Home Blog Page 322

भाजपच्या नाराजांच्या ‘ए’ ग्रुपचे प्रमुख ऍड रवी व्यास यांनी घेतली राष्ट्रवादीच्या माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट!

मिरा-भाईंदर, विशेष प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक – पदाधिकाऱ्यां पैकी एक असलेले नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मिरा-भाईंदर शहरात लवकरच एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार असल्याची चर्चा केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मिरा-भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकाधिकारशाही आणि एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमे विरुद्ध एकत्र आले आहेत. पालिकेतील अर्थपूर्ण हस्तक्षेप आणि मेहतांच्या चेहऱ्यावर पुढील पालिका निवडणूक भाजपाला जिंकता येणार नाही अशी भूमिका त्यांच्या विरोधी गटाने घेतली असून भाजप समर्थकांचा गट म्हणजे ए ग्रुप आणि मेहता यांच्या समर्थकांचा बी ग्रुप असे दोन गट शहरात तयार झाले आहेत. आणि ह्याच ‘ए’ गटाने मेहता हटाव व भाजपा आणि शहर बचाव अश्या प्रकारची मोहीम छेडली असून दुसरीकडे मेहता यांनी देखील पालिका आणि पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत.

नरेंद्र मेहतांना थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रवींद्र चव्हाण आणि केंद्रातील अनेक बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊन देखील आणि त्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात बलात्कार सह अनेक गंभीर गुन्हे व तक्रारी दाखल असून देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून त्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मेहता विरोधकांनी देखील जोरदार आघाडी उघडत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारती यांच्याकडे तक्रारी करत मेहतांच्या कारांनाम्यांचा पाढाच वाचला असून नरेंद्र मेहातांच्या नेतृत्वाखाली यापुढे पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही अशी शक्यता वर्तविली असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे मिरा-भाईंदर प्रभारी आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांची भेट घेतली होती. कोटेचा यांना शहराचे प्रभारी नेमलेले असताना रवींद्र चव्हाण यांचा मेहतांसाठीचा हस्तक्षेप देखील चर्चेचा विषय ठरला आहे .

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे महामंत्री व नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी आपल्या समर्थकांसह मिरा-भाईंदर शहरातील अनुभवी व दिग्गज राजकारणी मानले जाणारे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा ह्यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. वास्तविकत: पूर्वी व्यास हे मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले होते त्यांच्या दोघांमध्ये काही व्यक्तिगत मतभेद झाल्यामुळे रवि व्यास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. तर गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यामुळे २००७ साली अपक्ष नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता हे महापौर झाले होते.

रवी व्यास यांचे शहरातील राजकीय वजन, त्यांचे समर्थक व त्यांच्या समर्थनार्थ असलेले भाजपचे नगरसेवक यांची संख्या पाहता त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असे चित्र सध्या तरी मिरा-भाईंदर शहराच्या राजकारणात निर्माण झाले आहे आणि म्हणून आता भाजपच्या पक्षश्रेष्ठी कडून काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यांनी मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली असतानाच अशा प्रकारे अचानक माजी आमदार मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे . मेंडोन्सा हे शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत होते आणि मिरा-भाईंदर शहरात एक राजकीय व्यक्ती म्हणून मेंडोन्सा यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे.

महानगरपालिकेत नरेंद्र मेहतांचा आवाजव हस्तक्षेप रोखण्यासाठी अनेक नगरसेवकांनी तक्रारी करून देखील भाजपाच्या वरिष्ठां कडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे . त्यातच व्यास यांनी मेंडोन्सा यांची भेट घेतलयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी व्यास यांनी स्वतः मात्र हि कोणती राजकीय भेट नव्हती असे स्पष्ट करत मेंडोन्सा यांची फक्त सदिच्छा भेट होती असे सांगितले असून मेंडोन्सा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही जुन्या आठवणींत गप्पा रंगल्याचे ते म्हणाले. या संदर्भात गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण या विषयावर योग्य वेळी बोलू असे सांगितले. मात्र गिल्बर्ट मेंडोंसा आणि रवी व्यास यांच्या ह्या बैठकीमध्ये काहीतरी राजकीय गुपीत दडलेले आहे एव्हढे मात्र नक्कीच आहे अशी चर्चा शहरात रंगली आहे.

भ्रष्टाचाराचे प्रवेशद्वार! कर्जबाजारी महानगरपालिकेची प्रवेशद्वाराच्या नावावर कोट्यवधीची उधळपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणखीन एक नवीन घोटाळा?

भाईंदर, प्रतिनिधी : एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली असताना आणि सार्वजनिक आरोग्य सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला असून कोट्यावधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकां कडून केला जात आहे.

मिरा भाईंदर शहरात गरज नसताना देखील स्मशानभूमी, उद्याने, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक रुग्णालये अशा विविध ठिकाणी आधीची असलेली प्रवेशद्वारे तोडून त्याठिकाणी नवीन प्रवेशद्वार बनवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालविली असल्याचा आरोप केला जात आहे.
मिरा भाईंदर शहरातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, योग्य नियोजनाअभावी योग्य ती सार्वजनिक आरोग्य सेवा देखील नागरिकांना मिळत नाही.

शहराच्या कर उत्पन्नात मोठी तूट निर्माण झालेली असून निधी अभावी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन देखील वेळेवर दिले जात नाही अशा महानगरपालिकेवर अंदाजे पाचशे कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र वारेमाप उधळपट्टी होत असून शहरातील नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांच्या संगनमताने अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांच्या निविदा बेकायदेशीरपणे काढल्या जात आहेत असा आरोप केला जात आहे.

मिरा भाईंदर शहरासह संपूर्ण देशात कोरोना सारख्या भयंकर साथ रोगाने थैमान घातले आहे. नागरिकांच्या अत्यावश्यक आरोग्यसेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही अशा कठीण परिस्थितीत देखील गरज नसलेली विकासकामांवर भरमसाठ खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभातील अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांचे उखळ पांढरे केले जात असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी व्यक्त केली आहे

शहरातील नाले, गटार, रस्ते आणि फुटपाथ यांच्या दुरुस्ती सुशोभीकरणच्या नावावर दरवर्षी निविदा काढून पुन्हा पुन्हा तीच तीच कामं करून नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकारी आपली नियमित कमाई करून घेत आहेत. एकच नाला, गटार तोडून पुन्हा बनविला जातो, एकाच रस्त्याचे वर्षातून अनेकवेळा डांबरीकरण केले जाते तर एकाच फुटपाथचे वर्षातून अनेकवेळा सुशोभीकरण केले जाते तर शहरातील सुस्थितीत असलेले चौक तोडून पुन्हा बनविले जातात.

अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने भ्रष्टाचार करण्याचे हे एक नवीन प्रवेशद्वार उघडले असून या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षाचे वरीष्ठ नेते, नगरसेवक पासून ते अगदी विरोधीपक्षाचे नगरसेवक देखील सामील झाले असल्यामुळे एकही लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही. या सगळ्यांनां “मॅनेज” करण्याची कला सार्वजनिक बांधकाम विभागाचे “धीरूभाई” म्हणवले जाणारे कार्यकारी अभियंता यांच्याकडे असल्यामुळे ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ प्रमाणे राजरोसपणे करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील काँक्रीटच्या रस्त्याच्या बांधकामात आणि बीएसयूपी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले असून विभागीय आयुक्त, कोकण विभागा तर्फे त्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे या सर्व भ्रष्टाचाराच्या ‘प्रवेशद्वाराची’ देखील सखोल चौकशी झाल्यास कुणी कुणी यात मलिदा खाल्ला आहे? ते उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून “मिरा भाईंदर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही” अशी घोषणा मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी केली असून या आता भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी देखील त्या राज्य शासनाकडे करतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिरा-भाईंदरच्या ओस्तवाल बिल्डरला शासनाचा दणका! अंदाजे पन्नास लाख रुपये मुद्रांक शुल्क दंडासह भरण्याची जिल्हाधिकाऱ्याने ने बजावली नोटिस!

