Home Blog Page 288

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

संपादक: मोइन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, ठाणे शहरात काही इसम अधिक किंमतीने रेमडेसिवीर हे इंजेक्शन काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ठाण्यातील तीन हात नाका, इटर्निटी सर्व्हिस रोड येथे सापळा रचून एका इसमास रेमडेसिवीर इंजेक्शन हे बाजार मूल्यापेक्षा जास्त किंमतीने अनुक्रमे ५ ते १० हजार रु. किंमतीने बेकायदेशीररीत्या विक्री करत असताना १६ इंजेक्शनसह ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या इसमास ठाण्यातील बाळकूम नाका येथून ५ इंजेक्शनसह पकडले.

त्यांच्याकडून एकूण २१ रेमडॅक, रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाईल फोन अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लॉकडाऊनबाबत केडीएमसीच्या मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड रुग्णांच्या संख्येने कळस गाठला असून महापालिका प्रशासन सर्वस्वपणाला लावत त्याच्याशी दोन हात करत आहे. तर राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी दोन दिवस आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. या दोन्ही दिवसांत परीक्षार्थी विद्यार्थी, ऑनलाईन फूड होम डिलीव्हरी, भाजीपाला, चिकन, मटण, मासे विक्रेते, वाईन शॉपबाबत असणाऱ्या निर्बंधांबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. तर अनेक मद्यप्रेमींच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असणारे वाईन शॉप ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवलीतील सध्याची कोवीड रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी शनिवारी – रविवारी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

शनिवार-रविवार बाबत या आहेत सूचना..

विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे.

ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना २४ तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी…

अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.

मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहणार..

भाजीपाला विक्रेते ६ फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करणार…

औषध दुकाने हॉस्पिटल यांना वेळेचे बंधन नाही..

पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सुरू राहणार.

आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला ७ ते सायंकाळी ८ पर्यंत फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे.

इतर सूचना..

वाईन शॉप ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंदच असणार.

चष्मे दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ सुरू ठेवण्यास परवानगी.

चार्टर्ड अकाऊंटस् ऑफिसेस सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत परवानगी.

अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुंबईतील तरूणीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश!

• इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी झुंज देऊन ती पुन्हा जगतेय आयुष्य
• सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या
• कोहिनुर रूग्णालयात यशस्वी उपचार

मुंबई, प्रतिनिधी: अपघातानंतर एखाद्याचं आयुष्यचं बदलून जातं. असंच काहीस मुंबईत राहणाऱ्या २४ वर्षीय निरमोही या तरूणीच्या बाबतीत घडलंय. रस्ते अपघातात या तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती कोमात गेली होती. तिला ४५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सलग पाच वर्षांत तिच्यावर ११ वेळा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जगण्याची कुठलीही उमेद नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने मृत्यूशी ही झुंज जिंकलीय. आणि आता ती पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू लागली आहे.

मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले आहे. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१५ मध्ये जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असताना कालिना येथे घरासमोरील रस्त्यावर तिला अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी तिला नजीकच्या नर्सिंग होममध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार देण्यात आले. परंतु, प्रकृती खूपच चिंताजनक असल्याने तातडीने तिला कोहिनूर रूग्णालयात हलविण्यात आले. या रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर यांच्याकडे उपचार सुरू झाले. अपघातात डोक्याला इजा झाल्याने ती कोमात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून धक्का बसला. मुलीचा जीव वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. साधारणतः शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. मात्र, तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी ११ वेळा डोक्यावर शस्त्रक्रिया केल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तिची प्रकृती उत्तम आहे.

कोहिनूर रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथन अय्यंर म्हणाले की, या रूग्णालयात आणले तेव्हा या मुलीची प्रकृती खूपच नाजूक होती. मेंदूच्या सीटीस्कॅन तपासणी केली असता या अपघातामुळे तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले. डोक्याची टाळू उघड करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः ४५ दिवस तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ११ वेळा डोक्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय नियमित फिजिओथेरपी आणि स्पिच थेरपी देण्यात येत आहे. आता तिची प्रकृती उत्तम असून ती आधीप्रमाणे भरतनाट्यम नृत्य करू शकतेय.

डॉ. अय्यंर पुढे म्हणाले की, मेंदूला इजा झाल्यास रूग्ण बरा होऊ शकत नाही, हा गैरसमज आहे. कुठल्याही अपघातात डोक्याला दुखापत झाल्यास पुढील १-२ तासात रूग्णाला प्राथमिक उपचार मिळणं गरजेचं असते. खासगी रूग्णालयात रूग्णावर लगेच उपचार होणार नाही, अशी भिती अनेकांच्या मनात असते. परंतु, खासग रूग्णालयात रूग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार दिले जातात. मेंदूला दुखापत झालेली असल्यास रूग्णाला बरं व्हायला वेळ लागतो. परंतु, या कठिण काळात कुटुंबियांची साथ खूपच महत्त्वाची असते. यामुळे रूग्ण लवकर बरा होऊ शकतो.

