Home Blog Page 255

नगर जिल्ह्याला अनलॉकची कोणतीही सवलत मिळणार नाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दरासह ऑक्सीजन बेडवरील रुग्णांची संख्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू

एकीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आजपासून मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची गती आणि जिल्ह्यात चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण ऑक्सीजन खाटांवर असल्यामुळे जिल्ह्याला आजपासूनच्या अनलॉक मधून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आसपासचे जिल्हे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असले तरीही अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणेच सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु राहतील या वृत्ताला संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.

राज्य शासनाने आजपासून १५ जून पर्यंत पंधरा दिवसांपर्यंत लोकडाऊन वाढवला आहे. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, तसेच तेथील ऑक्सीजन खाटा चाळीस टक्‍क्‍यांहून कमी भरलेल्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून अत्यावश्यकसह अन्य व्यवसायांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्हे आजपासून खुले राहणार आहेत, मात्र त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. त्यासोबतच वैद्यकीय आस्थापना व औषधांची दुकानेही सुरु ठेवण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंगळवारपासून बदल होईल असे जिल्हावासीयांना अपेक्षित होते, मात्र आजच्या तारखेला जिल्ह्यात १० हजार ८८४ सक्रिय रुग्ण असून चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक ऑक्सिजनच्या खाटा व्यापलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याची सरासरी गतीही दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नवीन अनलॉक नियमांचा अहमदनगर जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून पुढील पंधरा दिवस आहे त्याच नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. या वृत्ताला संगमनेरचे इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.

यंदाची सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह

सीबीएसई बोर्डाकडून यंदाची बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विविध राज्यातील शिक्षण मंडळांनी घेतला होता.

पण कोरोनाची दुसरी लाट आणि वाढती रुग्णसंख्या पाहता बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सीबीएसईची बारावीची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही बारावी परीक्षाप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ३ जून रोजी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आपली बाजू सर्वोच्च न्यायालयातही मांडावी लागणार आहे.

सुरक्षेसह हजारोंच्या आरोग्याचीही रक्षणकर्ती, महिला पोलिसाचे करोना रुग्णांसाठी मोलाचे योगदान

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाकाळात कित्येक सहृदयी पोलिसांनी समाजभान जपत नागरिकांची सेवा केली.
मुंबईतील सशस्त्र दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या रेहाना शेख यांनी मात्र गेल्या सव्वा वर्षात आपल्या कामासह राज्यभरातील हजारो कोरोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांपासून सर्व प्रकारची मदत मिळवून देत सेवाव्रताचा नवा आदर्श समोर ठेवला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलात कोरोना संसर्ग बऱ्यापैकी फोफावला होता.
याच काळात एका अडलेल्या सहकाऱ्याने त्यांच्याकडे आपल्या वृद्ध आईसाठी रक्तद्रव (प्लास्मा) उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

रेहाना शेख यांचा दांडगा जनसंपर्क आणि मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यांतून तातडीने या सहकाऱ्याच्या आईला प्लाझ्मा मिळाला. त्यानंतर शेख यांनी करोना रुग्ण आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना लागणारी मदत मिळवून देण्याचा चंग बांधला. बाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन, टोसिलीझुमॅब इंजेक्शन आदी औषधे, खाट, प्लास्मा, रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रेहाना यांनी आपला जनसंपर्क कामी आणला.
आपली नोकरी, संसार आणि दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बहिणीची शुश्रूषा या सर्व आघाड्यांवर पुरून त्यांनी समाजसेवेचा हा गाडा अविरत सुरू ठेवला.

राज्यातील विविध भागांतून त्यांचा फोन चोवीस तास मदतीसाठी खणखणू लागला आणि गरजूंना मदत मिळेस्तोवर त्यांच्यासाठी रेहाना शेख झटत राहिल्या. मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कोव्हिड कक्षातूनही रेहाना यांना विनंत्या येऊ लागल्या.

ठाण्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक; ३ गुन्हे उघडकीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमास वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करून मोटार सायकल चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांची ठाण्यातील शास्त्री नगर भागातील गंगातारा बिल्डिंग, मिलन हिल्स जवळ सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली स्कुटर चोरी झाली असल्याबाबत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु असता, सदर स्कुटरची चोरी करणारा इसम हा स्कुटरसह यशोधन शाळा, शास्त्री नगर, ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली. सदर मिळलेलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून वर्तक नगर पोलिसांनी सदर इसमास अटक केली.

त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली स्कुटर आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडे खडसावून केलेल्या अधिक चौकशीत त्याने त्याच्या साथीदारासोबत केलेले मोटार सायकल चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

‘ब्रेक दि चेन’ चे आदेश १५ जूनपर्यंत राज्यभरलागू

 

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार!

‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली .

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील…

२०११ च्या जनगणनेनुसार १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी…

वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ‘ब्रेक दि चेन’ आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील

दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी…

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश माहिती व संदर्भासाठी…

कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

कोविड-१९ व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.