भाईंदर, प्रतिनिधी : २०१५ साली जमीन मालकां सोबत त्यांच्या जमिनीचा विकास करारनामा नोंदणीकृत करताना औद्योगिक (industrial zone) झोन असूनही निवासी झोन असल्याचे दाखवून शासनाचा तब्बल ५० लाखांचा मुद्रांक महसूल कमी भरणाऱ्या विकासकाला कृष्णा गुप्ता या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी नंतर ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत आणि जवळपास ५० लाख मुद्रांक शुल्कासह दरमहा २ टक्के प्रमाणे दंड भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील अनेक विकासकांनी अशाच प्रकारे शासनाची दिशाभूल करून मुद्रांक शुल्क कमी भरला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हा देखील मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मीरारोडच्या झंकार कंपनीची जागा हि राजेंद्र वडगामा व कुटुंबीयांची आहे. सदर जमीन विकसित करण्यासाठी वडगामा कुटुंब व ओस्तवाल बिल्डरचे कुलदीप उमरावसिंह ओस्तवाल ह्यांच्यात जमिनीवर इमारत विकसित करण्याचा करारनामा झाला. १६ मे २०१५ रोजी तीन वेगवेगळ्या स्वरूपातील करारनाम्याने सदर व्यवहार नोंदणीकृत करण्यात आले होते. मात्र सदर जमीन ही महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात जमीन औद्योगिक झोन म्हणजेच इंडस्ट्रियल झोन मध्ये आहे त्यामुळे या जमिनीच्या व्यवहाराचे कारारनामे नोंदणी करताना त्याचे मुद्रांक शुल्क निवासी दरानुसार न भरता औद्योगिक दरानुसार भरणे आवश्यक होते. परंतु औद्योगिक मुद्रांक शुल्काचे दर हे निवासी दरापेक्षा जास्त असल्यामुळे सदर जमिनीचा मोबदला निवासी दरानुसार ठरवून कमी मुद्रांक शुल्क भरून शासनाचे अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार कृष्णा गुप्ता यांनी केली होती.

भाईंदर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय – ७ येथे सदर तीन करारनामे नोंदणीकृत करताना त्याचे ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. परंतु सदर मुद्रांक शुल्क भरताना करारनाम्यातील व्यवहार आणि प्रत्यक्षातील त्याचे बजारमूल्य तसेच सदर जमीन विकास आराखड्या नुसार औद्योगिक झोनमध्ये येत असल्या बाबतची सविस्तर तक्रार सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता ह्यांनी मुद्रांक विभागाकडे केली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने थेट मुद्रांक नोंदणीचे महानिरीक्षक तसेच लाचलुचपत खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मात्र सह जिल्हानिबंधक वर्ग-१, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील सहाय्यक नगररचनाकार यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी दिलेल्या अहवाला नुसार जमीन मालक वडगामा कुटुंबियांना ४५ टक्के नुसार मिळणाऱ्या मोबदल्याचे स्वरूप विचारात घेता त्याचे मूल्य ६ कोटी ३२ लाख तर विकासक कुलदीप ओस्तवाल यांना ५५ टक्के प्रमाणे मिळणाऱ्या मोबदल्याचे मूल्य ९ कोटी ५५ लाख इतके निश्चित केले त्यामुळे नियमानुसार जास्तीच्या मूल्याचे वास्तविक मूल्यांकन म्हणून विचारात घेण्यात आले.

त्या अनुषंगाने सदर तिन्ही नोंदणीकृत करारनाम्या द्वारे कुलदीप ओस्तवाल यांनी १ कोटी ९५ लाख ४७ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क भरायला हवे असताना ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये मुद्रांक भरले जेणे करून शासनाचा ४९ लाख ४८ हजार ८०० रुपये इतका मुद्रांक महसूल बुडवला गेला. सदर कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कासह मे २०१५ पासून ते आज पर्यंत त्या रकमेवर दर महा २ टक्के प्रमाणे दंड भरण्याची नोटीस देखील मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वाबीकर यांनी कुलदीप ओस्तवाल याना बजावली आहे.

औद्योगिक झोन असताना निवासी दराने मुद्रांक शुल्क भरले गेले. मुद्रांक चोरीच्या ह्या संगनमताच्या प्रकाराने विकासक व सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे साटेलोटे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सदर प्रकार हा कट कारस्थान करून नियोजनबद्ध रित्या शासनाचे मुद्रांक शुल्क चोरी करण्याचा आहे आणि अशाच प्रकारे मिरा-भाईंदर शहरातील अनेक विकासकांनी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे आशा प्रकारच्या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारच्या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी कृष्णा गुप्ता यांनी केली आहे. आता खरोखरच सह निबंधक कार्यालयातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करते की कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांना संरक्षण देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामिण भागातील पाळीव आणि मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या चोरी-कत्तलप्रकरणी 4 जण गजाआड

अलिबाग : पाळीव आणि गुरांची चोरी करून नंतर त्यांची कत्तल करुन मांसाची तस्करी करणार्‍या 4 जणांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या चौघांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी मोकाट फिरणारे आणि पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व मासांची तस्करी करण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा लवकरात-लवकर उलगडा करुन, हे गुन्हे करणार्‍यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि सहकारी कर्मचारी यांचे खास पथक तयार केले. गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती संकलित करुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले.

