Home Blog Page 275

सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी अटक.

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी येथील शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या टोळीला शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी यांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एका महिलेने फिर्यादी यांचे अंदाजे साडे सहा तोळे वजनाचे एकूण ९०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने ६ महिन्यात परत देतो असे सांगून ते ठरलेल्या वेळेत परत न देता स्वतःकडे ठेऊन फिर्यादी यांच्या दागिन्यांचा अपहार केला असल्याबाबत तसेच फिर्यादी यांच्यासह इतर महिलांचे देखील दागीने आणि रोख रक्कम १ तोळे सोन्याच्या बदल्यात १५०० रु. व १,००,०००/- रुपयांवर १०,०००/- प्रती महिना व्याज अशा वेगवेगळ्या स्कीम सांगून ठेऊन घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर गुन्ह्यातील महिला आरोपीसह तिच्या सात साथीदारांना अटक केली. अटक आरोपींनी भिवंडी शहरातील एकूण २६५ लोकांची वरील प्रमाणे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण २४०६. ७ ग्रॅम वजनाचे ७३,५४,३२०/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत व पुढील तपास सुरू आहे असे शांतीनगर पोलीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

५ मे च्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आठ दिवसांचा संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दि. ३ मे २०२१ रोजी १ हजार ५६८ वर पोहोचली असून ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात ५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाची चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून कोरोनाची शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे सद्यस्थितीत गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हा संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.

तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील हे १ मे पासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहेत व कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

राजकारणी, अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने; आठ वर्षांसाठी पालिकेकडून एक कोटी ६२ लाख रुपये खर्च

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनामुळे खर्च जास्त आणि त्याच्या तुलनेने उत्पन्नात घट अशी परिस्थिती असताना मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना गाड्या देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची हालचाल सुरू केली आहे.
शासन पुरस्कृत कंपनीकडून भाडेकरारावर गाड्या घेण्यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यासाठी स्थायी समितीची परवानगी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह वैधानिक, विशेष समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्षांना मोटरगाडी देण्यात येते. मात्र ही वाहने वारंवार बंद पडत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. या प्रकाराचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले होते. स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या वादळी चर्चेनंतर प्रशासनाने अतिमहत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर पाच टाटा नेक्सॉन इवी एक्स झेड प्लस विद्युत वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांवर पालिकेचा जवळपास दुप्पट खर्च होणार आहे. एका गाडीचे वस्तू आणि सेवा करासह आठ वर्षांचे भाडे ३२ लाख ४८ हजार ६३२ रुपये इतके होणार आहे.

पालिकेला आठ वर्षांसाठी पाच गाड्यांपोटी एक कोटी ६२ लाख ४३ हजार १६४ रुपये मोजावे लागणार आहेत. शासन पुरस्कृत ई.ई.एल.एस कंपनीकडून ही वाहने भाडेतत्त्वावर घेता यावीत यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख उच्च न्यायालयात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सी.बी.आय) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मे. उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर मे.उच्च न्यायालयाने परमबीर यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेले असतानाही सी.बी.आय ने सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेणे, त्यांच्याकडे महत्त्वाची प्रकरणे सोपवणे या प्रकरणांचाही प्राथमिक माहिती अहवालात (एफ.आय.आर) समावेश केला आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे.

राज्य सरकारने ही याचिका दाखल केली असून मंगळवारी त्यावर सुनावणीची शक्यता आहे. परमबीर यांच्या पत्राचा आधार घेत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मलबारहिल पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यात आलेली नाही हे लक्षात आल्यावर मे.उच्च न्यायालयाने आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सी.बी.आय.ला दिले होते. वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या आरोपांची पारदर्शी चौकशी होण्याच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आल्याचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती न्यायालयाने स्पष्ट केले होते.

प्राथमिक चौकशीअंती सी.बी.आय.ने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला. याविरोधात देशमुख यांनी मे. उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली असून सी.बी.आय ला कठोर कारवाईपासून मज्जाव करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनेही देशमुख यांच्यावर सी.बी.आय ने दाखल केलेल्या वाझे प्रकरणाबाबतच्या एफ.आय.आर ला आव्हान दिले आहे.

सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्याव – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविड व्हॅक्सीन बनवणारे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ हे महराष्ट्रातील पुण्यात आहे. त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या करोना संसर्ग दुपटीने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत.

तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे.
मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे. ”अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्याने, काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे.” असं राजेश टोपे प्रसार माध्यमांशी बोलाताना म्हणाले आहेत. तसेच, ”कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण १८ ते ४४ असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असलायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल.

सध्या पुरेशी लसचं उपलब्ध नसल्याने जरी आपल्या जवळ निधी आहे. आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्धच नसल्याने आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत आहे.” असंही यावेळी राजेश टोपेंनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं.