Home Blog Page 270

ठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोज 100 नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस..

विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन..

ठाणे येथीललसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोणतेही गैरसोय होवू नये यासाठी ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून या केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या केवळ १०० ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी १० ते १ या वेळेत लस देण्यात येणार आहे.

शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही चर्चा झाली होती.

या लसीकरण केंद्रामध्ये गाड्यांना येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर निरीक्षणासाठीही पार्किंगमध्येच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

लसीकरण केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी व्यवस्था आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी, तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.

मुरबाड तालुक्या मध्ये कोविड-१९ लसीकरण चा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुरबाड तालुक्या मध्ये ८ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणासाठी सुरवात झाली त्यात पहिला टप्पा १५,१०७ तर दुसरा टप्पा १७,०५५ ऐवढी संख्या लसीकरणासाठी पूर्ण झाली असून पुढील लसीकरण चालू राहणार आहे असे डॉ. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मुरबाड मधे सात आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात आले. ग्रामिण रुग्णालय मुरबाड पहिला टप्पा ४,६४४ तर दुसरा टप्पा १,१५१, प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर पहिला ट्प्पा १,६२० दुसरा टप्पा ५९, प्रा.आरोग्य केंद्र सरळगाव १,६३७ दुसरा टप्पा १५०, प्रा.आरोग्य केंद्र शिवले पहिला टप्पा १,२९९ दुसरा टप्पा ७४, आरोग्य केंद्र शिरोशी पहिला टप्पा ८६२ दुसरा टप्पा ८४, मोरोशी प्रा.आरोग्य केंद्र पहिला टप्पा ५९१ दुसरा टप्पा/४६, धसई प्रा.आरोग्य केंद्र पहिला टप्पा १,३७७ दुसरा टप्पा १२४, म्हसा आरोग्य केंद्र पहिला टप्पा १,४०४ दुसरा टप्पा १६२, तुळई प्रा. आरोग्य केंद्र १,०३३ दुसरा टपा १२४, अशी लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनी यावेळी बोलताना प्रसार माध्यमांना दिली.

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे.
देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत.
अशातच ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस उपचारासाठी वापरण्यात येत आहे. ‘स्पुटनिक व्ही’ मुळे भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता तिसरी लस मिळाल्यामुळे भारतासाठी हा दिलासा ठरणार आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. कॉंग्रेसचे नेते मल्लुकर्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘स्पुटनिक व्ही’च्या लसींचे दीड लाख डोस भारतात पोहोचले असल्याची माहिती दिली. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानेही भारतात उत्पादनांसाठी स्थानिक कंपन्यांशी करार केला आहे असे सांगितले.

कोरोना योद्धेच होता आहेत घायाळ; आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईत राज्य पोलीस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल अत्यंत चिंतेत आहे. शुक्रवारी राज्य पोलीस दलातील २० अधिकारी, १६० अंमलदार बाधित झाले. त्यापैकी १८ जणांनी पहिली तर २६ जणांनी दुसरी लस घेतली होती.

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यातील अंमलदार संदीप तावडे यांचा शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांनी दुसरी लस मार्चमध्ये घेतली होती. मुंबई पोलीस दलात ७५ टक्के मनुष्यबळाने लशीची पहिली मात्र घेतली असून दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांवर आहे. राज्य पोलीस दलात आतापर्यंत ४२ हजार १०६ पोलीस बाधित झाले. त्यापैकी ३८ हजार २८६ जणांनी कोरोनावर मात केली. ४३२ जणांचा मृत्यू झाला. तर ३ हजार ३८८ जण सध्या उपचार घेत आहेत.

उपचार केंद्रे पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्रांची तजवीज केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी दिली. सध्या कलिना येथे सुमारे २५० खाटांचे उपचार केंद्र सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शहराच्या पाच प्रादेशिक विभागांत स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. पाचही विभागांमध्ये खासगी, शासकीय इमारती उपचार केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. केंद्रांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा, डॉक्टरांसह आरोग्य सेवकांचे मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे.

ठाणे येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास मदतीचा हात

संपादक: मोईन सय्यद / ठाणे, प्रतिनिधी

सध्या कोरोना संकटात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न म्हणून सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास वस्तरुपात मदत करण्यात आली.

टिटवाळा येथील आईची सावली ह्या बालक आश्रमात सुमारे 30 बालके असुन ह्या माध्यमातून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

‘विद्या विनयेन शोभते’ हे सरस्वती सेकंडरी स्कूलचे ब्रीदवाक्य उपक्रमशील सामजिक कृतीतून माजी विद्यार्थ्यांनी खरया अर्थाने सार्थ केले.

ह्या सामजिक उपक्रमात चिन्मय, गौरी, सर्वज्ञा, करुणा आणि श्रीकल ह्यांनी सढळहस्ते मदतीचा हात पुढे केला.

ह्या मदतीतून 30 बालकांना किमान 2 महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या संस्थापक श्रीमती. दीपाताई ह्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.