Home Blog Page 293

खाजगी फोटो वायरल करण्याची धमकी देऊन १७ वर्षीय मुलीवर कल्याणमध्ये बलात्काराची घटना!

प्रतिनिधी, अवधुत सावंत(कल्याण) :  कल्याण मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला एका उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील बंद खोलीत नेऊन २१ वर्षीय आरोपीने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना कल्याण पश्चिम भागातील एका गृहसंकुलात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सदर आरोपीचे नाव रितिक मांजी आहे. पीडित तरुणी नातेवाईकांना जेवणाचा डबा देऊन दुपारच्या सुमारास घरच्या दिशेने दुचाकीवरून जात होती. त्याच सुमारास कल्याण पश्चिम भागातील एका चौकात आरोपीने तिला रस्त्यात गाठून तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. याचाच फायदा घेत पुन्हा धमकी देऊन आरोपी तिच्याच दुचाकीवरून बसून तिला कल्याण पश्चिम भागातील एका उंच गृहसंकुलातील अकराव्या मजल्यावर असलेल्या एका बंद खोलीत नेले. त्यानंतर त्याने तिला आरडाओरडा करशील तर मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करुन घटनास्थळावरून पसार झाला होता.

घडलेल्या प्रकारामुळे पीडित भयभीत झाली होती. त्यानंतर घरी येऊन तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती घरच्यांना दिली. नातेवाईकांनी तिला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याना दिली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकास अटक करून त्याच्याकडून अर्धा किलो कोकेन जप्त केले

प्रतिनिधी: अवधुत सावंत (मुंबई ): अंमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने एका इसमाकडून तब्बल अर्धा किलो कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सदर इसमास आग्रीपाडा म्युन्सिपल शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानातील इलेक्ट्रिक पोल जवळून फारुख उमरभाई नावाच्या इसमास, आग्रीपाडा रोड येथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून एकूण तब्बल अर्धा किलो कोकेन ज्याची बाजारात अंदाजे किंमत रुपये १,५०,००,०००/- आहे असा हा अंमली पदार्थ मिळून आला.

सदरचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांकडून मीडिया ला सांगण्यात आले.

काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-१ ने धडक कारवाई करत एकूण १५,६९,२७६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

मिरा भाईंदर प्रतिनिधी : गेल्या काही दिवसां पासून गुन्हे शाखा क्र. १ काशिमीरा यांचेकडून प्रतिबंधित गुटखा साठवणूक करणारे आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जात असून लाखोंचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अशाच प्रकारची मोठी कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ यांचेकडून करण्यात आली असून शुक्रवार १९ मार्च रोजी पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भाईंदर पश्चिमेकडील जलाराम जनरल स्टोर्स या दुकानावर छापा टाकून ९,८८,१३२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे भाईंदर पश्चिमेलाच गणेश देओल नगर या झोपडपट्टीत सार्वजनिक सौचालायाच्या बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण ५,८१,१४४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

काशिमीरा गुन्हे शाखा युनिट क्र. १ अशा प्रकारे धडक कारवाई करत एकाच दिवसात एकूण १५,६९,२७६ रुपये किमतीचा माल जप्त केला असून भाईंदर पोलीस ठाण्यात अनुक्रमे गुन्हा नोंद क्र. ११२/२०२१ भादवीस कलम ३२८, १८८,२७३ अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे कलम २६(२) (४), ३०(२)(ए) आणि त्याच ठिकाणी गुन्हा नोंद क्र. ११३/२०२१ भादवीस कलम ३२८, १८८,२७३ अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे कलम २६(२) (४), ३०(२)(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख व गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र. १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या सहकार्याने सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे, पोलीस हवालदार संदीप शिंदे, किशोर वाडिले, अविनाश गर्जे, पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, विकास राजपूत व त्यांचे इतर सहकारी यांनी मिळून कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग अडसूळ करीत आहेत.

मिरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला त्याच बरोबर सुगंधित तंबाखू यांच्या वाहतुकीवर सतत कारवाया केल्या जात असून आता पर्यंत कोट्यवधींचा माल जप्त केला गेला आहे तरी देखील मात्र या प्रतिबंधित मालाची चोरटी वाहतूक आणि साठवणूक काही कमी होताना दिसत नाही. अशा प्रकारच्या प्रतिबंधित मालावर कशा प्रकारे नियंत्रण आणले जाईल हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला आहे.

पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख बाबत 100 कोटी वसुलीचा केलेला दावा खोटा?

मुंबई, प्रतिनिधी : सचीन वाझे प्रकरणात रोज नवनविन खुलासे होत असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली. अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं, असा आरोप परमवीर सिंह यांनी एक पत्रातून केला होता. त्यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे एका नामांकित वर्तमानपत्राच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावलं. मात्र ज्या दिवशी सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. तसंच त्यावेळी देशमुख यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे.
या कागदपत्रांमुळे आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांच्या दाव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

त्याच प्रमाणे परमबीर सिंह यांनी जर हा विषय माहीत होता तर त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत का केलं नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेला दावा खरा की खोटा? याची सखोल चौकशी झाल्यानंतर नंतर समोर येणार आहे.

दरम्यान, ही कागदपत्रे समोर आल्यानंतर परमवीर सिंह यांनी अद्याप कोणतीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया दिलेली नाही. आता ते या विषयावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाईंदर उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा झाला शुभारंभ

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेकवॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. त्यावेळी आमदार  गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे,  उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, राजू भोईर, महिला संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक शुभांगी कोटीयन, गटनेते व शहर संघटक नीलम ढवण, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील विधानसभा क्षेत्र विक्रम प्रताप सिंग, उपशहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष प्रमोद सामंत, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेड गौर्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर, व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार मोठया संख्येने उपस्थित होते.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी राजन विचारे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 16 ऑक्टोंबर 2015 रोजी या उत्तन परिसरात मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग व मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती. त्यामध्ये समुद्रामधील खडकावर दिशादर्शक दिवा व उत्तन भातोडी बंदराजवळ मच्छिमारांना मूलभूत सुविधांसाठी  जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारावे या दोन मच्छीमारांच्या प्रमुख मागण्या होत्या.

खासदार राजन विचारे यांनी 28 मार्च 2016 रोजी तत्कालीन महसूल व मत्स्यव्यवसाय मंत्री माननीय एकनाथ खडसे यांची भेट घेऊन या उत्तन परिसरात आत्तापर्यंत मच्छीमारांसाठी कोणतेही मोठे काम याठिकाणी करण्यात आलेले नाही. त्यासाठी या ठिकाणी जलभंजक उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केली होती. त्यानुसार मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार सन 2016-17 राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधीतून तरतूद करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले.

या कामाच्या निधी उपलब्धतेसाठी अंतिम मंजुरीसाठी खासदार राजन विचारे यांनी या कृषी व पणन विभागाचे सचिव आबासाहेब जराड यांची भेट घेऊन राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून 44 कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळवली. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून तांत्रिक अडचणीमुळे निविदा प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याने राजन विचारे यांनी त्यांच्यावर नाराजी दर्शवली होती.

खासदार राजन विचारे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मत्सव्यवसाय विभागाकडून पुणे येथे संकल्पचित्र बनविण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सी डब्ल्यू पी आर एस सेंट्रल वॉटर अंड पॉवर रिसर्च सेंटर यांच्याशी तसेच तांत्रिक मान्यतेसाठी बेंगलोर येथे सी आय सी इ एफ यांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर नव्याने आलेल्या  महाविकास आघाडी सरकारच्या पाठपुराव्याने सी आर झेड व एम सी झेड एम ए यांची ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मंजुरी मिळवली.

त्यांच्या प्रयत्नाना अखेर यश आले असून आज या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या प्रकल्पामध्ये उत्तन भातोडी बंदर येथे 260 मी. ब्रेकवॉटर, 60 मी. X 25 मी. बोटयार्ड, पाणीपुरवठ्यासाठी 1 पंपगृह आणि 70 सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आणि उत्तन पातान बंदर येथे 230 मी. ब्रेकवॉटर, 60 मी. X 25 मी. बोटयार्ड, पाणीपुरवठ्यासाठी 1 पंपगृह, सौर ऊर्जेवर चालणारे 70 दिवे लावण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

खासदार राजन विचारे यांच्या प्रदीर्घ पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाले आहे अशी माहिती मच्छीमार संघटनेच्या वतीने देण्यात आली व त्यांनी खासदार राजन विचारे यांचा जाहीर सत्कार या वेळी करण्यात आला.