Home Blog Page 3

भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिली पदोन्नती?

मिरा-भाईंदर महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळेचा अजब कारभार!

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचे कारण सांगून मंगळवार दिनांक 03 जून 2025 रोजी काही ठराविक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नती देण्यात आलेल्यांपैकी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या काही अधिकाऱ्यांना देखील ‘आश्चर्यकारक’ पद्धतीने महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे यांच्या उपस्थितीत पदोन्नतीचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी असलेले प्रकाश बोराडे यांची उप- मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत असलेले अल्पेश संखे, सदानंद पाटील, डॉसन ढोल्या व प्रशांत गुरव यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. लेखा विभागात कार्यरत असलेले लेखाधिकारी उत्तम तारमाळे यांना उप- मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रशांत जानकर यांना शाखा अभियंता (विद्युत) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे त्या त्या विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात असला तरी या पदोन्नती दिलेल्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी असलेले प्रकाश बोऱ्हाडे यांचेवर अग्निशमन विभागातील वाहन खरेदी प्रकरणात तसेच कर्मचारी निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप झालेले असून त्या प्रकरणांची सद्ध्या चौकशी सुरू आहे. या भ्रष्टाचारा बाबत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या देखील छापून आलेल्या आहेत.

त्याच प्रमाणे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागात आणि सद्ध्या विद्युत शाखेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले प्रशांत जानकर यांना तर शौचालय स्प्रे पंप खरेदी प्रकरणात लाखों रुपयांचा भ्रष्टाचार केले म्हणून ‘दोषी’ ठरविण्यात आले असून प्रशांत जानकर यांचेकडून तब्बल सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात येणार नसल्याचे सेवा पुस्तिकेत नोंद असून देखील त्यांना बेकायदेशीरपणे पदोन्नती देण्यात आल्यामुळे या पदोन्नती प्रकरणात देखील भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुळात एखाद्या अधिकाऱ्याला पदोन्नती देताना त्यांच्या सेवा पुस्तिकेचे मूल्यमापन केले जाते. अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, कार्याची सचोटी, निष्कलंक प्रतिमा याचा सर्वांकष अभ्यास करूनच पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु ह्या वेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे यांनी पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून पाहिली का? आणि जर पाहिली असेल आणि तरी जर ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली गेली असेल तर या पदोन्नती प्रक्रियेत नक्कीच भ्रष्टाचार झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त तथा प्रशासक राधा बिनोद शर्मा यांनी नुकताच आपल्या आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांना अजून महापालिका प्रशासनाच्या सर्व विभागांची आणि अधिकाऱ्यांची ओळख देखील झालेली नाही. आणि म्हणून कदाचित त्यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीची माहिती दिली गेली नसावी किंवा त्यांची दिशाभूल करून ही पदोन्नती प्रक्रिया पार पाडली असावी अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असून अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर अधिकारी असल्याची त्यांची ख्याती आहे. असे असताना त्यांच्या कार्यकाळात जर अशा प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली गेली तर त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतील आणि म्हणून आता ते या प्रकरणात काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

*स्कॉलरशिप परीक्षेत किलबिल चे घवघवीत यश….*

अहमदपूर:- मासूम शेख

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये किलबिल नॅशनल स्कूल शाळेचे इ. 5 वी वर्गाचे इंग्रजी माध्यम शिष्यवृत्ती परीक्षेत 47 विद्यार्थी पात्र झाले असून असून त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी 196 पेक्षा अधिक गुण घेऊन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांना शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर जाधव व धनेश्वर आगलावे यांनी मार्गदर्शन केले. शाळेमध्ये दररोज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते. त्यामध्ये स्कॉलरशिप, नवोदय, सातारा सैनिक स्कूल, ऑलंपियाड यासारख्या स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली वर्गापासून ते दहावी वर्गापर्यंत घेतल्या जातात व त्याची तयारीही तितक्याच चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत

01) संस्कार तेलंग 268
02) श्लोक आलापुरे 258
03) तेजस रणखांब 252
04) संस्कार वलसे 244
05) शौर्य वाघमारे 244
06) सुशांत आगलावे 238
07) रुद्र भगत 218
08) संभाजी तिडके 210
09) प्रणव काटे 208
10) आदर्श हालगरे 196
11) मानसी हंगे 196

सदरील सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरम सिंग शिराळे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत सिटीस्कॅन आज पासून सेवा सुरू

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील एकमेव पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय येथे सामान्य नागरिकांसाठी आज सोमवार दिनांक 28 एप्रिल पासून मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी सोबत इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे शासनातर्फे राज्य शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनची व्यवस्था करून देण्यात येते. त्याच धर्तीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी सर्व प्रकारची मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेचा फायदा प्रामुख्याने टेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अंतररूग्ण IPD तथा बाह्यरुग्ण OPD रुग्णांसाठी होणार आहे. तसेच जे नागरिक येथे उपचार घेत नसतील पण त्यांना जर सिटीस्कॅन सेवा हवी असेल तर त्यांना देखील अगदी माफक दरात सिटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदरची सेवा ही दिवस रात्र म्हणजेच 24 ×7 चालू राहणार आहे. सद्यस्थितीला सदर सेवा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून कृष्णा डायग्नोस्टिक याना देण्यात कंत्राट देण्यात आला आहे. या प्रसंगी सदर सीटी स्कॅन मशीनचे विधिवत पूजा करून श्री नरेंद्र मेहता हांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदर रुग्णालयाचे प्रमुख जाफर तडवी, सदर कृष्णा डायग्नोस्टिकचे संचालक बल्लाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

