Home Blog Page 287

अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई; सचिन वाझेंच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याला एनआयए ने केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांचे सीआययू तील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना अटक केली. काझी यांनी सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि सचिन वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांना रविवारी अटक केली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याच्या आरोपाखाली एनआयए ने आधीच सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझे यांची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास त्यांनी वाझे यांची मदत केल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत एपीआय रियाझ काझी यांना आज एनआयएने अनेक दिवसांच्या चौकशीनंतर अटक केली. एनआयए ने काझी यांची अनेक दिवस कित्येक तास चौकशी केलेली आहे. काझी यांनी पुरावे नष्ट करण्यास आणि या गुन्ह्यात वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे यांच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर घेऊन जाणारा काझीच असल्याचे सांगण्यात येत आहे. कारच्या बनावट नंबर प्लेट खरेदी केल्याच्या प्रकरणातील आरोपीही असल्याचे मानले जाते. काझी यांना एनआयए कोठडीसाठी आज न्यायालयात हजर केले जाईल. सचिन वाझे यांना याआधीच एनआयएने अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्येच्या कटाचा आरोपही आहे.

पनवेल येथे ऑइल चोरी करून अपहार करणाऱ्यांना अटक;  ४२.८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमिकल ऑईलची चोरी करून अपहार करणारे ५ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक यांच्यासह १ चालकास अटक करून त्यांच्याकडून एकूण ४२,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पनवेल शहर पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांच्या हस्थी केमिकल तळोजा कंपनीचा ‘मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बेन ऑईलचा’ टॅंक सुनील ट्रान्स्पोर्टच्या ट्रक चालकाच्या ताब्यात पोहच करण्यासाठी दिला असता त्याने त्याच्या साथीदारांशी आपसात संगनमत करून पनवेल मधील पळस्पे येथील निलेश ढाब्याजवळ सदर टॅन्कमधील ११,६००/- रु. किंमतीचे अंदाजे २०० लिटर ऑइल चोरी करून पिंपामध्ये काढून अपहार केला होता. सदर ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिसांनी छापा मारला असता सदर इसम हे पळून गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून सदर गुन्ह्यातील चालक आणि त्याच्या ५ साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ४२,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पत्रकाराच्या खुनाशी संबंधांचा आरोप; महाविकास आघाडीच्या सरकारातील आणखी एक मंत्री अडचणीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथील एका साप्ताहिकाच्या पत्रकाराच्या हत्येसंदर्भात एका मंत्र्याचे नाव येऊ लागले आहे. पत्रकार रोहिदास दातीर हत्येप्रकरणात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर आरोप केला आहे.

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.

कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली गेली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल.

या प्रकरणाशी आवश्यक असलेली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना पुरवायला तयार आहोत. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. मी आमदार असल्याच्या काळात या मतदारसंघात अशा घटना झाल्या नाहीत. अलीकडे अशा चार घटना घडल्या आहेत. दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करू. दातीर यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे, मात्र आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले.

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण सर्वसमावेषक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले आहे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता..

मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन..

सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

केडीएमसी चे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे माथेरान मधील रस्त्याला नामकरण

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुन्य कचरा मोहिम राबविण्यासाठी अनेकविध अभिनव संकल्पना व उपक्रम राबविल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हयाचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रामदास कोकरे यांचेकडे सोपविला होता.

त्याआधी वेंगुर्ला व कर्जत येथे त्यांचेमार्फत राबविलेली ‘कचरा मुक्त डंपिंग ग्राऊंड’ ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये देखील राबविली आणि ती यशस्वी करुन दाखविली. रामदास कोकरे यांनी माथेरानमधील डंपिंग ग्राऊंडचे रुपांतर खेळाच्या मैदानात केले. तसेच माथेरानच्या पर्यावरण पुरक सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिल्याबाबत माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने, नगर परिषद हद्दीतील ‘सेटविला नाका ते कचरा डेपो’ या रस्त्याचे नामकरण ‘रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे करुन रामदास कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सदर नामकरणाच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालिन रायगड जिल्हाधिकारी व विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, अतिरिक्त आयुुुक्त सुनिल पवार, उपायुक्त उमाकांत गायकवाड, माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व इतर मान्यवर हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.