Home Blog Page 321

लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची मागणी

चाकूर-लातूर, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून मंजुरी मिळून देखील लातूररोड नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित असून हे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, २०१२ – १३ मध्ये लातूररोड नांदेड या १५५ कि. मी.रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती त्यानुसार या रेल्वे मार्गाच्या सर्वेचे काम २०१६ मध्येच पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गासाठी दोन हजार ५२ कोटी ९३ लक्ष अंदाजित खर्चास मंजुरी ही मिळालेली आहे. परंतु अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. हा रेल्वे मार्ग गुलबर्गा ते नांदेड असा असून लातूररोड जंक्शन वरुन अहमदपूर लोहा मार्गे नांदेड जाणार असल्यामुळे या रेल्वे मार्गामुळे प्रवाशी नागरीकाबरोबरच व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा होणार असून व्यायसायिक दृष्ट्या लातूररोड हे औद्योगिक केंद्र बनणार आहे.

त्यामुळे रेल्वेच्या उत्पनातही वाढ होणार आहे. हा रेल्वे मार्ग मराडवाठा विभागाचे भुषण ठरणार आहे. याकरिता या भागातील लोकांची गरज लक्षात घेवून लवकरात लवकर रखडलेल्या लातूररोड नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरु करावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. लातूर रेल्वे स्थानकावर आ. पाटील यांनी सोलापूर विभागाचे रेल्वेचे उपायुक्त एस. सी.जैन, आर.पी.गुजराल, मुकेश लाल, व्ही.पी. चौधरी या अधिकाऱ्यांना निवेदन.दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी जि.प सदस्य दयानंद भाऊ सुरवसे, गणेश फुलारी, सिध्देश्वर अंकलकोटे, अनिल वाडकर, गणपत कवठे, तुकाराम जाधव, बिलाल पठाण, विजय मारापल्ले आदीसह अनेकजण उपस्थित होते.

बाबासाहेब पाटील – लातूर-मुंबई रेल्वे पूर्वीप्रमाणेच तिरुपती विशेष रेल्वे चालू करा!
लातूर ते मुंबई व मुंबई ते लातूर ही रल्वे सध्या आठवड्यातुन चार दिवस सुरु आहे परंतु या रेल्वेसाठी प्रवाशी संख्या जास्तच असल्याने पूर्वीप्रमाणे आठवड्यातून सातही दिवस नियमित रेल्वेसेवा चालू करून प्रवाशांची गैरसोय दुर करावी. तसेच तिरुपतीला जाण्यायेण्यासाठी विशेष लातूर तिरुपती रेल्वे सुरु करुन तिरुपती भक्तांची सोय करावी.

मिरा- भाईंदरमध्ये भराव माफियांच्या धुमाकुळीकडे महसूल अधिकारी, पालिका – पोलिसांसह राजकारण्यांची “अर्थपूर्ण” डोळेझाक

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे.

महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम नव्याने करताना ते तोडल्यावर डेब्रिस मोठ्या प्रमाणात निघते. तसेच जुन्या इमारती पाडून तसेच घर वा वाणिज्य बांधकाम दुरुस्ती मधून डेब्रिस निघते. इमारतीचे पायलिंग व खोदकाम, मेट्रोचे खोदकाम आदी मधून माती – दगड आदी मोठ्या प्रमाणात निघत आहे. शिवाय मुंबईतून भरणीसाठी येणारे डंपर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.

कांदळवना सह नैसर्गिक पर्यावरण, पाणथळ, सीआरझेड व नाविकास क्षेत्र आदी संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेसह नगरसेवक, पोलीस, महसूल, वन विभाग आदींची आहे. तसे असताना शहरात राजरोसपणे डेब्रिस आणि माती- दगड आदींची भरणी ह्या संरक्षित क्षेत्रात सुरु आहे. ह्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहेच शिवाय पावसाळ्यात नैसर्गिक पाणी साठवून ठेवणारे हे पाणवठे नष्ट होऊन पुराचा धोका वाढत आहे.