*शैक्षणिक प्रशिक्षणाने शिक्षक परिपक्व अध्यापन करतो* *डायट च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांची प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

आज बदललेल्या युगामध्ये सर्वच क्षेत्रात क्रांतिकारक असे स्वरूपाचे बदल झालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक स्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकाराची अभ्यासक्रमाची प्रशिक्षण चालविण्यात येत आहेत. त्यात स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले होते आणि या कोर्सच्या अटी प्रमाणे ऑनलाइन कोर्स केलेल्या पात्र शिक्षकांची पी. एल. सी. प्रशिक्षण तालुकास्तरावर दि.22-3-2025 रोजी पूर्ण करून घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक परिपक्व होऊन विद्यार्थ्यांच्या समोर अध्यापन करतो असे आग्रही प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर भागीरथी गिरी यांनी केले.
त्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि राज्यस्तरीय गरजाधिष्टीत मिश्र माध्यम अभ्यासक्रम प्रशिक्षण 2024- 25 च्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉ. जगन्नाथ कापसे, यांच्या मार्गदर्शनानुसार व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या नियोजनानुसार सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रशिक्षण समन्वयक डॉ. कामाक्षी पवार होत्या. व्यासपीठावर सुलभक रत्नप्रभा मंडलवार, सुलभक श्रीमती मनीषा गुणाले, सुलभक शिवकुमार मठपती,सुलभक एस एम महालिंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की शिक्षकांनी नेहमी स्वतःला अपडेट ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे जाहीर आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप तालुका समन्वयक डॉक्टर कामाक्षी पवार यांच्या भाषणाने झाला.
या शिबिरात मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, प्राथमिक, माध्यमिक विषयाच्या शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेऊन ऑनलाइन मिश्र माध्यमिय अभ्यासक्रम व्यवसायिक अध्ययन समूह पी एल सी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार मठपती यांनी सूत्रसंचालन माधव मठवाड यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
या प्रशिक्षणात सबंध तालुक्यातून 73शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट संधान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या जाचातून मिरा भाईंदरकरांची होणार कायमची सुटका?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात सकारात्मक उत्तर

मात्र आमच्या प्रयत्ना मुळेच हा प्रश्न सुटला असा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील केला असून श्रेय घेण्यासाठी आमदार व मंत्री यांच्यात झुंपली?

भाईंदर / प्रतिनिधी:
लाखो मीरा भाईंदरकर नागरिकांची ‘इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनी’च्या जाचातून कायमची सुटका होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने गंभीरपणे पावले टाकली आहेत. मिरा भाईंदरचे स्थानिक आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून याबाबत आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंटचा जो काही जाच आहे तो सोडविण्याकरिता राज्य सरकारकडून आपण निश्चितपणे प्रयत्न करीत आहोत, त्यादृष्टीने निर्देश देण्यात आलेले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत तसे निर्देश दिल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली.

मिरा भाईंदरच्या इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज विधानसभा अधिवेशनात चर्चेस आला. स्थानिक आमदार व मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेळोवेळी याआधी वेधले होते.

आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे. या संदर्भात सरकारने एक कमिटी २०२४ मध्ये बनवली होती त्या कमिटीने सरकारला एक अहवाल दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने सरकारने असा निर्णय घेतला आहे की, आतापर्यंत असे होते कि इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत मिळाल्याशिवाय आपण पुढचे काय करत न्हवतो. आता इस्टेट इन्व्हेंस्टमेंटच्या ना-हरकतीला अधीन राहून आपण सगळ्या प्रकारच्या परवानग्या देत आहोत. इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत (एनओसी) याकरिता घ्यावी लागते कारण त्यासंदर्भात कोर्टात एक केस सुरु आहे, कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु त्याहीसंदर्भात आता आपल्या वरिष्ठ सचिवांना सांगितले आहे कि या केसचा फॉलोअप करून, याठिकाणी हि केस निकाली काढणे आणि हा ‘स्टे’ त्याठिकाणी हटविणे यासंदर्भातील निर्देश विभागाला देण्यात आलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे विशेषतः मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा जो जाच आहे तो सोडविण्याकरिता आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

असे असेल तरी हे प्रकरण आम्ही लावून धरल्यामुळे आता इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या जाचक अटीतून मिरा भाईंदरकरानां सुटका मिळणार असा दावा मिरा भाईंदर शहराचे 145 विधानसभा मतदार संघाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
त्यामुळे इस्टेट इन्व्हेस्टमेंट या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात नेहमी प्रमाणे श्रेय घेण्याची चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे.