Home Blog Page 262

मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर उपचार सुरूच; नांदेड मधील धक्कादायक प्रकार!

संपादक: मोईन सय्यद / नांदेड प्रतिनिधी

मराठवाड्यातील नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली.

याप्रकरणी मृत रुग्णाच्या पत्नीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर संबंधित रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल तसंच येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणे, उपचारात निष्काळजीपणा करणे, अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मुजामपेठ येथील रहिवासी असणाऱ्या अंकलेश पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अंकलेश यांना 16 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकानी गोदावरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 19 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. दुसरीकडे, नातेवाईकांकडून पैशांसाठी डॉक्टरांचा तगादा सुरूच होता. 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानच्या तीन दिवसांत डॉक्टरांनी फिर्यादी शुभांगी पवार यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणामुळे पडला बळी; पालिकेच्या वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / मिरारोड: प्रतिनिधी

मीरारोड (18 मे) – मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पत्राच्या खोलीत विजेचा प्रवाह वाहत असल्याची कल्पना नसल्याने दाराशी हात लावलेल्या शववाहिनीच्या चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा विजेचा धक्का लागण्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे हा बळी गेल्याचा आरोप होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे . सदर रुग्णालयात प्रभाग समिती कार्यालय आदी सुरु केले असून इमारतीवर मजले वाढवण्याचे काम सुरु आहे. ह्या कामासाठी रुग्णालयात असलेली वाहन चालकांसाठीची पक्की खोली पालिकेच्या बांधकाम विभागाने चक्क ठेकेदारास सिमेंट आदी सामान ठेवायला दिली आहे. तर वाहन चालकांना पत्र्याची खोली बांधून देण्यात आली आहे .
तौक्ते चक्रीवादळा मुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने पत्र्याच्या खोलीत व बाहेर पाणी साचले होते. सोमवारी रात्री ११. ३० च्या सुमारास शववाहिनीचे चालक धर्मलिंगम गोविंदन मुत्तू ( ६० ) रा. डॉ. आंबेडकर नगर, भाईंदर पश्चिम हे कामाची पाळी संपल्याने पत्र्याच्या खोलीत नोंदवही वर नोंद करून घरी जायला निघत होते. तर रात्रपाळी असल्याने राजेंद्र खेडेकर हे पालिका रुग्णवाहिकेची कर्मचारी आत येऊन बसले होते.

त्याचवेळी पत्र्याचे दार आणि पाण्याशी स्पर्श होताच धर्मलिंगम ह्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते खालीच कोसळले. खेडेकर हे प्लास्टिक खुर्ची वरून पाय खाली ठेवत नाही तोच त्यांना सुद्धा विजेचा धक्का बसून ते सुद्धा खाली पडले. त्यांनी सुरक्षा रक्षकास कळवले असता वॉर्डबॉय धावून येताच त्याला सुद्धा विजेचा शॉक लागला. त्या नंतर मुख्य स्विच बंद केला. परंतु तो पर्यंत धर्मलिंगम यांचा मृत्यू झाला होता. खेडेकर याना भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. धर्मलिंगम हे पालिकेच्या सेवेत होते. निवृत्ती नंतर ते ठेकेदारा मार्फत ठेक्यावर पालिकेत काम करत होते.

तलाठी अभिजित बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत त्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. नया नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असली तरी या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणाचा ठरला बळी

इमारतीचे मजले वाढवण्याच्या कामासाठी वाहन चालकांची पक्की खोली ठेकेदारास सिमेंट ठेवण्यासाठी देऊन वाहन चालकांना मात्र पत्र्याची असुरक्षित खोली बांधून दिली, त्याच बरोबर विजेच्या तारांचे योग्य नियोजन देखील नाही आणि म्हणूनच पाऊस पडून पाणी वाहिल्यामुळे पत्र्याच्या खोलीत विजेचा प्रवाह उतरला आणि त्यामुळेच हा बळी गेला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितां वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

एका दिवसात कोरोनामुळे ५० डॉक्टरांचा मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही यंदा उच्चांक गाठले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच कोरोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या लढवय्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं. कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील ‘गुरु तेग बहादूर’ रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला कोरोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे.

अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं लसीकरण झालं नव्हतं. “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसंच आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला असून हे कसं झालं हेच समजत नाहीये,” असं डॉक्टर आमीर सोहेलने म्हटलं आहे.

कोरोनाच्या आणखी लाटा भारतात येऊ शकतात, पुढील ६-१८ महिने अत्यंत महत्त्वपूर्ण असा WHO चा गंभीर इशारा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दुसरी लाट भारतासाठी अधिक धोकादायक ठरली आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतामध्ये हाहाकार उडाला आहे. या प्राणघातक विषाणूमुळे दररोज सुमारे ४००० लोकं या देशात मरत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड-१९ साथीच्या आगामी लाटांविषयी गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, आगामी काळात कोरोनाच्या अधिक लाटा भारताच्या अडचणी वाढवू शकतात. डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी गंभीर इशारा देताना सांगितले की, कोरोनाच्या लढाईत पुढील ६-१८ महिने भारताच्या प्रयत्नांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

प्रसारमाध्यमाला दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन म्हणाले, ‘महामारीच्या या युद्धामध्ये बरेचसे विषाणूच्या विकासावर तसेच व्हेरिएंट्स विरुद्ध लसीची प्रतिकार क्षमता यावर अवलंबून असते आणि लसीची प्रतिकारशक्ती किती काळ लोकांचे संरक्षण करते.’ हे खूप महत्वाचे आहे. यात बरेच बदल होत आहेत.

ते म्हणाले, ‘आम्हाला माहीत आहे की, कोरोना साथीच्या या प्राणघातक टप्प्याचा नक्कीच अंत होईल. २०२१ च्या अखेरीस, जेव्हा जगातील जवळपास ३० टक्के लोक लसीकरण करतात तेव्हा हे आपण पाहू शकतो. हीच वेळ आहे जेव्हा आपण सतत होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट पाहण्यास सुरुवात होईल. यानंतर, २०२२ मध्ये लसीकरणाला वेग येऊ शकतो.

डॉ.स्वामीनाथन म्हणाले की, आपण सर्वजण कोरोना साथीच्या अवस्थेतून जात आहोत, जिथे अजूनही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पुढच्या ६ ते १८ महिन्यांपर्यंत आमच्या कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल, जी खूप कठीण वेळ असू शकते. तरच आपण कोरोनावर नियंत्रण किंवा दूर करण्याच्या दीर्घकालीन योजनेबद्दल बोलले पाहिजे. आम्हाला माहीत आहे की लसपासून प्रतिकारशक्ती आणि नैसर्गिक संसर्गापासून प्रतिकारशक्ती कमीतकमी आठ महिने टिकते. जसजशी वेळ जाईल तसतसे आम्ही अधिकाधिक लस कशी टिकेल यावर भर देत आहोत.

उपचारांच्या प्रोटोकॉलवर भाष्य करताना डॉ. स्वामीनाथन म्हणाले, ‘लोकांना हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की, चुकीच्या वेळी चुकीचे औषध वापरल्याने फायद्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते. आता सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधांवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. ते म्हणाले, कोणताही देश या रोगाचा सामना करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रोटोकॉलचा अवलंब करु शकतो.

डॉ. स्वामीनाथन म्हणाले की बी१.६१७ हा कोरोनाचा अत्यंत संक्रमक प्रकार आहे. रुप सातत्याने परिवर्तित किंवा व्हायरसच्या विकसित केलेल्या आवृत्त्या आहेत आणि म्हणूनच व्हायरल जीनोममध्ये बदल आढळतात. आणि ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. RNA व्हायरस गुणाकार होत असल्याने, या व्हायरसची स्वतःस प्रतिकृती बनविण्यात मदत करते. यामुळे व्हायरस किंचित बदलतो. मुळात ही एक त्रुटी आहे, ज्याला विशेष महत्त्व नाही. त्यांचा कोणत्याही परिस्थितीत विषाणूवर परिणाम होत नाही.