Home Blog Page 303

बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने सर्वचच शासकीय यंत्रणा सज्ज होऊन आपआपल्या परीने महाभयंकर कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यातच उल्हासनगर पोलीस परिमंडळच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र कायदा व नियम धाब्यावर बसवुन ऑर्केष्ट्राच्या नावाखाली डान्सबारमध्ये छमछम सुरु असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच छमछम बार मधील नृत्यावर एका बारबालासोबत बेधुंद होऊन आपल्या नृत्य कलाविष्कार सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वैजनाथ राख असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

छमछम’ला कोणाचा आर्शिवाद ?

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या डान्सबार विरोधात अनेक संघटना व समाजसेवकांनी तक्रारी करुनही या डान्सबारवर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप होत असतानाच, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत पेट्रोलियम समोरील “राखी बार” मध्ये ऑर्केष्ट्राच्या नावाखाली छमछम रात्री उशिरापर्यत सुरु असते. याच बारमध्ये वैजनाथ राख हा पोलीस कर्मचारी जेव्हा एका बारबाला बरोबर बेधुंद होऊन तिचा हात हातात घेऊन तिला गोल फिरवत “जब में आई सुहागवाली रात में उसने चुमेशी किया सुरुवात रे” व “आई लव यु प्यार करु छु” या गाण्यावर नृत्य सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कोणाच्या आशिर्वादाने हा डान्सबार सुरु आहेत याचा छडा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लावल्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या!

प्रतिनिधी: अवधुत सावंत (कल्याण)

कल्याणात ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून झालेल्या हत्येला २४ तास उलटत नाही तोच डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील असणाऱ्या लोढा हेवन परिसरात रेशनिंग दुकानातील मागील बाजूस दारू पिऊन झालेल्या वादातून एका ३० वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे शहरात मात्र एकचं खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की श्वेता गुप्ता (३०) असं मयत महिलेचं नाव असून श्वेता गुप्ता आणि तिचा पती राजेश गुप्ता हे डोंबिवलीतील लोढा हेवन येथील भवानी चौक परिसरात गेले दहा वर्ष रेशनिंग चं दुकान भाडेतत्वावर चालवत होते.

काल रात्रीच्या सुमारास याच रेशनिंग दुकानातील मागील बाजूस राजेश गुप्ता, त्याची पत्नी श्वेता गुप्ता व त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा कामगार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग हे तिघेही दारू पित बसले होते. यावेळी श्वेता हिने आपल्या प्रियकराचे नाव घेतल्याने पती राजेश गुप्ता हा रागावून बाहेर निघून गेला. याच दरम्यान कामगार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग याचा श्वेता गुप्ता हिच्याशी वाद झाला व त्याने श्वेताची गळ्यावर वार करत तिची हत्या केली.

पती राजेश याने मानपाडा पोलीस यांना तक्रार दिल्यावर मानपाडा पोलीस यांनी तक्रारीनुसार गुडीकुमार श्रीराम इकबाल सिंग या कामगाराला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे यांनी मिडियाला सांगितले.

ऑन ड्युटी पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयीन कोठडीची हवा

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

मास्क विना फिरणाऱ्या बेपरवाह नागरिकांवर कारवाई करणाऱ्या ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा फैलाव पुन्हा दुप्पटीने होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच ऑन ड्युटी वर असताना मास्क बाबत एका तरुणाला विचारणा करणाऱ्या पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करून धक्काबुकी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-4 परिसरातील श्रीराम चौकात घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा भावांना अटक केली गेली आहे. आशिष व आकाश त्रिपाठी (रा. प्रभुरामनगर कोळसेवाडी) असे ऑन ड्युटी पोलिसाला शिवीगाळ करून धक्कबुकी करणाऱ्या आरोपी भावांची नावे आहेत.

दोघांचीही कारागृहात रवानगी…

जिल्ह्यातील विविध शहरात कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य चौकांसह अन्य ठिकाणी स्थानिक महापालिका पथक व पोलीस कर्मचारी विना मास्क बेपरवाह फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. अशाच एक कारवाई दरम्यान उल्हासनगरमधील कॅम्प नं-4 येथील श्रीराम चौकात विना मास्क फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हटकले. यामुळे तो तरुण संतप्त होऊन पोलिसाला जाब विचारण्यासाठी घरी जाऊन भावाला घेऊन आला. दोघा भावांनी त्या ऑन ड्युटी पोलिसाला विना मास्क जाताना का हटकले ? याचा जाब विचारून त्या पोलिसाला भर भरस्त्यातच शिवीगाळ केली.

याप्रकारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या आशिष व आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलीस व महापालिका पथकाने नागरिकां सोबत उद्धटपणाणे वागण्या ऐवजी सहानुभूतीपूर्वक वागावे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वसई कोव्हीड लसीकरण केंद्रावरच उडाला सामाजिक अंतराचा फज्जा ! लसीकरण केंद्रच बनले करोनाचे आमंत्रण केंद्र?

वसई, आकाश पोकळे : वसई विरार मध्ये करोना लसीकरणाची सुरवात चालू आहे. मात्र येथेच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “लोकां सांगे ब्रम्हज्ञान; आपण कोरडे पाषाण” अशी अवस्था वसई-विरार आरोग्य विभागाच्या लोकांची आहे असे बोलले जात आहे.

वसई पूर्वेकडील वाळीव येथील वरुण इंडस्ट्रीयल इस्टेट येथील लसीकरण केंद्रावर करोनाची लस देण्याचे कार्य सुरु आहे. मात्र येथे लसीकरणाच्या दरम्यान नागरिकांमध्ये एक वित येवढ देखील अंतर राखले जात नाही. तसेच कित्येक नागरिक तोंडावर मास्क न लावता सर्रास वावरताना दिसत आहे.

येथे सुरक्षा रक्षक असुन देखील दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, येथे लोकं करोनाची लस घेण्यासाठी आले आहेत की कारोनाला आमंत्रण देण्यासाठी येत आहेत? येथे सामाजिक अंतराचे उघड उघड उल्लंघन केले जात असून देखील येथील आरोग्य अधिकारी काय करीत आहेत? या आरोग्य केंद्रावर सामाजिक अंतर का पाळले जात नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बालाजी गार्डन सोसायटीचा कचरा महापालिकेने उचलण्यास बंद केल्याने रहिवाश्यांनी विचारला जाब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

डोंबिवली जवळील कोपर येथील बालाजी गार्डनमध्ये ९ सोसायट्या असून जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायटीचा ओला कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असून ही घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार सोसायटीकडून त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कल्याण – डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्यांचा कचरा गेल्या तीन-चार दिवसांपासून उचलला जात नाही व त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. आमदार पाटील यांनी रहिवाश्यांना घेऊन डोंबिवली विभागीय कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली.

घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार ज्या सोसायटीचा कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असेल त्यांची विल्हेवाट सोसायटीनेच लावायची आहे. कोपर येथील बालाजी गार्डन या सोसायटीचा कचरा देखील १०० किलो पेक्षा अधिक होतो. परंतु सोसायटीच्या आवारात कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. गेल्या दोन दिवसात पालिकेने कचरा उचलला नाही याचा जाब विचारण्यासाठी रहिवाशी डोंबिवली विभागीय कार्यालयात आले होते.यावेळी रहिवाश्यांबरोबर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील ही उपस्थिती होते.

यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधाकर जगताप, राजेश सावंत, संजय रोकडे आणि सोसायटीतील रहिवासी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. बालाजी गार्डनमध्ये एकूण नऊ सोसायटी असून सदानिकांची संख्या ५२२ इतकी आहे. या सोसायटीतील रहिवाश्यांची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. सोसायटी वर्षाला ५५ लाख रूपये मालमत्ता कर महापालिकेला भरते. गेल्या दोन-तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निर्देशानुसार ओला आणि सुका कचरा वर्गीकरण पालिकेच्या गाडय़ांकडे दिले जाते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून महानगरपालिकेने कोणतेही पूर्वसूचना न देता सोसायटीतील कचरा उचलणे बंद केले आहे.

सध्या कोरोना महामारीची परिस्थिती आहे. या परिस्थितीत कचरा न उचलणो म्हणजे कोरोना किंवा इतर रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. सोसायटीतील लहान मुले, वृध्द आणि गरोदर स्त्रिया यांना देखील ह्या दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. सोसायटीतील कुणीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची असेल असा इशारा त्यावेळी सोसायटीच्या वतीनें महापालिकेला देण्यात आला. सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आर्थिक व मानसिक दबावाखाली सर्व रहिवासी असून त्यात महापालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रहिवासी आणखीनच विवंचनेत पडले आहेत. दर वर्षाला मालमत्ता कर न चुकता भरतो तरीही हा अन्याय का ? असा सवाल रहिवाश्यांनी निवेदनातून विचारला आहे.

या यासंदर्भात रामदास कोकरे यांना विचारले असता ते म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे त्या सोसायटीनेच ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ही सोसायटी कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही ती त्यांची चूक आहे. पुढील काळात सोसायटीनेच कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे ही ते म्हणाले. तसेच कोकरे यांनी उद्यापासून सोसायटीचा कचरा उचलला जाणार आहे. सात दिवसांनी एक बैठक घेण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.