Home Blog Page 263

मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या आज ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या.

श्री.पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ.शैलेश श्रीखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.आव्हाड म्हणाले की, टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांचे उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय असून या उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ, शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ.बी.ए.रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुट असलेल्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या १०० सदनिका नाममात्र दराने (रु. १ प्रति वर्ष) भाडेपट्टा करारनाम्यानुसार म्हाडाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी सांगितले.

सदनिकांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये करारनामा करण्यात येणार आहे, असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

डॉ.बडवे म्हणाले की, टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचारासाठी रुग्ण येत असतात. या रुग्णांवर उपचार पूर्ण झाले तरच ती रोगमुक्त होऊ शकतात. रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. या दोन ते तीन महिन्यांसाठी रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांनाही मुंबईत राहणे गरजेचे आहे. दाट लोकसंख्येच्या मुंबई शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ‘म्हाडा’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिका १०० रुग्णांना जीवदान देणाऱ्या ठरणार आहेत, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे डॉ.बडवे यांनी आभार मानले.

ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका लवकरच खाजगी औषध कंपन्यांकडून २ लाख कोरोना लसींची खरेदी करणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथे केंद्राकडून सतत राज्य शासनाला कमी जास्त लसींचा पुरवठा होत असल्यामुळे शहरांतर्गत लसीकरण मोहिमेला बाधा येत आहे, व्यत्यय निर्माण होत आहे. काही वेळा अनेक दिवस लसीकरण केंद्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीच उपलब्ध नसल्यामुळे बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाच्या या संक्रमणाचा सामना करण्यासाठी व कोरोनाचे समूळ निर्मूलन होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे, हा विचार ठेवून माननीय ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतेच ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केली की लवकरात लवकर जाहीर निविदेद्वारे आपापल्या महापालिकेसाठी खाजगी औषध कंपन्यांकडून लसी उपलब्ध करून घ्याव्या जेणेकरून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीं व्यतिरिक्त अतिरिक्त लसींचा साठा त्याच्या महापालिकेकडे उपलब्ध राहील व लसीकरण मोहिमेत खंड पडणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या एक-दोन दिवसात निविदा प्रक्रिया जाहीर करून लवकरात लवकर परस्पर खाजगी औषध निर्मिती कंपन्यांकडून सध्या सुरुवातीला दोन लाख लसी उपलब्ध करुन घ्यावी अशा सूचना माननीय पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या आहेत.

चक्रीवादळाला न जुमानता भर पावसात पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन; कोविडच्या नियमांचा उडाला फज्जा!

संपादक: मोईन सय्यद / मीरा भाईंदर प्रतिनिधी

फुकटच्या कार्याचे श्रेय घेण्याची हौस आणि प्रसिद्धीचा हव्यास यासाठी राजकीय नेते काय काय उपद्व्याप करतील? काहीच सांगता येणार नाही. याचा चांगलाच प्रत्यय आज मिरा भाईंदर शहरात नागरीकांना आला. एकीकडे तोक्ते चक्रीवादळाचा हैदोस, मुसळधार पाऊस तर दुसरीकडे जमावबंदी, कोविडच्या नियमांचे बंधन या सर्व गोष्टींना न जुमानता, भर पावसात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदर पश्चिमेकडील पं. भीमसेन जोशी रुग्णालयाच्या आवारात आज ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेता प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन व मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते मात्र आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि नियमांचे पालन करण्याची सर्व प्रथम जबाबदारी आपली आहे याचे भान यांपैकी कुणालाही राहिले नव्हते.

मिरा भाईंदर महानगरपालिका ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेकडे

मिरा भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात आणि त्यामुळे शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनची वाढती मागणी या गोष्टी विचारात घेत मिरा भाईंदर महानरपालिके तर्फे रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांना उपचार करताना मोठया प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती त्याची दखल घेत आमदार गीता जैन यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटची मागणी करून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या निधीची मंजुरी मिळवून घेतली होती. त्यानुसार भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भिमासेन जोशी रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला. त्याच ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज सोमवार दि. १७ मे, २०२१ रोजी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

भविष्यात मिरा भाईंदर शहरतील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून  1 कोटी 80 लाख रुपये खर्च करून या प्लांटची निर्मिती करण्यात आली असून प्रतिदिन १७५ ऑक्सिजनचे जंबो सिलेंडरची निर्मिती करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिरा भाईंदर शहराला या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची अत्यंत आवश्यकता होती असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले आहे. आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जमाबंदी, सोशल डिस्टनसिंग, तोंडाला मास्क लावण्याची सक्ती या नियमांचे बंधन देशातील सर्वच नागरिकांना घालण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या सर्व नियमांचे पालन आधी लोकप्रतिनिधी यांचे कडून केले जावे अशी रास्त अपेक्षा नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे गर्दी जमविणारे कार्यक्रम टाळून हाच कार्यक्रम प्रतिआकात्मक स्वरूपात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करून एक वेगळा आदर्श निर्माण करता आला असता. परंतु आजकालच्या राजकीय नेत्यांना कसलेच तारतम्य राहिले नसून फुकटच्या श्रेय घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून आपली हौस भागवून घेत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसाने कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा साधे तोंडावर मास्क न लावल्यास रोख दंडा सोबतच कठोर शिक्षा केली जात आहे. राजकीय नेत्यांना नियमांतून सूट आणि जनतेला मात्र कठोर बंधनं का? असा सवाल आता जनते कडून केला जात आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीच्या व नुकसानीच्या मोठ्या घटना

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे (सिंधुदुर्गनगरी)

तोक्ते या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मे पासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. अनेक घरांची पडझड होऊन छपरे उडून गेली आहेत. विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पहाटे चार वाजता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

समुद्र खवळलेला असून मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या नूतनीकरण सुरू असलेल्या सभागृहाच्या छपराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ४० घरांचे, तसेच दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. ३१ ठिकाणी झाडे पडली असून, तीन शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा आतापर्यंतचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात एकूण २७ घरांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी झाड पडले असून दोन शाळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. विजेचा एक खांबही या तालुक्यात पडला आहे.

दोडामार्ग तालुक्यात आठ झाडे पडली असून, सावंतवाडी तालुक्यात सहा ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे, तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात दोन घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. चार ठिकाणी झाडे पडली असून, एका ठिकाणी विजेचा खांबही पडला आहे.

मालवण तालुक्यात दोन ठिकाणी झाडे पडली असून, एका पत्र्याच्या शेडचे आणि वीजवाहक तारेचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात नऊ घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. दोन ठिकाणी झाडे कोसळली असून, एका ठिकाणी वीजवाहक तारेचे नुकसान झाले आहे.

मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ केंद्र सरकारवर सडकून टीका

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकीकडे लोक कोरोनामुळे संकटात असतांना दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. मात्र, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. मे महिन्यात एकूण आठ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाचे दर स्थिर होते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर दरवाढ सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज दिल्ली-मुंबईमध्ये पेट्रोल दरात विक्रमी वाढ झाली आहे. इंधनाच्या कच्च्या किंमतीत घट असूनही तेल विपणन कंपन्यांनी आज किंमती वाढवल्या आहेत. आज पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रमी उंचावर आहेत. त्याचबरोबर देशातील बर्‍याच भागात पेट्रोल १०० च्या वर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

काय आहे आजचा दर?

आजच्या बदलांनंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर ९२.३४ रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८२.९५ रुपये झाले आहे. मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.०९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रतिलिटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १००.३८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटरला विकले लखनौमध्येही पेट्रोलचे दर ९० पार झाले आहेत.