Home Blog Page 250

‘मुलींना मोबाइल देऊ नका, फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात’ युपी महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलंय. त्यांनी असेही म्हटले आहे की जर मुली बिघडल्या तर त्यासाठी त्यांची आई पूर्णपणे जबाबदार आहे. मीना कुमारी काही कार्यक्रमानिमित्त बुधवारी अलिगड येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मीना कुमारी म्हणाल्या, की “समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे. मुली मोबाईलवर तासनतास बोलत असतात. मुलांसोबत फिरत असतात. त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत, कुटुंबियांना याची माहिती नसते. आणि मग मोबाईलवर बोलता बोलताच त्या मुलांबरोबर पळून जातात.

आवाहन करताना त्या म्हणाल्या की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर त्यांचे पूर्ण निरीक्षण करा. त्या म्हणाल्या की मातांवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुलींचा नाश झाला तर त्यासाठी आईच जबाबदार आहेत. यावेळी त्यांनी आवाहन केले की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर मुंलींवर लक्ष ठेवा. त्या म्हणाल्या की आईवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुली वाईट मार्गाला जात असेल तर त्यासाठी आईच जबाबदार असते.

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे महिलेचा मृत्यू; आरोपींना अटक!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. हि घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मोबाईल चोरांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, सदर महिला हि ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कामाला होती. ती मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली. त्यांनी मॉलजवळील रिक्षा थांब्यावरून रिक्षा पकडली. रिक्षा तीन हात नाका येथे आली असता, मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सदर महिलेच्या हातातील मोबाइल खेचला. त्यावेळी तोल जाऊन ती महिला रिक्षातून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मैत्रिणीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोन्ही मोबाईल चोरांना अटक केली.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर विभाग पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारनाका, ता. डहाणू, जि.पालघर येथे पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान, एका टेम्पोमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल मिळून आला.

सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला आहे हे माहित असतानाही शासकीय आदेशाची अवहेलना करून यातील ३ इसम हे तंबाखूजन्य पदार्थाचा माल विक्री करण्यासाठी वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून तंबाखूजन्य माल आणि टेम्पो असा एकूण रुपये २१,८,८९६/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीआरएफ पथका सोबत मनपा आयुक्तांनी केली धोकादायक इमारतींची पाहणी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची पाहणी केली. हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम मधील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.

कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टीच्या काळात कोसळून दुर्घटना होण्याचा संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी अथवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.

तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज एनडीआरएफचे टिम बरोबर आम्ही पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्‍डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल याची तयारी करण्यासाठी आज आम्ही कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये एनडीआरएफच्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

बजाज फाईनान्सच्या नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर कल्याण क्राईम युनिट-३ चा छापा

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

सद्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमाने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून पोलिस विभागा तर्फे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपिंवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे.

बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळी बाबत नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण (सद्या स. पो.नि/ ए. टी. एस. नांदेड ) यांनी काही तक्रारदार यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर टोळी डोंबिवली, जिल्हा- ठाणे येथे असल्याची माहिती मिळवून पोउनि/नितीन मुदगुन, गुन्हे शाखा, ठाणे युनिट ३, कल्याण यांना संपर्क साधला त्या नंतर गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून केवळ मोबाईल लोकेशन वरून अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्स असलेल्या परिसरात सुमारे १५ ते २० दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटर निश्चित शोधून काढले त्या नंतर इतवारा पो.स्टे. नांदेड येथे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांची एफ आय आर नोंद केली परंतु त्या दरम्यान लॉक डाउन सुरू झाल्याने नमूद कॉल सेंटर चे कामकाज त्या ठिकाणी बंद करून वेगवेगळ्या लोकेशन वर सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची घाई न करता वारंवार तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवले.

मागील १० ते १२ दिवसा पूर्वी पुन्हा पूर्वीच्या ठिकाणचे कॉल सेंटर चालु झाल्याने नांदेड येथील पोलीस पथकाला संपर्क करून दिनांक ०९/०६/२०२१ रोजी नांदेड येथील पो उ नि /काळे व पथक तसेच गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याणचे, सपोनि/दायमा, पो उ नि /मुदगुन, पो उ नि /कळमकर व पथक यांनी गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सिटी मॉल पहिला माळा ११६, पेंढारकर कॉलेज जवळ, डोंबिवली या ठिकाणी इतवारा पोलिस ठाणे, नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 80/20 भादंवि कलम 420,406 प्रमाणे दाखल गुन्ह्यात बनावट कॉल सेंटरवर संयुक्तपणे छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी आरोपी नामे दिनेश मनोहर चिंचकर, वय- ३१ वर्ष, राहणार- न्यू साईनाथ कॉलनी, रामदास वाडी, कल्याण व रोहित पांडुरंग शेरकर, वय- २८ वर्ष, राहणार- काकाच्या ढाब्याजवळ, कल्याण पूर्व हे १८ ते २० कर्मचारी नोकरीस ठेऊन उत्तर प्रदेश राज्यातील काही साथीदाऱ्यांचे मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असताना मिळून आले आहेत. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना लोन पास करणे करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे.

सदर ठिकाणाहून २६ मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये १,१०,०००/- कींमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर बनावट कॉल सेंटर स्थापन केलेला इसम व मॅनेजर म्हणून काम पाहणारा इसम यांना अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी यांचे कडे अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो.ठाणे शहर, श्री. जय जीत सिंग, मा. पोलीस सह आयुक्त सो. श्री. मेकला, मा. अपर पोलीस आयुक्त सो. श्री. येनपुरे, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. पाटील, मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. शेवाळे, नांदेड मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. श्री. कदम यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, ठाणे घटक -३ कल्याण चे व इतवारा पोलीस ठाणे नांदेड चे पोलीस पथकाने केली.