Home Blog Page 299

कोविड लसीकरण केंद्रे आता राहणार २४ तास सुरु!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वय वर्ष ६० पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींची लसीकरण सध्या सर्वत्र करण्यात येत आहे. याअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ९ मार्च २०२१ पर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील सह्व्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील १५ हजार २७२ व्यक्तींचं लसीकरण ९ मार्च २०२१ पर्यत करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबई मधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सात हि दिवस आणि दिवसाचे २४ तास लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या प्रसत्वास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

रेल्वेत नोकरी देतो असे सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचारी गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

अंबरनाथ – रेल्वेत नोकरी देतो सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेत विविध पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे हा भामटा एका रेल्वे कँटीनमध्ये काम करणारा कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कैलास राजपाल सिंग असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे .

रेल्वेचे बनावट कागदपत्र देऊन फसवणूक

बदलापूर शहरात कुमार चव्हाण हा बेरोजगार तरुण राहतो. तो गेल्या काही वर्षापसून नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख आरोपी कैलास राजपाल सिंग याच्याशी झाली होती. त्यावेळी या भामट्याने कुमारला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपी कैलास हा आयआरसीटीसीच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका कँटीनमध्ये काम करत होता. त्यातच या भामट्याने बनावट परीक्षा, बनावट नोकरीचे मुलाखत पत्र दिले. त्यांनतर कुमार कडून 5 लाख रुपये त्याने उकळले.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार

भामट्याने आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्याने त्याला बनावट नियुक्तीपत्रही दिले. मात्र, हा सगळा प्रकार बनावट असल्याचे कैलास यांच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याने कुमार याने पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता आरोपी कैलाश हा प्रत्येक एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता.

प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील

पोलीस तपासात भामट्याच्या या प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. विशेष म्हणजे आरोपी कैलास सिंग हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. आता पोलीस पथक या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शोधात असून अशाच प्रकारे या त्रिकुटाने अनेक बेरोजगारांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आरोपी कैलास सिंगला विरार परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.

राज्यातील MPSC परीक्षेची तारीख आज जाहीर होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितले. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरे यांनी प्रकाशझोत टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या ८ दिवसात हि परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. त्यांनतर आता परीक्षेची कोणती तारीख घोषीत होते? याकडे च्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत.
राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या ८ दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

मिलन शाह, निगडी, पुणे : विनामास्क फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अडवले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्या बहाद्दराने आपण इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) दिल्लीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली आणि तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि तो तोतया आयबी पोलीस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निगडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

प्रतीक सुनील भावसार (वय २५, रा. वाकड) असे तोतया आयबी पोलिसाचे नाव आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना एक तरुण दुचाकीवरून (एम एच 12 / एम एस 3035) विनामास्क आल्याचे दिसले.

बोधवड यांनी तरुणाला थांबवले आणि मास्क न वापरल्या बद्दल ५०० रुपये दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर तरुणाने आपण आयबी दिल्ली मध्ये कार्यरत असल्याचे सरळसोटपणे सांगितले.

बोधवड यांनी तरुणाकडे ओळखपत्र मागितले असता त्याने आयबीमध्ये कार्यरत असल्याने ओळखपत्र दाखवून ओळख सांगता येत नसल्याचे सांगितले. त्याचा संशय आल्याने बोधवड यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

वरिष्ठांनी थेट आयबीमध्ये संपर्क करून संबंधित तरुणाची माहिती काढली. मात्र, असा कोणताही तरुण आयबीमध्ये कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

मूत्रपिंड विकार असलेल्यांनी उत्तम आयुष्य कसे जगावे..???

World Kidney Day

सध्या देशात अनेक लोक मूत्रपिंड विकारासह आयुष्य जगताना दिसून येत आहेत. या आजारांबद्दल लोकांमध्ये फारशी माहिती नसल्याने या आजाराकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रपिंड निकामी झाल्यास मृत्यू अटळ आहे, असे मानून अनेक जण धास्तावतात. परंतु, मूत्रपिंड विकार म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास मूत्रपिंडाने त्रस्त असणारे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.

मूत्रपिंड हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचे कार्य मूत्रपिंड करते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्यपद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतु, योग्यरित्या काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. मूत्रपिंड दररोज १८० लीटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लीटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणासह मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते. रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीलाही मदत मिळते.

मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षातच येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येता. पण या आजाराबद्दल माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळीच निदान न आल्याने आजार बळावतो.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मूत्रपिंडाच्या आजाराने पिडित अनेक रूग्णांना वर्षांनुवर्ष औषध आणि डायलिसिस वर राहावे लागते. यातील अनेक रूग्णांना मानसिक दडपणही येतं. परंतु, जीवनशैलीत आवश्यक बदल केल्यास हे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात.

तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर कसे जगायचे ते जाणून घ्या…

1. निरोगी आहार घ्या – मूत्रपिंडाच्या समस्येमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकते. यामुळे मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. रक्तदाब व मधुमेही रूग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ताजी फळे, भाज्या आणि बटाटे आणि संपूर्ण धान्य यासारख्या पदार्थांचे आहारात समावेश करा. नियमित आहारात सोयाबीन, डाळी, मासे आणि अंडी समाविष्ठ करा. जेवणात मीठाचा वापर कमी करा. मसालेदार, तेलकट आणि जंक फूड खाऊ नये. मूत्रपिंडाची समस्या असल्यास द्रवपदार्थाचे अधिकाधिक सेवन करा.

2. शारीरिक स्वास्थ्य राखा – मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रूग्णांनी शारीरिक स्वास्थ्यसाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. याशिवाय तुम्ही फिजिओथेरपिस्टचाही सल्ला घेऊ शकता.

3. मद्यपान आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळा – धुम्रपानाच्या सेवनामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपानाचे सेवन करणं शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे दारूचे अतिरिक्त व्यसनही आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.

4. नियमित पाठपुरावा करा – आपल्या शरीरात होणारे बदल लक्षात घ्या. काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधांसंदर्भात कुठलीही शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा. नियमितपणे रक्तातील साखरेची मात्रा तपासून घ्या.

5. कुटुंबियांशी आपल्या स्थितीबद्दल बोला – स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवू नका. आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दल कुटुंबियांशी मनमोकळेपणे बोला. मूत्रपिंडाने त्रस्त असणाऱ्या इतर लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. याशिवाय मनातील भिती घालवण्यासाठी समुपदेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.

लेखक : डॉ. महेश प्रसाद, सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट, वोक्हार्ट रूग्णालय मीरारोड