पेण आणि खोपोली पोलीस दाखल गुन्ह्यांप्रकरणी आसीफ सादिक कुरेशी (रा.जुबली पार्क, बिल्डींग नं.9, 2 रा माळा, कौसा-मुंब्रा, जि.ठाणे) व साकिब सहिद मनीयार (रा.लेफर कॉलनी, राधाकृष्ण मंदिराजवळ, मोहन सृष्टी बिल्डींग, पत्री पूल, कल्याण (प.), जि.ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर पाली पोलीस ठाणे हद्दीतील चोरीप्रकरणी सूरज खलीराम कायरीया (रा.कोनगांव, पिंपळास रोड, धर्मा निवास, कोनगांव, ता.कल्याण) याला जेरबंद करण्यात आले आहे.

पोयनाड, रेवदंडा, वडखळ, कर्जत, रसायनी, रोहा येथील पोलीस ठाण्यात दाखल विविध 8 गुन्ह्यांप्रकरणी इंतजार अली मुद्दी शेख (वय 32, रा.धुम कॉम्प्लेक्स, ए विंग, रुम नं.404, सानिया हॉल जवळ, चांदनगर, कौसा मुंब्रा जि.ठाणे) याला गजाआड करण्यात आले आहे. अटक केलेल्या चारही जणांनी चौकशीमध्ये पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेसुद्धा हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि पथकाने केली आहे.

जनावरांना गुंगीचे औषध, इंजेक्शन देऊन करायचे गुरांची चोरी

हे गुरे चोर सायंकाळी मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून त्यांच्या वाहनाद्वारे पनवेल मार्गे रायगड जिल्ह्यातील प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी वाडी-वस्तीवर तसेच रस्त्यांवर फिरणार्‍या गाय-बैल या जनावरांना गुंगीचे औषध ब्रेडला लावून खाण्यास देतात. कधी कधी गुंगीचे इंजेक्शन देतात. सुमारे 15 मिनिटांत जनावर बेशुद्ध झाल्यानंतर त्यास बांधून वाहनात भरतात किंवा निर्जन स्थळी आल्यानंतर त्यांच्याजवळील हत्याराने जनावरांची कत्तल करुन मुंडके, कातडे, कोथळा तेथेच टाकून मांस वाहनांत भरुन निघून जातात. चोरी केलेले जनावर मार्केटमध्ये विकतात तसेच मांसाची मार्केटमध्ये विक्री करतात, असे निष्पन्न झाले आहे.

विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त मोफत ऑनलाईन लेखन कार्यशाळा सप्ताह

जगदीश काशिकर, मुक्त पत्रकार, मुंबई : विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषदेच्या वतीने सात मोफत लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

विश्व मराठी परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन पहिल्या विश्र्व मराठी संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या संमेलना निमित्ताने नि:शुल्क ऑनलाईन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित मराठी लेखकांनी घ्यावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

या कार्यशाळा ऑनलाईन लाईव्ह पद्धतीने १० ते १६ डिसेंबर या दरम्यान भारतीय वेळेनुसार रोज सकाळी ९ वाजता सुरू होतील. यामध्ये भारताबाहेरील ३५ देशातील, अमेरिकेतील ५० राज्यातील आणि भारतातील महाराष्ट्रासह २५ राज्यातील मराठी भाषिकांना सहभागी होता येणार आहे.

कार्यशाळांचे विषय: १) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( ११ डिसेंबर ) ३) संशोधन पद्धती व उपयोजन ( १२ डिसेंबर ) ४) अनुवाद कसा करावा ( १३ डिसेंबर ) ५) ब्लॉग लेखन ( १४ डिसेंबर ) ६) कथा लेखन ( १५ डिसेंबर ) ७) कविता लेखन ( १६ डिसेंबर )

या कार्यशाळांमध्ये भारत सासणे, लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. रेखा इनामदार-साने, अंजली कुलकर्णी, राजन लाखे, अँड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani येथे नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क
दैदिप्य जोशी – समन्वयक – विश्र्व मराठी परिषद
मो.+९१ ९०२१७ ३२३३७
यांना संपर्क करावा. —- डाॅ. नितीन पवार, पुणे जिल्हा प्रतिनिधी,पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन 2121