Home Blog Page 309

“सासो में तुम” श्रेयस देशपांडेच्या या नव्या संगीत अल्बमचे पुण्यात थाटात प्रदर्शन

इम्रान खान, नांदेड प्रतिनिधी : नांदेडचा जिल्ह्यातील उमरी तालुक्याचा भूमिपुत्र असलेला सॉफ्टवेअर इंजिनियर श्रेयस देशपांडे याने आपली अंगभूत कला जोपासत आपल्या आणखी एक “सासो में तुम” या संगीत अलम्बमची आपल्या चाहत्यांना “व्हॅलेंटाईन डे” निमित्त भेट दिली आहे.

मूळ उमरी जि. नांदेडच्या असलेल्या या भूमीपुत्राने आजवर संगीत क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याचे आजवर प्रसिध्द झालेल्या संगीत अल्बम मध्ये या नवीन अल्बम ची भर पडली. पुण्यातील झील इन्स्टिट्यूटच्या संगीत डिपार्टमेंटचा कल्चर हेड असलेल्या श्रेयसचे आजपर्यंत अनेक अल्बम प्रदर्शित झाले. बेधुंद मी, साथ असताना तू, सेहमासा, पुण्यातील लव्हस्टोरी आणि मागच्या काही महिन्यांपूर्वीच यु ट्यूब वर रेकॉर्ड ब्रेक केलेला “पता है” च्या प्रदीर्घ यशानंतर आता “सासो में तुम” हा अल्बम प्रदर्शित होतोय ही त्याच्या चाहत्यांसाठी खुप आनंदाची बाब आहे.

श्रेयसचे पुण्यात स्वतःचे दोन स्टुडिओ आहेत. झील इन्स्टिट्यूटचे झील रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि झील मीडिया हाऊस. श्रेयसचे पुण्यात लाईव्ह कार्यक्रम होत असतात. तो एक प्रतिभासंपन्न असा उमलता गितकार आहे. हिंदी आणि मराठी अशी अनेक गाणी त्यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली आहेत. त्याच सोबत अनेक विविध मराठी मालिकांना आणि चित्रपटाला त्यांनी संगीत देखील दिलेलं आहे. आणि अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

झील कॉलेजचे सर्वेसर्वा संभाजी काटकर सर यांचा आणि झील कॉलेजचे शिल्पकार जयेश काटकर सर यांचा श्रेयसच्या यशात सिहांचा वाटा आहे. याचसोबत झील कॉलेजचे डिरेक्टर प्रदीप खांडवे सर यांचे मार्गदर्शन आणि उत्तम साथ श्रेयस यांना नेहमीच असते.

या क्षेत्रात उत्तरोत्तर त्याच यश वाढत जावो. त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असल्याने त्यांनी या शुभमुहूर्तावर हा अल्बम प्रदर्शित करण्याचे ठरवले.

सासो में तुम ह्या अल्बम चे गीत, संगीत, संगीत संयोजन आणि निर्माता श्रेयस देशपांडे असून सूहित अभ्यंकर यांनी हे गीत गायलं आहे , गीताचे सहसंयोजन तन्मय संचेती च आहे तर ग्राफिक डिझाइन कल्पक निगडे यांनी तयार केलं. गाण्याचे एडिटिंग अभिषेक वडजे यांचं आहे. गाण्याचे छायाचित्रकार स्वप्नील पंगती यांचं आहे.

त्यांच्या या अल्बम साठी झील इन्स्टिट्यूट चे सचिव जयेश काटकर सर, झील इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर प्रदीप खांडवे सर, प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी, गीतकार, संगीतकार अवधूत गुप्ते, स्वप्नील जोशी, कोरिओग्राफर राहुल माने, रोहित माने, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. राजन धसे, अक्षर इंगळे, सागर भूमकर आणि अभिनेते अनिल नगरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

श्रेयस यांच कुटुंबीय नेहमीच त्यांच्या पाठीशी असतं. त्यांच्या यशाचं श्रेय ते त्यांच्या आई -वडील आणि पत्नी गायत्रीला देतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा! रसिकांनी हा अल्बम जरूर पहावा आणि भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन ‘सासो में तुमच्या’ संपुर्ण टीमकडून करण्यात आले आहे.

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? याचे उत्तर गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे लागेल! – नाना पटोले

मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले आहेत तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना देखील पकडले गेले आहेत. भाजपाने आता त्या ही पुढे जाऊन एका बांग्लादेशी नागरिकालाच मुंबईत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी केल्याचे उघड झाले आहे. सीएए कायद्याचा धाक दाखवणाऱ्या भाजपासाठी हा कायदा लागू होत नाही का? त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? याचे उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाने दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विलेपार्ले येथे आयोजित गुजराती समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सिंग सप्रा, गुजराती सेलचे भरत पारेख यांच्यासह गुजराती बांधव उपस्थित होते.

भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा नेहमीच दुसऱ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतो. पण त्यांचेच राष्ट्रप्रेम बेगडी आहे हे रुबल शेख या बांगलादेशी नागरिकाला उत्तर मुंबईचा पदाधिकारी करुन दाखवून दिले आहे यावरून सिद्ध झाले आहे. भाजपाचा पदाधिकारी झाल्यानंतर तो बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सीएए कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार आहे का? देशात लोकशाही नाही का? याची उत्तरे भाजपाला द्यावी लागतील.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. इंधनाच्या किमती सरकारच्या हातात नाहीत असे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनीच राज्यसभेत जाहीरपणे कबुल केले आहे. हे सरकार फक्त ‘हम दो हमारे दो’ यांचेच आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट आली तर ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असेल! जगभरातील शास्त्रज्ञानी दिला इशारा!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या वर्षभरापासून जगातील अनेक देश कोरोना महामासाथीचा सामना करत आहेत. अनेक देशात लाॅकडाऊनसारख्या पर्यायाचा सातत्याने अवलंब करावा लागत आहे. भारतासह बहुतेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली तरी देखील गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ झाल्याचे दिसत असून त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट येणार आणि ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असणार असे दिसत आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही दुसरी लाट अधिकच भयंकर असल्याचं स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांत जगातील 46 देशांमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली. ज्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली त्या देशांमध्ये भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या 46 देशांमध्ये मार्च ते मे 2020 दरम्यान आलेल्या पहिल्या लाटेत 2.20 लाख जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान याच 46 देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 6.20 लाख लोक मृत्यूमुखी पडले. म्हणजे जवळपास मृतांच्या आकडेवारीत 4 लाखांनी वाढ झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम युरोपीय देशांमध्ये दिसून आला. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलॅंड, स्पेन आणि स्वीडनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. तसंच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेतील लाखो लोक मृत्यूमुखी पडले.

अमेरिकेत मार्च ते ऑक्टोबरदरम्यान कोरोनाचे एकूण 1 कोटी रुग्ण सापडले. पण त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत ही संख्या वाढून 2 कोटींवर पोहोचली. फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये दुसऱ्या लाटेमुळे मोठे नुकसान झाले.

या सगळ्यात अत्यंत भीतीदायक गोष्ट म्हणजे ब्रिटन आणि आफ्रिकी देशांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा नवा आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट आढळून आला. सध्या ब्रिटन आणि आफ्रिकेतील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सर्वाधिक नुकसानकारक ठरत आहे. तसंच तो अन्य देशांमध्ये वेगानं फैलावत आहे.

इस्त्राईलमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. जगभरात प्रतिमहिना मृत्यूदर पाहिला तर तो ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रति एक लाखांमध्ये 12 असा होता. तर मार्च ते मे दरम्यान प्रति एक लाखांत 8 होता.

त्यामुळे आता भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यास ती पूर्वी पेक्षा हि भयंकर असणार अशी शक्यता वर्तविली जात आहे आणि म्हणून सर्वच नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे काटोकोरपणे पालन करावे असे आवाहन सरकार तर्फे करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार – सत्यजित तांबे

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार 17 फेब्रुवारी रोजी मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीलाच शहरात त्यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी काशिमिरा येथील शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून सुरवात केली, त्यानंतर मिरारोड येथील काँग्रेस कार्यालयात शहरातील नामांकित साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह आयोजित चर्चासत्रात सहभाग नोंदविला, यावेळी बोलताना ठाणे, नवी मुंबई ह्यासारख्या शहरांमध्ये सांस्कृतिक व कला क्षेत्राची एक चांगली चळवळ सुरु असते मात्र मिरा-भाईंदरमध्ये साधं नाट्यगृह सुध्दा नाही, अशी खंत उपस्थित विविध क्षेत्रातील कलाकार मान्यवरांनी सत्यजित तांबे यांच्या समवेत चर्चा करतांना मांडली.

शहरातील मिरारोड येथे महामार्गावर असलेला जुना पेट्रोल पंप येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारला धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शहरातील नागरिकां समवेत संवाद साधला असता नागरिकांनी देखील मोदी सरकार विरोधात आपल्या तीव्र भावना व असंतोष व्यक्त करून काँग्रेसच्या घोषणामध्ये सामील होऊन नागरिकांनी आपले दुःख बोलून दाखवले.

सुपर १००० द्वारा संगठन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आदेश!

भाईंदर पूर्व, गोडदेव नाका येथील शुभम हॉल येथे मिरा भाईंदर युवक काँग्रेस व ओवळा माजीवडा युवक काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीस काँग्रेसचे नेते माजी विधानपरिषद सदस्य मुझफ्फर हुसैन, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ब्रिज दत्त, युवक ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी, जिल्हाध्यक्ष प्रमोद जयराम सामंत, गटनेते, नगरसेवक झुबैर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, नगरसेवक अश्रफ शेख, नगरसेविका गीता परदेशी यांच्या सह मोठ्या संख्याने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची आता काही खैर नाही! पोलीस करणार अटक!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलिस आता मुंबईमधील रस्त्यावर, घरोघरी भीक मागणाऱ्या भिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांकडून भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे.

भिक्षेकरी पकड मोहिमेंंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणार्‍या लोकांना मुंबई पोलिस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरवात करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त विश्‍वासराव नांगरे पाटील यांनी दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.

भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असून याचे पालन मुंबई पोलिस आता काटेकोरपणे करणार आहेत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकरांची संख्या वाढत आहे आणि या वाईट परिस्थितीला देखील आपला व्यवसाय बनवणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या मोहिमेला सुरुवात केली आहे.

मुंबईतील पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील १४ भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये पाठविण्यात आले. भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातो. काही वेळेला मुले चोरून त्यांना भीक मागायला प्रवृत्त केले जातें.

लोकांची सहानुभूती मिळवून जास्त पैसे मिळावे म्हणून नुकतच जन्मलेल्या बाळाला हे लोक उपाशी ठेवतात, ते बाळ सतत रडत राहावे, म्हणून त्याला नाहक त्रास देतात. त्या बाळाची पिळवणूक होत असते. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात. पैसे कमवण्यासाठीचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग काहींसाठी झाला आहे.

भीक मागणे ही इतकी वाईट अवस्था आहे, की आपल्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असे म्हटले जाते; पण त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. आदेश आल्याबरोबर पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली आहे. तसेच येणार्‍या दिवसात सुद्धा अशाच प्रकारे धडक कारवाया मुंबई पोलिसांकडून सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.