निरमोहिच्या आईने सांगितले की, अचानक मुलीचा अपघात झाल्याने आम्ही खूपच घाबरून गेलो होतो. मुलगी वाचण्याची शक्यता खूपच कमी दिसत होती. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे. याशिवाय, जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे मुलीने मृत्यूवर मात केली आहे. आता ती आधीप्रमाणे भरतनाट्यम करू लागली आहे. आणखीन एक शस्त्रक्रिया बाकी असून लॉकडाऊननंतर ती करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य अधिकाऱ्यांचा काळाबाजार.. टी.एम.सी च्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

व्हेंटिलेटरची निविदा मंजूर करण्यासाठी मागितला होता मोबदला.. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐरोली परिसरात केली अटक.

ठाणे महानगर पालिकेत व्हेंटिलेटर पुरविण्यासंबंधीची निविदा मंजूर करून देण्यासाठी डॉ. राजू मुरुडकर यांनी ही लाच घेतल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

या निमित्ताने करोना काळातील त्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. नवी मुंबई भागातील एका कंपनीमार्फत ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा मंजूर करून देतो, असे सांगत निविदेच्या एकूण रकमेपैकी दहा टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी १५ लाखांची मागणी केली होती. याबाबत संबंधित ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.
त्यामध्ये पाच लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी डॉ. मुरुडकर यांनी ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात बोलविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ऐरोली परिसरात सापळा रचला. त्यावेळेस संबंधित ठेकेदाराकडून पाच लाखांची लाच घेताना डॉ. मुरुडकर यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, मुलींवर आली वेश्या व्यवसायाची नामुष्की, वसईतील दुर्दैवी घटना!

वसई-विरार, प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून जीवनाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश अनेकांना पडला असताना काही असामाजिक तत्व मात्र असहाय्य महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून आपल उखळ पांढर करून घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाल आहे. वसईमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सापळा रचून एका महिला आरोपीला अटक करून पीडित मुलींची सुटका केली आहे.

वसई पूर्वेकडील रेंज नाका येथे मुंबईतून वसईत येवून मुली पुरवत असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम यांना माहीती मिळाली होती. अरुणा चौहान नावाची वेश्या पैसे घेवून मुली पुरवते अशी माहिती निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिली. पोलीस उपआयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे सहाय्यक फौजदार प्रकाश निकम पोलीस हवालदार बापु पवार, सुनिता कांटेला ,पोलीस नाईक रोशन किणी , महेंद्र शेट्ये ,विशाल कांबळे , पुनम जगदाळे , काजल पाटील,राजेश निवृत्ती पदमने यांच्या पथकाने सापळा रचून अरुणाला अटक केली.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले अनेक कंपन्या बंद झाल्याने महिला बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मिळेल ते काम करण्याची नामुष्की ओढवली असल्याने त्या मजबुरीचा फायदा उठवून वेश्या दलाल अरुणा हिने अशा महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढले. या दोन्ही पीडित मुली एका कंपनीत कामाला जात होत्या. मात्र, ते काम बंद झाल्याने आपला संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत असताना त्यांची ओळख अरुणाशी झाली. तिने ‘आपण मुंबईत धंदा न करता वसईमध्ये करूया, तिकडे तुम्हाला कोणी ओळखणार नाही’ असे सांगून पैशाचे आमिष दाखवून आणल्या होत्या.

शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्या तयार झाल्या होत्या. मुंबईत राहणाऱ्या वेश्या दलाल महिलेने फोनवर ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांच्या मागणी नुसार, मुली पुरवण्याचे काम करीत असल्याची बातमी प्रकाश निकम यांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदशर्नाखाली एका सामाजिक संस्थेची मदत घेत एका बोगस गिऱ्हाईकाने वेश्या अरुणा हिला फोन करून मुलीची मागणी करायला सांगितले. अरुणाने एका मुलीचे 2000 रुपये सांगितले. त्यानंतर वसईच्या फादरवाडी येथील कृष्णा उडपी हॉटेलकडे भेटण्यासाठी बोलावले. अरुणा 2 मुलींना घेवून रिक्षाततून आल्या आणि कृष्णा उडप्पी येथे आल्या असता आणलेल्या दोन मुलींपैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितली. त्याप्रमाणे बोगस गिऱ्हाईकाने एका मुलीस पसंत केले व ठरल्याप्रमाणे व्यवहाराचे 2000 रुपये अरुणाकडे दिले. आणि खात्री झाल्यानंतर अनैतिक वाहतूक शाखेचे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दलाल अरुणा व 2 पीडित मुलींना ताब्यात घेतले.

अरुणा ही मुंबई सायन हून त्या दोन पीडित मुलीना घेवून आली होती. दलाल महिला ही फोनवरून गिऱ्हाईकांना संपर्क करून त्यांच्या मागणीनुसार, मुली पुरवत असल्याची कबुली तिने पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा करून 2 पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.पुढील तपास वालीव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद करोडीवाल करीत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात संसाराचा गाडा कसा हाकायाचा या विवंचनेत असलेली सामान्य वर्गातील जनता आता पोटापाण्यासाठी वाम मार्गाला जाण्यासाठी मजबूर झाली आहे हे यावरून दिसत असून सरकारने जनतेच्या रोजगाराचा प्रश्न लवकरच सोडविला नाही तर देशात अराजकता माजेल अशी भिती सामाजिक कार्यकर्ते यांनी वर्तविली आहे.