Home Blog Page 292

पर्यावरणाचा ऱ्हास केले प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत, सुरेश वाकोडेसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : पाणथळ जमीनी आणि कांदळवनाचे संरक्षण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे कायदे व नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने केले जात आहे. कांदळवन क्षेत्रामध्ये जमीन मालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट बेकायदेशीरपणे दिल्याच्या तक्रारीवरून पालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित व सुरेश वाकोडे यांच्यासह ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा भाईंदर शहरातील पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठेकेदारास दिले आहे. या ठेकेदाराचे बांधकाम काम निकृष्ठ असल्याच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्तांना केल्या असतानाच कंत्राटदाराने काही ठिकाणी उपकंत्राटदार नेमले असल्याची माहिती समोर आली आहेत. त्यामुळे कांदळवनात या नाल्यांची बांधकामे थांबवून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

मिरारोड पूर्वेकडील नेमिनाथ हाईट्स व हटकेश येथील पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवन क्षेत्रात महापालिकेने दोन नाल्यांचे बांधकाम चालवले होते. नेमिनाथ हाईट्स मागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून पालिकेने आणखी एक नाला बांधण्यास घेतला होता. सदर ठिकाणी कोणताच नाला नव्हता. तर पाण्याच्या टाकी मागील नाला सुद्धा मूळ नैसर्गिक नाला खुला करून घोडबंदर खाडीला न जोडताच हा प्रकार पालिकेने चालवला होता. ठेकेदारांना आर्थिक फायदा करून देण्यासाठी आणि संबंधित जमीन मालकांना टीडीआर तसेच आजूबाजूच्या विकासकांना फायदा करून देण्यासाठी पालिकेने हा घाट घातल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी चालवल्या होत्या.

या प्रकरणी परिसरातील स्थानिक जागरूक नागरिक असलेल्या रुपाली श्रीवास्तव यांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. मीरा भाईंदर स्तरावरील कांदळवन समितीने ह्या दोन्ही परिसराची पाहणी करून कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून पालिकेने भराव व बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. समितीच्या पाहणी वेळी पालिकेचे अधिकारी नरेंद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते आणि त्यांना दोन्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तरी सुद्धा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड सह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे व ठेकेदार यांनी नाल्यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले. पोलिसांनी अनेकवेळा काम बंद करून सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पालिकेने काम चालवले होते.

वन विभागासह समितीच्या अहवाला नंतर अखेर अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मंजुरी नंतर मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मीरारोड पोलिसांनी दिपक खांबित, सुरेश वाकोडे, ठेकेदार व इतर संबंधित अधिकारी आणि वाहन यंत्र साहित्याचे चालक – मालक आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे हे अधिकारी व ठेकेदार यांच्या या आधी सुद्धा पर्यावरण ऱ्हासाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.

ज्या अधिकार्यांवर कांदळवनांचे आणि पाणथळ जमिनीचे सरंक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच आशिकारी अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शासनाची मार्गदर्शक सूचना जारी!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधि : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. कोविड-19 मुळे यावर्षी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शिवजयंतीला अनेक शिवप्रेमी किलले शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने केलं आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

तसेच दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम व शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

वाझे-हिरेन भेटीचे पुरावे एन.आय.ए कडे? डीएनए चाचणीच्या प्रतिक्षेत!

प्रतिनिधी, अवधुत सावंत : सध्या एन.आय.ए च्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मे. विशेष न्यायालयाने ३ एप्रिल पर्यंत पुन्हा एन.आय.ए च्या कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात एन.आय.ए ने आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

यावेळी सचिन वाझेंकडच्या बेहिशेबी ६२ बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे अशा अनेक गोष्टी एन.आय.ए ने न्यायालयासमोर ठेवल्याचं वृत्त दिलं आहे.

‘सचिन वाझे यांच्या घरी अशा ६२ बुलेट्स सापडल्या, ज्यांचा कोणताही हिशोब त्यांच्याकडे नव्हता. तसेच, त्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसाठी देण्यात आलेल्या ३० बुलेट्सपैकी फक्त ५ बुलेट्स सापडल्या असून उरलेल्या २५ बुलेट्स कुठे गेल्या, हे वाझेंना माहीत नसल्याचं एन.आय.ए ने कोर्टात नमूद केल्याचं’ या वृत्तात म्हटलं आहे.

तसेच, ‘१७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, याच वेळी मनसुख हिरेनने सचिन वाझेंना कारची चावी दिली, जी चोरीला गेल्याचा दावा त्यांनी नंतर केला होता’, असं देखील एन.आय.ए ने यावेळी न्यायालयाला सांगितलं.
एन.आय.ए ने डीएनए टेस्टसाठी मनसुख हिरेन यांचे रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणात सापडलेल्या गाड्यांमधून देखील नमूने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून नवीन गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

अवधूत सावंत, प्रतिनिधी : जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे.

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना

मुंबई दिनांक २६ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले- लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

धोका टळला नाही उलट वाढला..

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कडक निर्बंधांचे संकेत..

जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवा..
लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे.

याचीही काळजी घ्या..

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेड्स ची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी.. – अमित देशमुख

गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्यासंख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राज्यात ५२ लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

रेल्वेच्या डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ!

अवधुत सावंत, प्रतिनिधी (कल्याण) : अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या एका लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला उभी असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हितेंद्र राजभर, असे शीर आणि धड आढळून आलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत तरुणाचे शीर लोकलमध्ये तर धड रेल्वे रुळावर

काल सकाळच्या सुमारास अंबरनाथ येथील सायडिंग ला उभ्या असलेल्या एका लोकलमधील लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली. याच दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्तीचे धड पोलिसांना आढळले. या संबंधी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे समोर आले आहे.

रेल्वेचा खुलासा: ही हत्या नसून रेल्वे अपघात

मृत हितेंद्र उल्हासनगर स्थानकावरून मध्यरात्री १२.२० च्या शेवटच्या लोकल मध्ये चढला होता. यावेळी तो दरवाजात उभा असतांना त्याचे डोके रेल्वे रुळाजवळील असलेल्या खांबाला आदळले. यात त्याचे शीर लोकलच्या डब्यात राहिले आणि धड उल्हासनगर स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते, अशी माहिती रेल्वे सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. ही हत्या नसून रेल्वे अपघात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.