महापालिकेने तर भराव रोखण्यासाठी पथके नेमली असून स्वच्छता निरीक्षक , कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी आदींना भराव रोखण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु माती भराव विरोधी पथके आणि संबंधित अधिकारी वर्ग मात्र जाणीवपूर्वक ह्या बेकायदा भरावां कडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे जो पर्यंत कोणी नागरिक तक्रार करत नाहीत तो पर्यंत राजरोस भराव सुरूच असतात. त्यातच कंस्ट्रक्शन वेस्ट मॅनेजमेंट कायद्या नुसार डेब्रिसचा बेकायदा भराव रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु डेब्रिसची सर्रास बेकायदा वाहतूक आणि भराव केले जात असताना पालिका जबाबदारी झटकत आहे.

ह्या भराव माफियांना पोलिसांचा असलेले वरदहस्त देखील गंभीर आहे. कारण डेब्रिस – माती आदीची वाहतूक करणारे डंपर व लहान टेम्पो हे रस्त्यांवरून उघडपणे फिरत असतात. एरव्ही सामानाच्या टेम्पो आदीं पासून नागरिकांना तपासणी साठी अडवणाऱ्या पोलिसां कडून हे भरणीचे डंपर, टेम्पो मात्र कसे दिसत नाहीत? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत. पोलिसांचे बिट मार्शल व अधिकारी नियमित गस्त घालतात पण ह्या भराव व भरणी माफियांकडे कानाडोळा करतात. वास्तविक कांदळवन समिती मध्ये पोलीस देखील असून त्यांची सुद्धा कांदळवन संरक्षणाची जबाबदारी आहे.

एरव्ही उठसुठ सोशल मीडियावर फोटोसेशन करणारे व मनासारखे झाले नाही तर तक्रारी व सभागृहात ओरडणारे पालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच राजकारणी देखील ह्या बेकायदा भरणी आणि भरणी माफियां विरुद्ध चकार शब्द काढत नाहीत. नगरसेवकांच्या प्रभागात डेब्रिस आणि मातीची भरणी चाललेली असताना सुद्धा त्या विरोधात कारवाई साठी पुढाकार घेत नाहीत. माती – दगड भरावाच्या कारवाईची जबाबदारी महसूल विभागावर मुख्यत्वे असली तरी इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी केवळ चार ते पाच तलाठी कुठे पुरणार असा सवाल केला जातो. पण तलाठी – मंडळ अधिकारी स्वतःहून गस्त घालून ह्या माफियांना जरब बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.

एकूणच ह्या बेकायदेशी भराव आणि माफियांनी बिनधास्तपणे घातलेल्या धुमाकुळास नगरसेवकां पासून पालिका, पोलीस, महसूल आदी सर्वच यंत्रणांचा वरदहस्त असल्याचे नाकारता येणार नाही. भरणी करून खाजगी जमीन मालक, विकसक आदींना भूखंड तयार करून दिले जातात. खाजगीच नाही सरकारी जागेत देखील भराव मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. भराव करून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. भराव टाकण्यासाठी वरून पैसे सुद्धा मिळतात. बक्कळ फायद्याच्या ह्या भरावाच्या बेकायदेशीर धंद्यात अनेकांचे उखळ पांढरे होत असल्यानेच ह्या माफियांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात परिमंडळ १ मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .

“नंदकिशोर देशमुख (अपर तहसीलदार) – शहरासाठी आमच्याकडे केवळ चार – पाच तलाठीच आहेत तरी तक्रारीच्या अनुषंगाने कांदळवनात भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व दंडाची कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिसांना संयुक्त बैठक बोलावून कार्यवाहीची रूपरेषा ठरवण्यात येईल .

