दिनांक ३० मे रोजी डोंबिवलीतील विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे गाडीखाली पडून मृत्यू झाला होता. पाटील यांची घरची परिस्थिती तशी बिकट असल्याने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला होता. पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना पुढे आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेतर्फे शिवसेना शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मॉडेल शाळा आणि कॉलेजचे व्यवस्थापक बांबर्डे ह्यांची भेट घेऊन मुलीच्या मोफत शिक्षणाबद्दल निवेदन दिले. पाटील यांची मुलगी ज्या मॉडेल शाळेत शिकत आहे, त्यांच्या घरात कमावते कोणी नसल्यामुळे व्यवस्थापनाने त्यांचे शालेय व पुढे महाविद्यालयीन पदवी पर्यंतचे शिक्षणाची फी माफ करावी अशी विनंती शिवसैनिकांनी केली.
या महाभयंकर कोरोना संसर्गाच्या महामारीत शाळेने व कॉलेजने फी भरण्याकरिता विद्यार्थी व पालकांना कोठेही दबाव न आणता त्यांना फी मध्ये सवलत देवून ती टप्या टप्यात जमा करावी तसेच ज्याची सध्या परिस्थिती अत्यंत बिकट आहे अश्या विद्यार्थ्यांना जमल्यास फी माफ करावी अशीही विनंती करण्यात आली. त्यावेळी बांबर्डे साहेब ह्यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही नक्कीच योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही दिली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, महिला शहरासंघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे, माजी परिवहन सभापती सुधीर पाटील, कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहरसंघटक संजय पावशे आदी सामील होते.
उद्या जर का ही ४५ कुटूंब अपघातात दुर्दैवी मृत्यू पावली तर त्याला सरकार जबाबदार.. ?
चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांची इमारत मालवणी इथल्या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या १५ वर्षांपासून इथले रहिवाशी जीव मुठित घेवून राहत आहेत. दुसरा पर्याय नसल्यानं करायचं काय असा प्रश्न इथल्या रहिवाश्यांसमोर आहे. त्यामुळे हे रहिवासी याच अतिजीर्ण इमारतीत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये ही तीन मजली इमारत बांधण्यात आली. त्यावेळी या ईमारतीमध्ये एकूण १२२ कुटुंब राहत होती. मुंबईतल्या गिरण्या हाळू हाळू बंद पडू लागल्या. त्यातच २००१ मध्ये स्वदेशी मिल ला देखील टाळे लागले. गिरणी बंद झाल्यानं या इमारतीकडे कंपनीने लक्ष्य देणं टाळलं. आणि काही वर्षातच या इमारतीची अवस्था अत्यंत दयणीय झाली. या ईमारतीला बाहेरून पाहिलं की आता मध्ये जाण्याची हिंमत होत नाही. बाल्कनीचे तुटलेले कठाडे , तुटलेलं सिलिंग या ईमारतीच्या दयनियतेची साक्ष देतात.
ज्या रहिवाश्यांकडे पैसे होते ते रहिवासी दुसरीकडं रहायला गेले. मात्र ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही असे रहिवासी जुण्याच ठिकाणी राहू लागले. या इमारतीमध्ये सध्या ४५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या इमारतीचे पिलर गंजले आहेत. पिलरमधून बाहेर येणाऱ्या गंजलेल्या सळ्या या इमारतीची दयनीय कहाणी सांगण्यास पुरेश्या आहेत. एखादा वयोवृद्ध व्यक्ती काठीचा आधार घेवून जसा उभा असतो तशीच ही ईमारत टेकूचा आधार घेवून उभी आहे. पावसाळ्यात जरी डोक्यावर छत असलं तरी छताच्या तुटक्या फटीतून पाऊस घरात प्रवेश करतोच. पावसाळा आला की इथल्या नागरिकांचे भय दुनावतं. वारा सुटला की काळजाचा ठोका चुकतो. पावसाळ्यात मनपा नोटीस देते पण पर्यायी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत नाही असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते २१ जून २०२१ पर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.
