Home Blog Page 261

रिक्षा-टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी; बाधित आढळल्यास तात्काळ कोरोना केंद्रात दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील विविध भागांत पालिकेकडून चाचणीसाठी शिबीरे घेण्यात येतील. चालकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली नसली तरी त्यांना चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन मात्र पालिकेने केले आहे.

दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट गेल्या मार्च महिन्यापासून ठेवले होते.
यामध्ये समुद्र किनारे, मॉल, खाऊगल्ल्या अशा सार्वजनिक ठिकाणी चाचण्या करण्याचे पालिके ने निश्चित केले व त्यानुसार चाचण्याही केल्या.
सध्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरीही पालिके ने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिलाच आहे. त्यानुसार आता मुंबईत धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचीही चाचणी केली जाणार आहे.

चालक दिवसभरात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात.
घरी गेल्यानंतर पत्नी, मुलांच्याही संपर्कात येतात. त्यामुळे धोका न पत्करता त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई पालिके चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

चालक बाधित आढळल्यानंतर तात्काळ कुटुंबीयांतील सदस्यांचीही चाचणी होणार आहे.
रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड, रेल्वे स्थानकाबाहेरील थांबे येथे कोरोना चाचणीसाठी शिबिरे घेतली जाणार असून चालकांना कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांनाही कल्पना दिली जाणार आहे.

केंद्राच्या परवानगीनंतरच घरोघरी लसीकरण; पालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर करण्याकरता राज्य सरकार व पालिका प्रशासन केंद्र सरकारकडे बोट दाखवत घरोघरी लसीकरण करण्यास तयार नसल्याचे सांगणाऱ्या मुंबई महापालिकेच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मुंबई पालिका दबावाला बळी पडली, मुंबई पालिकेकडून अशा भूमिकेची अपेक्षा नव्हती, पालिकेच्या निर्णयाने आमची खूप निराशा केल्याचे ताशेरेही मे. न्यायालयाने ओढले. तर ही मोहीम राबवण्यास अन्य यंत्रणांना आडकाठी आणणाऱ्या केंद्र सरकारच्या भूमिके वरही मे. न्यायालयाने टीका केली. लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम होईल या शक्यतेच्या सबबीखाली घरोघरी लसीकरणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ करणारे केंद्र सरकार आणि त्यांचे अधिकरी हे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींबाबत असंवेदनशील आहेत, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सुनावले.

तसेच तज्ज्ञांच्या समितीकडून घरोघरी लसीकरणाच्या मोहिमेचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करा आणि १ जूनपर्यंत निर्णय कळवा, असे आदेशही मे. न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. या समितीने या मोहिमेला परवानगी दिली तर तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचेही मे. न्यायालयाने स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम राबवण्याचे आदेश द्या, अशी मागणी अ‍ॅड. धृती कपाडिया या वकिलाने जनहित याचिकेद्वारे मे.उच्च न्यायालयात केली आहे. त्याची दखल घेत केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही तुम्हाला आमच्या अधिकारात ही मोहीम राबवण्याची परवानगी देतो. त्यामुळे पालिका ही मोहीम राबवू शकेल का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने पालिकेला केली.

पदोन्नतीबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयास उच्च न्यायालयाची स्थगिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वांसाठी खुला करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. १० जूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राज्य शासकीय- निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीतील आरक्षण मे.मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, त्याविरोधात राज्य सरकारने मे. सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. न्यायालयात हे प्रकरण असतानाच राज्य शासनाने ७ मे रोजी पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द करुन, पदोन्नतीचा कोटा सर्वांसाठी खुला करण्याचा आदेश जारी केला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी रिक्त जागा भरण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मे.सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे मे.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहूनच ही पदोन्नती देण्यात आल्याची सरकारच्या वतीने ऍड. प्रतिभा गवाणे यांनी मे.न्यायालयाला दिली. त्यानंतर याचिकांवरील सुनावणी १० जूनपर्यंत स्थगित करून तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश मे.न्यायालयाने सरकारला दिले.

राज्य शासनाच्या सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा ७ मेचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटना तसेच मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली होती. त्यापैकी डोंबिवलीतूनही आरपीआय अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी ही राज्य सरकार ला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करून ३३ टक्के मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत रद्दबातलचा निर्णय मागे घेण्यात यावा असे आठवड्यापूर्वी जाहीररित्या पत्रही दिले होते.

उल्हासनगर च्या सेक्शन-१७ मध्ये चालणारा जुगाराचा क्लब उध्वस्त, १० ते १२ जणांची धरपकड

उल्हासनगर च्या सेक्शन-१७ मध्ये चालणारा जुगाराचा क्लब उध्वस्त, १० ते १२ जणांची धरपकड

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या कोरोनाच्या संकटात एकीकडे जिथे राज्यातील सगळ्या महापालिका कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व तो संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करत असतानाच दुसरीकडे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील उल्हासनगर सेक्शन-१७ येथील ‘हिल क्वीन’ बिल्डिंग मध्ये चालत असलेल्या जुगाराच्या क्लब वर भीमसेना नशामुक्ती अभियान च्या अध्यक्षा नितीका राव व त्यांचे सहकारी भरत तोलानी यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना क्लब कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लेखी पत्र देऊन पोलिसांना त्या क्लबवर कारवाई करण्यास भाग पाडत आणि विठ्ठलवाडी पोलिसांना सोबत घेत त्या क्लबवर धाड मारली. या धाडीत १०-१२ जुगारींना ताब्यात घेण्यात आले तर ७-८ जण पळ काढण्यात यशस्वी झाले.

या क्लबमध्ये जुगरींना मनसोक्त खेळण्यासाठी २ एसी व ५ टेबल असून ५-६ सी.सी.टीव्ही ने आधुनिकरित्या तो उभारला आहे म्हणूनच दररोज ३० ते ३५ लोकं या कोरोनाच्या महाभयंकर काळातही सोशल डिस्टनसिंग चे पालन न करता व मास्क न वापरता आपल्या जीवाशी खेळण्याकरता या क्लब मध्ये येत आहेत. पोलिसांनी या धाडीतून घटनास्थळातून काही चोपड्या, पत्त्यांचे ३०-४० कॅट अशी सामग्री जप्त केली आहे व गुन्हा नोंदवण्याची व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या जुगाराच्या क्लब विरोधात आधीपासून स्थानिकांच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या असून पोलिसांनी कारवाई करून सुद्धा हा क्लब दोनतीन दिवसांनी पुनश्च सुरू होत होता असे तेथील राहणाऱ्या एका स्थानिकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले व या धाडीनंतर तरी उल्हासनगर पालिका प्रशासन व झोन-४ चे उपयुक्त यांनी कठोर कारवाई करून हा क्लब कायमस्वरूपी बंद होईल अशी अपेक्षा बाळगली.

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून ८६१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी ; कोरोना रुग्णांकरिता त्वरीत मदतकार्यासाठीही करता येणार खर्च

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष २०२१-२२ मधील पहिल्या हप्त्यापोटी ८६१ कोटी ४० लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात रुग्णांसाठी त्वरीत मदतकार्य उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येईल.

८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

विविध मुलभूत सुविधा,स्थानिक गरजांनुसार खर्च करता येणार 

या निधीचा वापर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबींवर करावयाचा आहे. वादळ पाण्याचा निचरा आणि पाण्याचा साठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण (रोग, संसर्ग इ.पासून सुरक्षितता), मुलांचे कुपोषण रोखणे, ग्रामपंचायतींदरम्यानचे जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरूस्ती व देखभाल आणि स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण आणि मृत शरीर दफनभूमीची देखभाल, एलईडी पथदिवे व सौर पथदिव्यांचे बांधकाम, दुरूस्ती व देखभाल (सौर पथदिवे “वैयक्तिक खांब आधारित प्रणाली” किंवा “केंद्रीकृत सौर पॅनेल प्रणाली” असू शकते), ग्रामपंचायतीमध्ये पुरेशी व उच्च बँडविडथसह वाय-फाय डिजिटल नेटवर्क सेवा उपलब्ध करणे, सार्वजनिक वाचनालय, मुलांसाठी उद्याने तसेच इतर मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रिडा व शारीरिक फिटनेस उपकरणे, ग्रामीण बाजारहाट इ. राज्य कायद्यानुसार राज्य शासनाने केलेल्या इतर मूलभूत सुधारित / वर्धित सेवा, वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सुका व ओला कचरा व्यवस्थापन उपकरणे, कंत्राटी तत्वावर (आऊटसोर्सिंग) मनुष्यबळ यांसाठी होणारा आवर्ती खर्च आणि इतर आवश्यक प्रशासकीय खर्च, नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावावेळी त्वरीत मदतकार्य, पंचायतींना देण्यात आलेल्या इतर जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी जसे की, जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत लोकांची जैवविविधता नोंदवही (PBR – Peoples Biodiversity Register ) तयार करणे व अद्ययावत करणे इत्यादी बाबींवर हा निधी खर्च करता येईल. कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबींवर हा निधी खर्च करता येणार नाही.