“दिलीप ढोले (अतिरिक्त आयुक्त , महापालिका)- महापालिके कडून ह्या प्रकरणी अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. भराव झालेल्याची माहिती तपासून त्यावर तात्काळ आवश्यक ती कारवाई केली जाईल . वॉटर बॉडीज – कांदळवन मधील भराव काढून घेतला जाईल . कांदळवन व वॉटरबॉडी शहरासाठी महत्वाच्या आहेत .

भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर ओमसाई गेस्ट हाऊसमध्ये लागली भीषण आग! अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून आटोक्यात आणली आग

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांच्या ओमसाई गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये काल रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

आगीचे नेमके कारण अजून समजले नसले तरी विजेच्या तारेमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये लागलेल्या या आगीत हॉटेलचे किचनचे सामान, फर्निचर, फास्टफूडचे काउंटर, पानाची गादी, पार्टिशन, मुख्य प्रवेशद्वाराचे फर्निचर व इतर वस्तू असे एकूण अंदाजे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असून ह्या हॉटेलचे नूतनीकरण गेल्या काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. संपूर्ण हॉटेलचे बांधकाम दुरुस्ती करून त्याचे इंटेरिअरचे काम नवीनच करण्यात आले होते.

अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचल्याने ओमसाई गेस्ट हाऊस लागलेली आग आटोक्यात येऊन परिसरातील इतर इमारतीना होणारा आगीचा धोका टळला. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थानक अधिकारी सदानंद पाटील, बिट फायरमन विठ्ठल भाबल, संजय मोरे, वासुदेव भोईर सह इतर अग्निशमन जवानांनी आपले कर्तव्य बाजावत ही आग वेळेवरच आटोक्यात आणली.

भाईंदर पूर्वेला नवघररोडवर असलेले भाजपचे वादग्रस्त माजी नगरसेवक असलेले यशवंत कांगणे यांच्या मालकीचे असलेले हे ओमसाई गेस्ट हाऊस आधीपासूनच अनधिकृतपणे बनविण्यात आले असल्यामुळे वादग्रस्त ठरले होते आणि आता काही दिवसांपूर्वीच या होटेलची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले होते तरी देखील ही कशी आग लागली? किंवा ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली? याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत. यात सत्य परिस्थिती काय आहे ते अग्निशमन दलाच्या चौकशी नंतर लवकरच स्पष्ट होणार आहे.

आजीवन काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला मिरा-भाईंदर शहरातील काँग्रेसचा आधारस्तंभ हरवला!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरात राजकीय पटलावर अगदी सरपंच पदापासून अनेक पदं भूषविलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महानगरपालिकेचे माजी महापौर तुळशीदास दत्तू म्हात्रे यांचे दिर्घ आजारामुळे मंगळवार 01 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदर शहराच्या कॉंग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन सोबतच प्रदेशाध्यक्ष आणि महासूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक नेत्यांनी दुःख प्रगट केले असून त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

संपुर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असेलेले तुळशीदास म्हात्रे यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात मिरा-भाईंदर शहराच्या सरपंच पदापासून सुरू केली तर त्यांचा हा राजकीय प्रवास मिरा-भाईंदर शहराचे महापौर पदापर्यंत पोहोचला होता. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना काँग्रेसचे पक्ष्याचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि महापौर अशा प्रकारची अनेक महत्त्वाची पदे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भूषवली आहेत तसेच ते आगरी समाजाचे नेते देखील होते.

त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काँगेस पक्षाच्या वाढीसाठी केलेले त्याग आणि समर्पण हे फार मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला कधीही भरून न-निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना काँगेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा पश्चात्य त्यांना दोन मुले व सुना नातू-नातवंड असा संयुक्त परिवार आहे.
माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुळशीदास म्हात्रे यांच्या निधनामुळे अनुभवी समर्पित लोकसेवक हरपला असल्याचे बोलत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तुळशीदास म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहिली.

भाजपच्या नाराजांच्या ‘ए’ ग्रुपचे प्रमुख ऍड रवी व्यास यांनी घेतली राष्ट्रवादीच्या माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट!

मिरा-भाईंदर, विशेष प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक – पदाधिकाऱ्यां पैकी एक असलेले नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मिरा-भाईंदर शहरात लवकरच एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार असल्याची चर्चा केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मिरा-भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकाधिकारशाही आणि एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमे विरुद्ध एकत्र आले आहेत. पालिकेतील अर्थपूर्ण हस्तक्षेप आणि मेहतांच्या चेहऱ्यावर पुढील पालिका निवडणूक भाजपाला जिंकता येणार नाही अशी भूमिका त्यांच्या विरोधी गटाने घेतली असून भाजप समर्थकांचा गट म्हणजे ए ग्रुप आणि मेहता यांच्या समर्थकांचा बी ग्रुप असे दोन गट शहरात तयार झाले आहेत. आणि ह्याच ‘ए’ गटाने मेहता हटाव व भाजपा आणि शहर बचाव अश्या प्रकारची मोहीम छेडली असून दुसरीकडे मेहता यांनी देखील पालिका आणि पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत.

नरेंद्र मेहतांना थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रवींद्र चव्हाण आणि केंद्रातील अनेक बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊन देखील आणि त्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात बलात्कार सह अनेक गंभीर गुन्हे व तक्रारी दाखल असून देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून त्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मेहता विरोधकांनी देखील जोरदार आघाडी उघडत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारती यांच्याकडे तक्रारी करत मेहतांच्या कारांनाम्यांचा पाढाच वाचला असून नरेंद्र मेहातांच्या नेतृत्वाखाली यापुढे पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही अशी शक्यता वर्तविली असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे मिरा-भाईंदर प्रभारी आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांची भेट घेतली होती. कोटेचा यांना शहराचे प्रभारी नेमलेले असताना रवींद्र चव्हाण यांचा मेहतांसाठीचा हस्तक्षेप देखील चर्चेचा विषय ठरला आहे .

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे महामंत्री व नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी आपल्या समर्थकांसह मिरा-भाईंदर शहरातील अनुभवी व दिग्गज राजकारणी मानले जाणारे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा ह्यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. वास्तविकत: पूर्वी व्यास हे मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले होते त्यांच्या दोघांमध्ये काही व्यक्तिगत मतभेद झाल्यामुळे रवि व्यास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. तर गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यामुळे २००७ साली अपक्ष नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता हे महापौर झाले होते.

रवी व्यास यांचे शहरातील राजकीय वजन, त्यांचे समर्थक व त्यांच्या समर्थनार्थ असलेले भाजपचे नगरसेवक यांची संख्या पाहता त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असे चित्र सध्या तरी मिरा-भाईंदर शहराच्या राजकारणात निर्माण झाले आहे आणि म्हणून आता भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांनी मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली असतानाच अशा प्रकारे अचानक माजी आमदार मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे . मेंडोन्सा हे शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत होते आणि मिरा-भाईंदर शहरात एक राजकीय व्यक्ती म्हणून मेंडोन्सा यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे.

महानगरपालिकेत नरेंद्र मेहतांचा आवाजव हस्तक्षेप रोखण्यासाठी अनेक नगरसेवकांनी तक्रारी करून देखील भाजपाच्या वरिष्ठां कडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे . त्यातच व्यास यांनी मेंडोन्सा यांची भेट घेतलयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी व्यास यांनी स्वतः मात्र हि कोणती राजकीय भेट नव्हती असे स्पष्ट करत मेंडोन्सा यांची फक्त सदिच्छा भेट होती असे सांगितले असून मेंडोन्सा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही जुन्या आठवणींत गप्पा रंगल्याचे ते म्हणाले. या संदर्भात गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण या विषयावर योग्य वेळी बोलू असे सांगितले. मात्र गिल्बर्ट मेंडोंसा आणि रवी व्यास यांच्या ह्या बैठकीमध्ये काहीतरी राजकीय गुपीत दडलेले आहे एव्हढे मात्र नक्कीच आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे.