Home Blog Page 260

मुंब्र्यातून साडेचार लाखाचे गोमांस (बीफ) जप्त करत दोघांना अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यातील मुंब्रा-कौसा येथून पोलिसांनी १ हजार ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे ४ लाख ५६ हजार रुपये इतकी आहे. तसेच दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील कौसा येथे असणाऱ्या साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर गळा नं.३ मध्ये अनधिकृतरित्या जनावरांची कत्तल करुन ते मांस विक्रीकरीता ठेवली असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्या अनुशंगाने पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर असलेल्या गळा नं.३ मध्ये सिकंदर मुमताज अहमद खान,आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

संपादक: मोईन सय्यद / कल्याण प्रतिनिधी: गुलाब शेख

कल्याण येथील कचोरे गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू उचलण्या साठी रस्त्यावर धावत गेलेल्या 12 वर्षीय मुलाला मागून येत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता त्याला ताबडतोब उचलून रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 12 वर्षांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

मिरा भाईंदर महानगपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी केला भाजपमध्ये अधिकृत प्रवेश? विरोधी पक्षांनी केला आरोप!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

मिरा भाईंदर महानगपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला असून ते भाजप कार्यकर्त्या प्रमाणे महासभेचे कामकाज करीत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेत्यांसह शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी केला तर भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी वासुदेव शिरवळकर महासभेचे कामकाज पक्षपातीपणे करीत असल्याचा आरोप करून त्यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक नगरसचिव पदावर करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारावरून महापालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे की काय? असा सवाल शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

आधीच्या महासभेची तहकूब महासभा गेल्या बुधवारी 19 एप्रिल रोजी बोलावण्यात आली होती या महासभेत परिवहन सेवेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी असा ठराव भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी मांडला होता. त्याच वेळी या ठरावाच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी देखील ठराव मांडला आणि आपल्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी दोन वेगवेगळे ठराव मांडल्यामुळे या ठरावांवर मतदान घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आणि या ऑनलाईन महासभेमध्ये सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवक गैरहजर असल्याने बहुमत मिळविण्यासाठी भाजपच्या नेत्यांची एकाच तारांबळ उडाली होती. महासभा चालू असताना महापौर ज्योत्सना हसनाळे अचानक उठून सभागृहात बाहेर गेल्या तर त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर आणि आयुक्त देखील उठून बाहेर निघून गेले आणि या सगळ्या गोंधळामुळे महासभेत नक्की हे सर्व चालले आहे तरी काय?असा प्रश्न उपस्थितानां पडला.

दरम्यान भाजच्या नेत्यांकडून या महासभेत गैरहजर असलेल्या नगरसेवकांना फोनाफोनी करून ऑनलाईन हजर राहून मतदानात सामील होण्यासाठी फर्मावण्यात आले. परंतु ज्यावेळी महासभा चालू होते त्यावेळी उपस्थित नगरसेवकांची संख्या किती? आणि प्रत्यक्ष मतदानात भाग घेतलेले नगरसेवकांची संख्या किती? हे सांगण्यास नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी मात्र नकार दिला आणि सत्ताधारी भाजपच्या बाजूने संख्याबळ पुरेसे नसताना गैरहजर असलेल्या नगरसेवकांना मतदानात सामील होण्याची संधी नगरसचिव यांनी दिली असा आरोप शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आणि गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे.

