आहे पण केलाच नसेल तर मला क्लीनचिट देण्यात यावी अशी मागणी यावेळी सरनाईक यांनी केली.

माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एमएमआरडीए हे खातं सुद्धा राज्य सरकारकडेच आहे. माझ्यावर आरोप म्हणजे ते राज्य सरकारवर आरोप आहेत. कारण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. पर्यायाने महाविकास आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना काल एक पत्र दिलं आहे, असे सरनाईक सांगितले.

माझ्यावर आरोप झाल्याने राज्य सरकारची कुठेतरी बदनामी होत आहे, हे या पत्रातून मी गृहमंत्र्यांना सांगितलं. तसंच आज विधानसभेत बोलताना मी आज गृहमंत्र्यांना विनंती करु इच्छितो, की मी जे काल पत्र दिलं होतं त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून तो अहवाल आपण मागून घ्यावा. जर मी घोटाळा केला असेल तर मी गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला देखील तयार आहे. पण जर घोटाळा केलाच नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा जर तपास पूर्ण झाला असेल तर मला मात्र राज्य सरकारकडून क्लिनचिट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली.

आर्थिक गुन्हे शाखेने लवकरात लवकर तो अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर करावा आणि गृह खात्याने तो अहवाल लोकांपर्यंत पोहोचवावा. जेणेकरून लोकांच्या समोर सत्य परिस्थिती येईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

आटगावजवळ घुसला रेल्वे ट्रॅकवर गॅस टँकर; मोठी दुर्घटना टळली..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एचपी गॅस टँकरचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर महामार्गावरील डिव्हायडर तोडून टँकर थेट आटगावजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन धडकला. हा अपघात दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी घडला.

दरम्यान, टँकर रेल्वे मार्गात घुसल्याने संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेची कसाराकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन आसनगांव, वाशिंद, खडवली स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. दोन तासानंतर सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या घटनास्थळी रेल्वे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, स्थानिक ग्रामस्थ, रेल्वे अधिकारी दाखल झाले आहेत.

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा ! – भास्कर जाधव

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भास्कर जाधवांकडून विरोधकांची पोलखोल

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं, अशा शब्दात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चे दरम्यान झालेल्या घटनेचा तपशील दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसं वागतो?, असा सवाल करतानाच विधानसभा अध्यक्षांनी मला खुर्ची बसायला दिली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

विरोधकांचा गोंधळ गदारोळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले, ते गावगुंडांप्रमाणे अंगावर तुटून पडत होते. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं. पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं विरोधी पक्षनेते म्हणाले, असं त्यांनी सांगितलं.

ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावला जाता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असे आदेश जाधव यांनी दिले. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा वाटत असेल ती मी घेईन. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसंदीय शब्द वापरला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले.

झाल्याप्रकारबद्दल आशिष शेलार यांनी माझी माफी मागितली आहे. फक्त त्यांनीच दोन-तीन वेळा माझी माफी मागितली. हे म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग न्यूज: भाजपचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार गदारोळ व राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरु असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलंय.

१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल

या १२ आमदारांना या वर्षभरात मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामील होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हि माहिती आज विधानसभेत दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दुःस्वासही झालेल्या लज्जास्पद घटनेनंतर अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मजूरही करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवारांच्या विधानावरुन सभागृहात गदारोळ; सत्ताधारीही आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार राज्य सराकारच्या कारभारावर हल्लाबोल करत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या मुनगंटीवारांनी अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलत होते, आता ते आत जात आहेत, अशी धमकीच सभागृहात दिली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले.

विरोधक थेट सभागृहात नेत्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत. विरोधकांनी धमक्या देण्याचं काम करू नये, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही मुनगंटीवारांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांचं विधान विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनीही तातडीनं दखल घेत मुनगंटीवारांचा विधान कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आजच्या कामकाजाच्या पत्रिकेवरच आक्षेप घेतला. त्यानंतर ५०ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार बोलत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी त्यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही ? अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलायचे. आता ते आत जात आहेत. त्यामुळे असे मध्ये मध्ये बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलतोय. तो माझा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचं काही कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवारांच्या विधानानंतर सत्ताधारी पक्षातून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देण्याचं काम करत आहेत का ? विरोधकांनी धमकी देण्याचं काम करू नये, असं नाना पटोले म्हणाले.