Home Blog Page 241

आमदार प्रताप सरनाईकांची खदखद, राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याचदरम्यान, ईडीचा ससेमिरा मागे लागल्यापासून गायब असणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात दाखल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार विरोधातील खदखद बोलून दाखवली आहे.

प्रताप सरनाईक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्या विरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. प्रताप सरनाईकांच्या या विधानामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

माझ्या पक्षाच्या प्रतोदने व्हीप बजावला आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलो. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

एमपीएससीची भरती प्रक्रिया गतिमान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘एमपीएससी’ चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील आहे. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून ‘एमपीएससी’ च्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’ चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

सेवाभावी संस्था-संघटनांनी पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावा ! महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी सेवाभावी संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

सोमवारच्या आढावा बैठकीत महापालिकेकडे असलेल्या आरक्षित भूखंडांची माहिती त्यांनी घेतली आणि सदर भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत सुचना अधिकारी वर्गाला देतांना त्यांनी हे आवाहन केले.

महापालिकेने ताब्यात घेतलेले सुमारे ३४३ आरक्षित भूंखंड आहेत, महापालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून भूखंडाच्या सभोवताली वृक्षारोपण करावे त्यासाठी इच्छुक अशासकीय सेवाभावी संस्था व संघटनांची मदत घ्यावी, किंवा आरक्षित भूखंडाचा विकास होईपर्यंत आरक्षित भूखंड मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत आणि उत्तम खेडाळू घडविण्यासाठी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांनी पुढे यावे व अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ताब्‍यातील आरक्षित भूखंडांभोवती वाडेभिंती किंवा तारेचे कुंपण घालून त्या संरक्षित कराव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधीत सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.

रस्ते स्वच्छ केले जात नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी रस्ते सफाईकडे स्वत: लक्ष पुरवावेत. त्याचप्रमाणे रस्ते साफ सफाईसाठी मायक्रो प्लॅनिंग करावे, Garbage Vulrenable Points शोधुन तेथे नियमित साफ सफाई करावी, स्वच्छता ही व्यवस्थित झालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळयातील दुर्घटना टाळण्यासाठी रहिवासीमुक्त इमारती त्वरीत निष्कासित कराव्यात आणि सदर इमारती निष्कासित करण्यापूर्वी रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देणेबाबतचे आदेशही त्यांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याची कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नरेंद्र मोदी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत ! भाजप प्रवक्त्या सारिका जैन यांचे अजब विधान..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशभरात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. यामुळेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली भाजपा प्रवक्त्या सारिका जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले आहे. तसेच सारिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करून अयोध्येत राम मंदिर तयार करण्यास सुरुवात करण्याचे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल असं देखील म्हटलं आहे.

सारिका जैन यांनी, ‘ज्यांना असे वाटते की पंतप्रधान मोदी कांदा, टोमॅटो, डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आले आहेत त्यांनी दूर राहावे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले आहेत. ते अयोध्येत राम मंदिर तयार करण्यासाठी, लाखो खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि मुस्लिम बहिणींना तिहेरी तलाकातून मुक्त करण्यासाठी आले आहेत’ असं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सात वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील बर्‍याच भागात ३५ विमानतळे बांधण्यासाठी, अनेक एम्स रुग्णालये बांधण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी, प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी, प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आले आहेत, असं देखील सारिका जैन यांनी म्हटलं आहे.

तसेच देशातील जनतेने ही कामे पाहिली पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे की, या विकासाशी संबंधित कामांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं.

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ९९ जणांना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑल आऊट’ मोहीम राबवून शहरातील २५२ ठिकाणी कारवाई केली. यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ९९ जणांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, पायी गस्त, हॉटेलांची झडती, वस्त्यांमध्ये तपासणी करून पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांवर जरब बसविली. कारवाईत पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, १३ परिमंडळांचे उपायुक्त, विभागीय साहाय्यक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार सहभागी झाले होते.

रात्री ११ ते पहाटे २ पर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी अभिलेखावरील १ हजार ३६ आरोपींची तपासणी केली. त्यामध्ये ३८३ जण सापडले. अजामीनपात्र गुन्ह्यातील १०२ आरोपींना अटक केली. अवैध धंद्यावर ४३ ठिकाणी छापे घालण्यात आले. या अवैध धंद्यात गुंतलेल्या ६९ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी संवेदनशील अशा ४९९ ठिकाणी तपासणी केली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी ८१५ हॉटले आणि लॉजची पाहणी करण्यात आली.

पोलिसांनी शहरात एकाचवेळी २०१ ठिकाणी नाकाबंदी केली होती. ७,३४७ वाहनांची तपासणी करून मोटारवाहन कायद्यान्वये १,७५९ वाहन चालकांवर कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ७५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.