विविध भागांमध्ये कोविड १९ बाधितांची कमी-अधिक प्रमाणातील रुग्ण संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात निर्बंध लागू करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येकी १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलो महानगरपालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक (Separate Administrative Unit) म्हणून विभागण्यात आले आहेत.
तर उर्वरित मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव.बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक (Single Separate Administrative Unit) निर्माण करणेत आला आहे.
ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र स्वतंत्र प्रशासकीय घटक वगळून उर्वरित) एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for Breaking the Chain अंतर्गत स्तर ३ (Level 3) या स्तराचे निर्बंध खालीलप्रमाणे लागू करत आहे.
१) सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. २) अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. ३) मॉल्स / सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रिन / नाटयगृहे इत्यादी बंद राहतील. ४) रेस्टॉरेंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं. ४.०० वा. नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/ पार्सल सर्व्हीस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील. ५) उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. ६) सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत सुरू राहतील. ७) खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून )सुरू राहतील. ८) कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह (खाजगी जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील. ९) क्रिडा सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील. १०) चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं. ५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही. ११) सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत सुरू राहतील. १२) लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील. १३) अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल. १४) बैठका स्थानिक संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका हॉलच्या सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील. १५) बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं. ४.०० वा. पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल. १६) कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील. १७) ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील. १८) जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील. १९) व्यायामशाळा/ केश कर्तनालय / ब्यूटी सेंटर्स / स्पा / वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील, परंतु गिर्हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही. २०) सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतु, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. २१) मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तीसह वाहन चालक हेल्पर स्वच्छक किंवा इतर असे एकूण ३ लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील. २२) खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५० मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील. २३) उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील. २४) उत्पादनाच्या अनुषंगाने १. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह २) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते.ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही) ३) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन ४) अत्यावश्यक गंभीर स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील. २५) उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदरचे आदेश दि.१४ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दि.२१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत लागू राहतील. वरील आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे भाऊ आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतो ते कमी किंमतीत ओळखीने मिळवून देतो तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अशी बतावणी करीत एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून राजन गडकरी आणि आनंद गडकरी या बाप-लेकाविरोधात विष्णूनगर पोलीसांनी दोघा भामट्यांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून विष्णुनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल पळसमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली.
अमोल हे राजन गडकरी यांच्या घरी गेले असता राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने त्यांना आमचे स्टेशन जवळ सोन्याचे दुकान आहे. माझे भाऊ नितीन गडकरी हे मंत्री आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतात ते कमी किमतीत तुम्हाला ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, असे गडकरी पिता-पुत्रांनी पळसमकर यांना सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून अमोल यांनी पाच लाखांचा चेक सुपूर्द केला. एक ते दोन महिन्यांत तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन गडकरी यांनी सांगितले. परंतु दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. गडकरी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने अमोल गावी निघून गेले. २५ मे रोजी ते पुन्हा पैसे मागण्यासाठी गडकरी यांच्याघरी गेले असता त्यांचे कुटुंब घर सोडून गेल्याची माहिती शेजाऱ्यांकडून अमोल यांना मिळाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रां विरोधात तक्रार दाखल केली.
या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मात्र या सर्व प्रकराबाबत पोलीसांनी हे कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
गडकरी कुटुंब बेपत्ता, सुनेची पोलीसात तक्रार..
राजन गडकरी, पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातू रुग्वेद, हे २४ मे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार सून गीतांजली गडकरी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. लहान मुलाला दवाखान्यात डोस देण्यास घेऊन जातो असे सांगून घराबाहेर पडले आणि ते आले नसल्याचे गीतांजली यानी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे.
लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी याबाबीचा गांभीर्याने विचार करुन स्वखर्चाने नेरुळ, अंबरनाथ, बदलापूर येथील रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करुन दिले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांचे महिला रिक्षा चालकांनी आभार मानले.