Home Blog Page 259

६७ लाख रूपये किंमतीचे बनावटी विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे.

गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवलीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत सोन्या-चांदिचे दागिने चोरणाऱ्या एका इसमास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादींच्या कपाटात ठेवलेल्या ४१,०००/-रू. कि.च्या ९ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या) व एक चांदीचे कर्णफुल असे सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाले असल्याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने व.पो.नि नारायण व्हि.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्हि.एस.कडलग, पो.उ.नि. एन.टि.वाघमोडे, पो.ह.श्याम सोनावणे, पो.ना.गोरखनाथ घुगे, पो.ना.दिपक भावसार, पो.शि.कृष्णा दुमाडा यांनी तपास करून सदर इसमास अटक केली.

त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी ४०,५००/-रू.कि.च्या ३ सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पो. ह. श्याम सोनावणे करीत आहेत.

लशींचा पुरेपूर वापर,वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प; महापालिकेचे यशस्वी नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून आखले जात असले तरी लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे.
त्यामुळे लस तुटवडा लक्षात घेऊन उपलब्ध साठय़ातून लस वाया जाणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. महापालिका हद्दीत लस वाया जाण्याचे प्रमाण २.५१ टक्के आहे. हे राज्यातील सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असली तरी येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
यामुळे दुसऱ्या लाटेनंतर महापालिकांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शहरात लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविली आहे.
त्या तुलनेत लशींचा पुरवठा होत नसल्यामुळे पालिकांना अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.

लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे उपलब्ध साठय़ातील लशींचा पुरेपूर वापर करण्यावर पालिकांकडून भर दिला जात आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिका प्रशासनानेही लशींचे पुरेपूर वापर केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५५ लसीकरण केंद्रे आहेत.
या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी नागरिकांना देण्यात येतात.
शहरात आतापर्यंत एकूण ३,४१,९५० लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत.

महाराष्ट्रात आता होम आयसोलेशन 100 टक्के बंद! कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

संपादक: मोईन सय्यद / मुंबई प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार उडवला. अशावेळी आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून यापुढे महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद म्हणजेच गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा इतर राज्यापेक्षा जास्त आहे तिथे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करण्यात आलं आहे. याबाबतचा निर्णय आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केला आहे.

या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता यापुढे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला जरी लक्षणं नसली तरीही त्याला कोव्हिड केअर सेंटरमध्येच राहावं लागणार आहे.

आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करा आणि कोव्हिड केअर सेंटरची संख्या वाढवा. सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट करा.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गावागावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश हे केंद्र सरकारनेसुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा १५ व्या वित्त आयोगाची जो निधी ग्रामीण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहे त्यातून २५ टक्के खर्च हा कोव्हिड केअर सेंटर उभा करण्यासाठी म्हणजे २५ ते ३० बेड निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने देण्यात आली आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.