Home Blog Page 276

कोविड सेंटरमध्ये वाजविली जाणार मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोर कुमारची गाणी मिरा भाईंदर महानगरपालिकेचा अजब उपक्रम?

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

एकीकडे कोविडच्या रुग्णांना चागल्या सोयी सुविधा देखील पुरविल्या जात नसताना आणि रुग्णांना वेळेवर जेवण-पाणी देखील दिले जात नसताना मिरा भाईंदर महानगरपालिका आता कोविड सेंटरच्या दिवसाची सुरूवात भुपाळीने होणार असून यासोबत सकाळ संध्याकाळ कोविड सेंटरमध्ये रुगणांच्या मनोरंजनासाठी मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोर कुमारची गाणी देखील वाजविले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर मधील उपचारार्थ दाखल असलेल्या कोविड रुग्णांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर मधील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक रहावे यासाठीच महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेचे स्व. प्रमोद महाजन सभागृह, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, स्व. मिनाताई ठाकरे हॉल, भारतरत्न पं. भिमसेन जोशी रुग्णालय, समृद्धी कोविड केअर सेंटर, कॉरन्टाईन सेंटर R1 व R2 (गोल्डन नेस्ट) व डेल्टा गार्डन या ठिकाणी शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महानगरपालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणेबरोबरच कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचारी वर्ग रुग्णांची काळजी घेत आहे. मात्र या कोविड सेंटर मधील वातावरण आणखी प्रफ़ुल्लीत आणि प्रसन्न रहावे आणि रुग्णांमध्येही सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी काही दिवसातच या सर्व कोविड सेंटर मध्ये ध्वनी यंत्रणा लावण्यात येणार आहे. या ध्वनी यंत्रणेमधून सर्व कोविड सेंटरची सुरूवात भुपाळीने होणार आहे. त्यानंतर मोहम्मद रफ़ी, मुकेश, किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या जुन्या काळातील गायकांबरोबरच नव्या काळातील गायकांचे गाणे सुध्दा यासर्व कोविड सेंटरमध्ये वाजले जाणार आहे.

सर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देतातच पण काही रुग्णांच्या मनात कोविड बाबत भिती निर्माण झालेली असते. त्यामुळेच या उपक्रमाची सुरुवात करत असून संगीतासारखे दुसरे औषध नाही त्यामुळे हा अनोखा उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्व कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी समुपदेशन आणि योगा क्लासेस सुध्दा सुरू करीत असल्याचे आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले. असे असले तरी कोविड सेंटर मधील रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत, त्यांना वेळेवर जेवण-पाणी देखील मिळत नाही, चार चार तास गरज असलेल्या रुग्णांना पाहायला नर्सेस देखील जागेवर नसतात, मृत झालेल्या रुग्णाला तासनतास इतर रुग्णां सोबत तसेच ठेवले जाते अशा अनेक तक्रारी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नागरिकांनी केल्या आहेत. आणि आता तर कोविड सेंटर मध्ये रुगणांचे नातेवाईक,मित्रमंडळी, इतर नागरिक आणि पत्रकार यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक मुख्य प्रवेशद्वारावर लावले असून कोविड सेंटर मध्ये सर्व काही आलबेल आहे असे वाटत नाही आणि म्हणून महापालिका प्रशासन काहीतरी लपविण्यासाठी हा उपद्व्याप करीत असल्याचे बोलले जात आहे.

जे रुग्ण या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी आले त्यांनी आपले अनुभव सांगताना बोलले की कोविड सेंटर मध्ये फारच भयानक परिस्थिती आहे. नातेवाईकांना आतील माहिती सुद्धा दिली जात नाही अशी परिस्थिती असताना बाहेर मात्र सर्व काही खूप चागले आहे सर्व रुग्णांना खूप चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत असे महानगरपालिके कडून भासवले जात आहे. महापालिका प्रशासनाने इतर वायफळ गोष्टी वर वेळ आणि पैसा वाया न घालवता रुग्णांच्या चागल्या सुविधा आणि उपचार यांचेवर अधिक लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईत लाखो घरकामगार महिला सरकारी लाभापासून वंचित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकार तर्फे करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी या लाभापासून वंचित राहणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकामगारांना अनेक घरांनी कामावरून काढून टाकले. सध्या रेल्वे प्रवासावरील निर्बंधांमुळेही महिलांना घरकामासाठी जाणे अवघड झाले आहे.

गेल्यावर्षभरापासून अनेक घरकामगार महिलांचा रोजगार बुडाला आहे. सध्या याच महिलांना सरकारची १५०० रुपयांची मदत मिळणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मात्र, ही मदत घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणी झालेल्या महिलांनाच मिळणार आहे. घरेलू ‘कामगार कल्याण मंडळ’ घरकामगारांसाठी विविध योजना राबवत असते. मात्र गेल्या काही वर्षात हे मंडळ निष्क्रीय झाले आहे व अनेक योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात नोंदणी केलेल्या अनेक महिलांनी मागील काही वर्षात नोंदणीचे नुतनीकरण केलेले नाही. तसेच घरकामगारांसाठी असे काही मंडळ आहे, याचीही अनेकजणींना माहितीच नाही.

त्यातून सद्यस्थितीत घरकामगार मंडळाकडे नोंदणीकृत आणि या नोंदणींचे नुतनीकरण झाले अशा केवळ १ लाख ५ हजार महिला आहेत. ‘मंडळाकडे सुमारे १ लाख घरेलू कामगार महिलांची माहिती उपलब्ध आहे. त्यांना मदत निधी पोहचविण्याची तयारी सुरू आहे, असे विकास आयुक्त (असंघटीत कामगार) पंकज कुमार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

नोंदणीपेक्षा घरकामगारांची संख्या मोठी..

मुंबई आणि परिसरातील सुमारे ५ लाख घरकामगार महिला काम करतात. मंडळाने या घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी प्रामुख्याने कधी पुढाकार घेतला नाही असा आरोप घरकाम करणाऱ्या महिलांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे .

मोबाईल तंत्राच्या अभावामुळे रिपाईच्या वतीने गरीबांसाठी लसीकरण नावनोंदणी मोहीम

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली येथील इंदिरा नगर वस्तीतील नागरिक मोबाईल तंत्राच्या अभावामुळे लसीकरणापासून मोठ्या संख्येने वंचित आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांचे लसीकरण मोठ्या संख्येने होणे गरजेचे आहे. यासाठी रिपाईच्या (आठवले) डोंबिवली शहर शाखेच्या वतीने इंदिरा नगर येथील नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली आहे.

स्वच्छतेची कोणत्याही सोयीसुविधा नसताना कोरोना संसर्ग इंदिरा नगर मध्ये जाणवलेला नाही. परंतु येथे घरकाम करणारे, गवंडी, सुतार, प्लंबर, वायरमन, रिक्षाचालक, फेरिवाले, कचरावेचक
इत्यादी कष्टकरी समाज मोठ्या संख्येने राहत आहेत. दैनंदिन कामानिमित्त ते बाहेर पडत असल्याने बाहेरुन संसर्गाचा प्रसार वस्तीत होऊ शकतो. त्याचप्रमाणे येथील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये, त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे.

सरकारने लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन
सोय जरी केली असली तरी त्यासाठी अँड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे. येथील अनेक नागरिकांकडे अश्या प्रकारचे मोबाईल नाहीत. तर अनेकांकडे मोबाईल असून नोंदणी करण्याचे मोबाईल मधील तंत्र अवगत नसल्याने येथील नागरिकांचे मोठ्या संख्येने अद्याप लसीकरण झालेले नाही. अशी माहिती रिपाईच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

रिपाईच्या वतीने इंदिरा नगर येथे पक्ष कार्यालय सुरु आहे. या कार्यालयात १ मे पासून लसीकरण नोंदणी सुरु करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी हि नोंदणी सुरु असते.

लस कुप्यांचा पुरेसा पुरवठा शासनाच्या वतीने होत नसल्याने कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे बंद आहेत.परंतु हि लस केंद्र पुर्ववत होताच, नोंदणीकृत लाभार्थ्यांना मोबाईल लघुसंदेशाद्वारे (मेसेज) लस केंद्र कळविले जाईल अशी माहिती रिपाईच्या वतीने देण्यात आली आहे.

संपर्क – रिपाई वार्ड अध्यक्ष तेजस जोंधळे – ९९८७९७२४१४.
धम्मपाल सरकटे – ८६५२७२६८८४/९९२०९४६३७९

डोंबिवली पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले आणि १७ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. दि. २२.०३.२०२१ रोजी १५ मिटरचे ७ गर्डर बसविण्यात आले आणि दि. २ एप्रिल रोजी १२ मिटरचे आणखीन ७ गर्डर बसविण्यात आले आणि आज दि.०३.०५.२०२१ रोजी तिसऱ्या व शेवटच्या स्‍पॅनचे १८ मिटरचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.


राजाजी पथवरील स्पॅनचे कामाकरीता दि.०७.०५.२०२१ पर्यत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. सदर गर्डर्स चढवून झाल्यानंतर क्रॉस गर्डर्स जोडण्यासाठी व स्लॅबचे सेंटरींग लावतांना पादचाऱ्यांचा व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्‍यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.

पोहोच रस्त्याचे उर्वरित काम व गर्डरवरील स्लॅबचे काम पूर्ण करुन येत्या पावसाळयापूर्वी डोंबिवली पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल वाहतूकीला खुला करणेबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वेकडील लोकांना डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी सध्या जो ठाकुर्ली येथून वळसा घालून जाण्याचा एकमेव मार्ग आहे त्याला कोपर उड्डाण पूलाचा दुसरा पर्याय खुला होईल असे आयुक्तांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

घरगुती सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे घरात उडाला आगीचा भडका, ५ जण जखमी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील रमेशवाडी येथे घरगुती एलपीजी गॅसची गळती झाल्याने घरात आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

घरात पसरलेल्या एलपीजी गॅसमुळे आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बदलापूर शहरातील रमेशवाडी भागात असलेल्या ‘जय हाईट्स’ या इमारतीत घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ५ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

घरगुती सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे घरात आगीचा भडका उडाल्याने ५ जण गंभीर रित्या जखमी

घरगुती गॅस दुरुस्ती करताना सिलिंडरचा उडालेल्या भडक्यामुळे बदलापूर शहरातील रमेशवाडी भागातील ‘जय हाईट्स’ या इमारतीत निलेश तायडे यांच्या पत्नी काल दि.१ मे रात्रीच्या सुमारास स्वयंपाक करीत होत्या. यावेळी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून बऱ्यास वेळेपासून गळती होत असल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावले होते. मेकॅनिक या सिलिंडरची दुरुस्ती करत असताना अचानक सिलिंडरचा भडका उडाला. त्यातच गॅसमधून जास्त प्रमाणात गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. त्यामुळे आगीचा भडका झाला. यात तायडे यांच्यासह त्यांच्या पत्नी, दोन मुलं आणि दुरुस्तीसाठी आलेला मॅकेनिक असे ५ जण आगीत होरपळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर तातडीने नियंत्रण मिळविले. तर शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने जखमींना उल्हासनगर मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.