अखेर भाजपच्या दोन्ही ठरावांवर मतदान घेतले असता ठरावाच्या बाजूने 42 तर भाजच्या बंडखोर नगरसेवकांसह शिवसेनेची सर्व मते मिळून ठरावाच्या विरोधात 31 मतं पडली तर काँग्रेसचे 07 नगरसेवक तटस्थ राहिले अशी एकूण उपस्थित नगरसेवकांची संख्या 80 असल्याची माहिती नंतर नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी दिली आहे परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किती नगर सेवक उपस्थित होते? जे गैरहजर होते त्यांना मतदान करण्याची संधी का देण्यात आली? या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

मुळात महासभेत जेंव्हा एखादा ठराव मांडला जातो त्यावेळी महासभेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सदस्यांनाच मतदान करण्याची संधी दिली जाते. तात्पुरत्या कामासाठी किंवा अगदी स्वच्छता गृहाचा वापर करण्यासाठी देखील सभागृहाच्या बाहेर गेलेल्या सदस्यांना मतदान सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जात नाही किंवा त्यांना मतदानात भाग घेता येत नाही असा सभाशास्त्राचा नियम असताना बुधवारी झालेल्या महासभेत मात्र ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन आणि सभागृहाचे नियम धाब्यावर बसवून गैरहजर सदस्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष शिवसेनेने केला आहे.

नगरसचिव सभागृहात पक्षपातीपणे कामकाज करीत असून सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे कामकाज करीत आहेत यापूर्वी देखील अनेकवेळा नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी सत्ताधारी भाजपला झुकते माप देत त्यांच्या सोयीची भूमिका घेतली आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी तर थेट महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून वासुदेव शिरवळकर यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डोंबिवलीत ११ हजारहून जास्त नागरिकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२१ दिवसात ११ हजाराहून जास्त डोंबिवलीकरांची पसंती

डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहरशाखा येथे कोरोना काळात नियमित मोफत शिवभोजन थाळी सुरु असून दररोज ५०० हून अधिक नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळतोय. कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य व गरजू लोकांना पोटभर जेवण मिळण्याच्या उद्देशाने मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मोफत शिवभोजन थाळी देण्याचे जाहीर केले होते. याच उद्देशाने व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने, श्री.राजेश गोवर्धन मोरे (शिवसेना शहर प्रमुख, माजी सभागृह नेता) यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने गरीब व गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप सुरु केले आहे. वाटप सुरु झाल्यापासून आतापर्यंत दररोज ५०० हून अधिक गरजू नागरिक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.

शिवभोजन थाळी म्हणजेच नुसती चपाती भाजी नव्हे तर दररोज २ चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, वरण, भात, लोणचे ई. अन्नपदार्थांचा समावेश या शिवभोजन थाळी मध्ये असून रोज नवीन नवीन पौष्टिक व सकस अशा भाज्यांचा समावेश केला जातो. “शिवभोजन थाळी” साठी जेवण बनवण्यासाठी ‘आई एकविरा’ व ‘माउली’ या महिला बचत गटांना याची जबाबदारी सोपविण्यात आली असून या बचत गटांमधील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे.

राज्यभरात लॉकडाऊनची परिस्तिथी असल्यामुळे ‘शिवभोजन थाळी’ हि पार्सल स्वरुपात नागरिकांना दिली जाते. या योजनेमुळे अनेक गरीब निराधार व गरजू लोकांना पोटभर सकस व चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळत असल्याचे नागरिक स्वतःहून शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेस भेट देऊन सांगत असल्याचेही पाहायला मिळत असल्यामुळे त्यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व राजेश मोरे, शहर शाखेचे आभार मानले.

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी; बाधित आढळल्यास तात्काळ कोरोना केंद्रात दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत पालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन मात्र पालिकेने केले आहे.

दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट गेल्या मार्च महिन्यापासून ठेवले होते.
यामध्ये समुद्र किनारे, मॉल, खाऊगल्ल्या अशा सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचे पालिके ने निश्चित केले व त्यानुसार चाचण्याही केल्या.
सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही पालिके ने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिलाच आहे. त्यानुसार आता मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी केली जाणार आहे.

चालक दिवसभरात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात.
घरी गेल्यानंतर पत्नी, मुलांच्याही संपर्कात येतात. त्यामुळे धोका न पत्करता त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

चालक बाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेरील थांबे येथे कोरोना चाचणीसाठी शिबिरे घेतली जाणार असून चालकांना कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांनाही कल्पना दिली जाणार आहे.