Home Blog Page 246

डिजिटल साधनाचा अति वापर डोळ्यांच्या आजाराला निमंत्रण, वेळीच उपचार घेण्याचा नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांचा सल्ला

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या संकटा मुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला. एकीकडे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने डिजीटल पद्धतीचा अवलंब स्विकारला. या शिक्षणासाठी मोबाईल आणि संगणकचा वापर वाढला असल्याने डोळ्यांचे आजार वाढत आहेत. लहान मुलांमधील डोळ्याचे आजार वाढू नये यासाठी वेळीच उपचार घ्यावे असा सल्ला प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी यावेळी डोळ्यासंबंधी आजारांवर आणि म्युकर मायकोसीसवर माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या कोविड काळात सर्वच परिस्थिती बदलली आहे. कोविड नियंत्रणात यावा म्हणून शासन-प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क-फ्रॉम-होम व ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु याचा परिणाम म्हणून डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे.

सध्या म्युकर मायकोसीस हा रोग जोर धरत असून त्यावर नियंत्रण मिळावे याकरता डोळ्यांची तपासणी तात्काळ करून घेणे हिताचे आहे असे त्यांनी सांगितले. आजकाल काम आणि खेळ दोन्हीसाठी एकच तंत्रज्ञान वापरलं जातं. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेट ची असो. या स्क्रीन वर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होवून डोळ्यांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जड होणे, डोकेदुखी असे त्रास होतात. जर ही सवय सोडली नाही तर आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल. जर डिजिटल साधने वापरायची असतील तर कमीत कमी एक तासामध्ये तीन वेळा २० सेकंदाच्या ब्रेक घेणे आवश्यक आहे. याबरोबर बैठे काम करतांना बसण्याच्या पध्दतीवर लक्ष ठेवले पाहिजे. सध्या लाईफस्टाइल बदलल्याने कमी वयातही मोतीबिंदूचे रुग्ण दिसून येतात.

म्युकर मायकोसीस प्रकारात प्रथम नाकावाटे विषाणूचा शिरकाव होतो त्यामुळे वेळीच जागरूक राहिले पाहिजे. नाक, डोळे आणि मेंदुवर याचा परिणाम होतो. डोळे सुजणे, नाकातून घाण वास येणे, डोळ्यांची बाजू दुखणे, डोळा पुढे येणे अशी लक्षणे दिसून येतात यासाठी जनजागृती करणे खुप महत्वाचे असून यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आमच्याकडून शाळांना तसेच शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला गेला पण त्याकडे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारावर वाढ झाली आहे. असे आजर होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर माहिती देण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी डोंबिवलीतील शाळांना संपर्क केला होता. लहान मुले आणि पालवर्गासाठी आठवड्यातून एकदा माहितीपर ऑनलाईन जनजागृती करू या. यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारणार नाही असे डॉ.अनघा हेरूर यांनी शाळा व्यवस्थापनांना सांगितले होते. मात्र एकही शाळेने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नाही अशी खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे.

राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली. अनाथांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची भावना देखील भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाल्याच्या त्रासाला कंटाळून भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात बसून केले आंदोलन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमध्ये नाल्याचे काम होत नसल्याने कंटाळून शेवटी भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केले. नाल्याचे काम न झाल्याने पाणी तुंबून परिसरातील नागरिकांच्या घरात जाते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती एकदम वाईट असते, वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकारी सुशील पायल आणि स्थानिक काही नागरिक नाल्यात उतरले, नाल्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभागक्षेत्र हद्दीतील वार्ड क्र.१३ मोहने गावठाण परिसरात बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशिलकुमार पायल यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्राव्दारे दिला होता. पालिकेला इशारा देऊन सुद्धा याची दखल न घेता नाल्याचे काम सुरु न झाल्याने अखेर आज सुशील पायल यांनी स्थानिकांसमवेत याठिकाणी नाल्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या, सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया महापालिकेचे ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

राज्यस्थान येथे जिवे ठार मारण्याची सुपारी देणाऱ्या आरोपीला डोंबिवली येथून अटक

संपादक: मोईनसय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १६/०६/२०२१ रोजी आदित्य पन्नालाल जैन, वय -४१ वर्ष, राहणार:- अवधपुरी, गांधीपथ, जिल्हा:- जयपुर, राज्य:- राजस्थान हे त्यांचे गाडी साफ सफाई चे काम करत असताना त्यांचेवर दोन अनोळखी इसमाने मोटरसायकलीवर येऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी आदित्य जैन यांचे हाताला लागून ते गंभीर जखमी झाले त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करणी विहार पोलीस ठाणे, जिल्हा :- जयपूर, राजस्थान येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१ भा.द. वि. कलम ३०७,१०९,३४ शस्त्र कायदा ३,२५ प्रमाणे दाखल आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात आदित्य जैन हे त्यांचे पत्नी व परिवारासह २०१८ ते २०२० या कालावधीत डोंबिवली येथे राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा कमलेश शेषराव शिंदे हा नेहमी त्यांचे दुकानात येत जात असायचा व फिर्यादी यांची पत्नी शेफाली हिचेवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ लागला त्यामुळे फिर्यादी परिवारासह राजस्थान येथे राहण्यास गेले. परंतु कमलेश शिंदे याने फिर्यादी याना जीवे ठार मारण्याकरिता एका इसमाला सुपारी दिली त्या नुसार दोन इसमानी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर वरील प्रमाणे जीवघेणा हल्ला केला सदर गुन्ह्याचे तपास कामी दिनांक २१/०६/२१ रोजी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले असता गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण व घटक ४ उल्हासनगर कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कमलेश शेषराव शिंदे यास देवीचा पाडा डोंबिवली पश्चिम येथून तांत्रिक विश्लेषण करून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कामी राजस्थान पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखा, ठाणे शहरचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार वपोनी तरडे, वपोनी संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली पोउनि नितीन मुदगुन, पोउनि गणेश तोरगल, पोउनि मोहन कळमकर, स.फौ. पालांडे, पोहवा घोलप, दत्ता भोसले, राजेंद्र खिलारे, शिर्के, पोशि जरग, राजपूत, कोरडे यांचे पथकाने केली.

कोविन ऍपवरील नवीन बदल; ५० टक्के ऑनलाईन नोंदणी तर ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविन ऍपवर झालेल्या नवीन बदलामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करणे बंधनकारक असून ऍपमधील नवीन बदलानुसार ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतरच उर्वरीत ५० टक्के वॉक इन पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे.

यासाठी दररोज सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन ऍपवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन ऍपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान महापालिका क्षेत्रातील ४५ वर्षावरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असून इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना सर्वच केंद्रावर लस देण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.