Home Blog Page 314

मिरा भाईंदर महापालिकेतील नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेला डावलून मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करताना राजकिय पक्षांनी आपल्याच कार्यकर्त्यांची सोय व्हावी म्हणून नुसती खोगीर भरती करण्यात आली असून सदर नियुक्त्या नियमबाह्य असून त्या तात्काळ रद्द करून पालिका निधीचा गैरवापर थांबविण्यात यावा अशी मागणी शहरातील सामाजिक संस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे निर्देश तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या नियमानुसार पालिकेचे स्वीकृत सदस्य नियुक्त करताना सामाजिक क्षेत्रात त्यांचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे त्याची विशेष पात्रता असणे आवश्यक असते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, वकील, शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, लेखापाल, अभियांत्रिकी पदवी धारक, महापालिकेचा निवृत्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आदी वर्गवारीतील असायला हवा. एकूण ७ संवर्गा पैकी प्रत्येक संवर्गातील एका पात्रता धारक व्यक्तीची नियुक्ती सुनिश्चित करता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करावा असे शासनाने स्पष्ट केलेले आहे.

तसे असताना मिरा भाईंदर शहरातील महापालिकेत २०१८ साली प्रशासन व सत्ताधारी भाजपने मिळून प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची केलेली नियुक्ती नियमबाह्य असून त्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक संस्था तर्फे केली जात आहे. प्रत्येक प्रभाग समित्यामध्ये जास्तीजास्त ३ स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ६ प्रभाग समित्या आहेत.

या समित्यांवर सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाने संगनमताने शासनाचे निर्देश डावलून आपल्याच पक्षाचे पदाधिकारी, गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आदींची नियुक्ती केलेली आहे. प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून कुठे तीन तर कुठे दोन अश्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

सदर नियुक्त्या करतेवेळी नियमांचे उल्लंघन झाले असल्याची तक्रारी करून देखील सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या बळावर निर्णय घेतले त्याच्याकडे पालिकेच्या नगरसचिव कार्यालयासह, प्रशासनाने देखील या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेचे कार्यकर्ते अंकुश मालुसरे यांनी केले आहेत.

ह्या राजकीय खोगीर भरतीला महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि त्या संबंधित ठराव करणारे हे सत्ताधारी नगरसेवक जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी केली आहे.
अशा प्रकारे नियुक्त केलेल्या स्वीकृत सदस्यांना आता पर्यंत देण्यात आलेले मानधन त्यांच्याकडून वसूल केले जावे. तसेच नियमात तरतूद नसताना प्रत्येकी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला तो कोणत्या निकषात करण्यात आला? याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान 2017 साली निवडणूक होऊन गेली तीन वर्षे महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आलेली नव्हती. आणि आता जेमतेम दोन वर्षे शिल्लक राहिली असताना ४ स्वीकृत सदस्य नेमण्याच्या सत्ताधारी भाजपाने महासभेत मंजूर केलेल्या ठरावाला राज्य शासना सोबतच उच्च न्यायालयाने देखील सर्वच स्वीकृत सदस्य नेमण्याच्या भाजपच्या ठरावाला स्थगिती दिली असून उच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या मनमानी आणि बेकायदेशीर मिळालेली हि चपराक आहे असे सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले.

तांत्रिक आणि विशेष कौशल्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शहरातील मान्यवरांचा पालिकेच्या कामकाजात चांगला उपयोग व्हावा असा हेतू स्वीकृत सदस्य पदा मागे आहे. परंतु मनमानी व भ्रष्ट कारभार करण्यास मोकळीक मिळावी तसेच केवळ राजकारण्यांची सोय लावण्यासाठी ह्या नियमबाह्य नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.

शहरातील तळागाळातील नागरीकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आंदोलन उभं करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसची – मुझफ्फर हुसैन

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसकडून युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाईंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप काकडे यांनी उपस्थित युवकांना संबोधित केले. शहरात अनेक समस्या आहेत. आपल्याला जनतेच्या घराघरात पोहचण गरजेचं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुढच्या निवडणुकीत १२ पेक्षा अधिक युवक काँग्रेसचे नगरसेवक असतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली त्याला 136 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर देशाच्या जनता काँग्रेस सोबत राहिली. सध्या देशाची परिस्थिती लक्षात घेता भाजप वाटोळं करायला निघाली आहे. भारताचे संविधान धोक्यात असून जनतेनं जागृत होणं गरजेचं आहे. देशात भाजप फक्त जातीपातीचे राजकारण करत आहे. देशाच्या मोठ्या संस्थांचा गैरवापर होत असल्याचं मत माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमात ५० हुन अधिक नव्या कार्यकर्त्यांना पदभार देऊन मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्याच प्रमाणे १६७ तरुणांनी युवक कॉंग्रेस मध्ये पक्षप्रवेश घेतला.

रस्त्यावरील अनधिकृत बस पार्किंगच्या मुद्द्यावर मनसे झाली आक्रमक! कठोर कारवाई करण्याची केली मागणी!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृत बस पार्किंग केल्या जातात. गेल्या आठवड्यात भाईंदर पश्चिम येथील भोला नगरच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये अपहरण करून एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा निंदनीय प्रकार घडण्याच्या आधी मनसेने अनेक वेळा मिरा भाईंदर शहरात होत असलेल्या अनधिकृत बस पार्किंग विरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पत्र व्यवहार केला होता जर आधीच कारवाई झाली असती तर असा प्रकार घडला नसता असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आता तर हा निंदनीय प्रकार घडल्या नंतर मनसे अनधिकृत पार्किंगवर होत असलेल्या कारवाईवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस बोस मैदानाच्या बाजूला आज देखील काही बस पार्क करण्यात आल्याचे समजताच मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ कळविले तसेच मनसेचे कामगार नेते व १४५ विधानसभा अध्यक्ष संदिप राणे, शहर सचिव अनिल रानावडे व महिला उपशहर अध्यक्षा सौ.वैशाली येरूणकर यांनी देखील त्या जागेवर जाऊन वाहतूक पोलिसांना या अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रसंगी विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष करण कांडणगिरे तसेच विनायक यादव, प्रमोद निळेकर, शरद मांडरे इत्यादी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात अशा प्रकारे अनधिकृत बस पार्किंग केल्या जात आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे परंतु ह्या बसेस मध्ये रात्रीच्या वेळी अनेक गैर प्रकार केले जात असून त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था देखील धोक्यात आली आहे म्हणून ह्या सर्व अनधिकृत बस पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आता यावर वाहतूक पोलीस विभाग किती गांभीर्याने कारवाई करेल याबद्दल शंका उपस्थित केली जात असून ह्या अनधिकृत बस पार्किंग करणाऱ्या बस मालकांकडून दर महिन्याला हप्ता दिला जातो असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ह्या आरोपात किती तथ्य आहे हे तर नंतर कळेल मात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या बसेस मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर बेशिस्तपणे बसेस पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे त्यांना बसेस उभ्या करण्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक! राज्यभरात करणार आंदोलने!

पुणे, प्रतिनिधी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलने करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या स्वतः मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील आंदोलनामध्ये सामील होणार असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडवून केंद्र सरकारला कडक शब्दांत जाब विचारावा, असे आवाहनदेखील त्यांनी महिला पदाधिका-यांना केले आहे.

गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास मध्यमवर्गीय गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे, असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार ही दरवाढ करू लागले आहे. त्यामुळे ही अन्याय्य दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती सातत्याने वाढविल्या आहेत त्यामुळे मध्यमवर्गीय गृहिणींना त्याचा चांगलाच फटका बसला आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करीत असून जो पर्यंत घरगुती गॅसच्या ह्या वाढलेल्या किमती कमी होणार नाहीत तो पर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार – श्रीमती.पौर्णिमा विष्णू काटकर (प्रदेश सचिव तथा पुणे शहर निरीक्षक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस)  

पुण्याच्या भीमा नदीच्या पात्रात सापडली पाच फूट उंचीची १ टन वजनाची पुरातन मूर्ती

मिलन शाह, पुणे : पुणे येथील भीमा नदीच्या पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंडाची उंची जवळपास पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी काम केलेला पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसऱ्या रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही अवाढव्य मूर्ती सापडली असून कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून ठेवली आहे.

स्थानिक नागरिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आली असावी. मात्र, मूर्तीचा प्रचंड आकार आणि वजन जास्त असल्याने ही मूर्ती पाण्यातून वाहून येऊ शकत नाही. ती याच ठिकाणची असल्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात मूर्तीचे इतर अवशेषही सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.