Home Blog Page 272

लस वाटपाचा कोपरगावात फज्जा, तरुणाईचा संताप उफाळला !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आवाहन अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,”जाऊद्या” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट उत्तर देणे टाळले आहे. मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान हीच स्थिती तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांवर होती.

राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने राज्यात काही ठिकाणीच, कमी प्रमाणात या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पण राज्यातील लसीकरणाच्या अभियानासमोर आणखी एक समस्या निर्माण होत असून त्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून कोपरगाव तालुक्यात प्रथम आज वय वर्ष १८ ते ४४ नागरिकांना लस देण्याचे आवाहन काल करण्यात आले होते.

त्यासाठी ठिकाणाचे शहर आरोग्य विभागाने नियोजन केले होते व त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात छोटाशा मंडपात सोय करण्यात आली होती. त्या साठी एकूण तीनशे लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र ‘लसी कमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती’ असे विचित्र चित्र निर्माण झाले होते. त्यासाठी या लस इच्छुकांना संदेश देताना मात्र काही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रमणध्वनिवरून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष लस देताना व्यवस्था भलत्याच ठिकाणी केलेली होती.मात्र वय वर्ष १८ ते ४४ साठी सोय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली होती. तर लघु संदेश लस देण्याच्या काही मिनिटं आधी देऊन लस धारकांची नावे सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी करून गोंधळ उडालेले दिसून आला. त्या मुळे हा संताप अखेर तरुणाईने आरोग्य विभागाचे नियोजनासाठी लावण्यात आलेले टेबल खुर्च्या उधळण्यापर्यंत हा गोंधळ वाढल्याने अखेर आरोग्य विभागाला शहर पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणच्या तरुणाईला आटोक्यात आणले आहे.

या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,” जाऊद्या…” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे”. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट “उत्तर देणे” टाळले आहे.मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.

कोपरगाव आरोग्य विभागाच्या कारभाराचा थेट फज्जा उडण्याची हि पहिलीच घटना असली तरी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची लक्तरे या आधी वेशीला टांगली गेली असून अनेक रुग्णांना कोरोना रुग्ण तपासणी संचचा अभाव, रेमडीसीविर इंजेक्शन, ऑक्सिजन, खाटांची कमतरता यांच्या बाबत सविस्तर वृत्त छापून आले आहे. पुढाऱ्यांची प्रसिद्धीची “अधिकची हौस” दिसून आली आहे. नागरिकांना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेले नव्हत्या. पाण्याची व्यवस्था आदींचा अभाव दिसून आला आहे. ह्या गर्दीमुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यताच अधिक बळावली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यात नेमके किती कोरोना रुग्ण, किती मृत्यू याचा प्रसिद्धी माध्यमांसकट कोणालाही थांगपत्ता नाही हा या तालुक्याच्या कारभाराचा विशेष असे म्हटले जाते.

दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दिलासादायक निर्णय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना चाचणी उपचार लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही

दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट

दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत तिष्ठत उभे रहावे लागू नये, तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी निर्माण व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.

तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्याचा निर्णयही मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.

दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.

या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी मनिष फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट आरोपी तयार करत असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या अटकेनंतर स्वॅब आरटीपीसीआर टेस्टच्या स्टिक बनवण्यामागील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त अवघ्या २० रुपयांत एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम उल्हासनगर कॅम्प २ च्या खेमानी परिसरात संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घराघरात महिला, लहान मुले ही हातात हॅन्डग्लोव्ह्ज व तोंडाला मास्क न लावता तसेच सॅनिटायझर न वापरता स्वॅब स्टिकची पॅकिंग करत असल्याचा प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाला होता.

या कामामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या स्टिक जमिनीवर ठेऊन त्यांची प्लास्टिकच्या एका पॅकेटमध्ये पॅकिंग केली जात होती. विशेष म्हणजे मनिष केसवानी याने महिलांना अवघ्या २० रुपयात एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम दिले होते.माहिती देताना आरोग्य अधिकारी परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट एफडीए चे अधिकारी विलास तासखेडकर यांच्या तक्रारीत मनिष याने किट बनविणाऱ्या एका परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून व कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट स्वॅब किट तयार करून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी मनिष केसवानी याच्यावर गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस आयुक्त डी. डी .टेळे, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी संत ज्ञानेश्वर नगरात असणाऱ्या मनिषच्या कारखान्यात व घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी किंबहूना त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

मनिषच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांच्या उलगडा होईलच सोबत रॅकेटचा पर्दाफाश होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

राज्यात कार्यान्वित झाले हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याच्या कोरोना काळात राज्यात उद्भवलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी शुल्कात गरीबांना उपलब्ध होणार – नितीन गडकरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी..

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा..

वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘जेनेटीक लाईफ सायन्सेस’ कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला.

यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.

गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळं काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती. काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, जिद्दीने काम केले. देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगी देण्यात मदत केली. अनेकांचे याकरीता सहकार्य मिळाले. हेट्रो या हैद्राबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाईफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला असेही गडकरी म्हणाले.

वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही…

वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही. भिलाईवरून येणारे ट्रक येथे आणण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला स्टोअर करण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे 20-20 टॅन क्षमतेचे ऑक्सिजनचे प्रकल्प लवकर उभे करण्यासाठी पाठपुरावा करू. सिलेंडरही वाढवू, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. विदर्भात व्हेंटीलेटर वाटलेत. बायपॅप आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पण आलेत. सांगाल तेवढे व्हेंटीलेटर द्यायला तयार आहे फक्त त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. संकट मोठे आहे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे गडकरी म्हणाले.