Home Blog Page 322

मिरा-भाईंदरच्या ओस्तवाल बिल्डरला शासनाचा दणका! अंदाजे पन्नास लाख रुपये मुद्रांक शुल्क दंडासह भरण्याची जिल्हाधिकाऱ्याने ने बजावली नोटिस!

भाईंदर, प्रतिनिधी : २०१५ साली जमीन मालकां सोबत त्यांच्या जमिनीचा विकास करारनामा नोंदणीकृत करताना औद्योगिक (industrial zone) झोन असूनही निवासी झोन असल्याचे दाखवून शासनाचा तब्बल ५० लाखांचा मुद्रांक महसूल कमी भरणाऱ्या विकासकाला कृष्णा गुप्ता या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारी नंतर ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटिसा बजावल्या आहेत आणि जवळपास ५० लाख मुद्रांक शुल्कासह दरमहा २ टक्के प्रमाणे दंड भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील अनेक विकासकांनी अशाच प्रकारे शासनाची दिशाभूल करून मुद्रांक शुल्क कमी भरला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हा देखील मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मीरारोडच्या झंकार कंपनीची जागा हि राजेंद्र वडगामा व कुटुंबीयांची आहे. सदर जमीन विकसित करण्यासाठी वडगामा कुटुंब व ओस्तवाल बिल्डरचे कुलदीप उमरावसिंह ओस्तवाल ह्यांच्यात जमिनीवर इमारत विकसित करण्याचा करारनामा झाला. १६ मे २०१५ रोजी तीन वेगवेगळ्या स्वरूपातील करारनाम्याने सदर व्यवहार नोंदणीकृत करण्यात आले होते. मात्र सदर जमीन ही महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात जमीन औद्योगिक झोन म्हणजेच इंडस्ट्रियल झोन मध्ये आहे त्यामुळे या जमिनीच्या व्यवहाराचे कारारनामे नोंदणी करताना त्याचे मुद्रांक शुल्क निवासी दरानुसार न भरता औद्योगिक दरानुसार भरणे आवश्यक होते. परंतु औद्योगिक मुद्रांक शुल्काचे दर हे निवासी दरापेक्षा जास्त असल्यामुळे सदर जमिनीचा मोबदला निवासी दरानुसार ठरवून कमी मुद्रांक शुल्क भरून शासनाचे अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार कृष्णा गुप्ता यांनी केली होती.

भाईंदर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय – ७ येथे सदर तीन करारनामे नोंदणीकृत करताना त्याचे ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये इतके मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. परंतु सदर मुद्रांक शुल्क भरताना करारनाम्यातील व्यवहार आणि प्रत्यक्षातील त्याचे बजारमूल्य तसेच सदर जमीन विकास आराखड्या नुसार औद्योगिक झोनमध्ये येत असल्या बाबतची सविस्तर तक्रार सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता ह्यांनी मुद्रांक विभागाकडे केली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने थेट मुद्रांक नोंदणीचे महानिरीक्षक तसेच लाचलुचपत खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मात्र सह जिल्हानिबंधक वर्ग-१, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील सहाय्यक नगररचनाकार यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी दिलेल्या अहवाला नुसार जमीन मालक वडगामा कुटुंबियांना ४५ टक्के नुसार मिळणाऱ्या मोबदल्याचे स्वरूप विचारात घेता त्याचे मूल्य ६ कोटी ३२ लाख तर विकासक कुलदीप ओस्तवाल यांना ५५ टक्के प्रमाणे मिळणाऱ्या मोबदल्याचे मूल्य ९ कोटी ५५ लाख इतके निश्चित केले त्यामुळे नियमानुसार जास्तीच्या मूल्याचे वास्तविक मूल्यांकन म्हणून विचारात घेण्यात आले.

त्या अनुषंगाने सदर तिन्ही नोंदणीकृत करारनाम्या द्वारे कुलदीप ओस्तवाल यांनी १ कोटी ९५ लाख ४७ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क भरायला हवे असताना ९८ लाख ४६ हजार ९०० रुपये मुद्रांक भरले जेणे करून शासनाचा ४९ लाख ४८ हजार ८०० रुपये इतका मुद्रांक महसूल बुडवला गेला. सदर कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कासह मे २०१५ पासून ते आज पर्यंत त्या रकमेवर दर महा २ टक्के प्रमाणे दंड भरण्याची नोटीस देखील मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वाबीकर यांनी कुलदीप ओस्तवाल याना बजावली आहे.

औद्योगिक झोन असताना निवासी दराने मुद्रांक शुल्क भरले गेले. मुद्रांक चोरीच्या ह्या संगनमताच्या प्रकाराने विकासक व सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे साटेलोटे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सदर प्रकार हा कट कारस्थान करून नियोजनबद्ध रित्या शासनाचे मुद्रांक शुल्क चोरी करण्याचा आहे आणि अशाच प्रकारे मिरा-भाईंदर शहरातील अनेक विकासकांनी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे आशा प्रकारच्या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारच्या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी कृष्णा गुप्ता यांनी केली आहे. आता खरोखरच सह निबंधक कार्यालयातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करते की कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांना संरक्षण देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामिण भागातील पाळीव आणि मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या चोरी-कत्तलप्रकरणी 4 जण गजाआड

अलिबाग : पाळीव आणि गुरांची चोरी करून नंतर त्यांची कत्तल करुन मांसाची तस्करी करणार्‍या 4 जणांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या चौघांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी मोकाट फिरणारे आणि पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व मासांची तस्करी करण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा लवकरात-लवकर उलगडा करुन, हे गुन्हे करणार्‍यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि सहकारी कर्मचारी यांचे खास पथक तयार केले. गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती संकलित करुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले.

पेण आणि खोपोली पोलीस दाखल गुन्ह्यांप्रकरणी आसीफ सादिक कुरेशी (रा.जुबली पार्क, बिल्डींग नं.9, 2 रा माळा, कौसा-मुंब्रा, जि.ठाणे) व साकिब सहिद मनीयार (रा.लेफर कॉलनी, राधाकृष्ण मंदिराजवळ, मोहन सृष्टी बिल्डींग, पत्री पूल, कल्याण (प.), जि.ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर पाली पोलीस ठाणे हद्दीतील चोरीप्रकरणी सूरज खलीराम कायरीया (रा.कोनगांव, पिंपळास रोड, धर्मा निवास, कोनगांव, ता.कल्याण) याला जेरबंद करण्यात आले आहे.

पोयनाड, रेवदंडा, वडखळ, कर्जत, रसायनी, रोहा येथील पोलीस ठाण्यात दाखल विविध 8 गुन्ह्यांप्रकरणी इंतजार अली मुद्दी शेख (वय 32, रा.धुम कॉम्प्लेक्स, ए विंग, रुम नं.404, सानिया हॉल जवळ, चांदनगर, कौसा मुंब्रा जि.ठाणे) याला गजाआड करण्यात आले आहे. अटक केलेल्या चारही जणांनी चौकशीमध्ये पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेसुद्धा हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि पथकाने केली आहे.

जनावरांना गुंगीचे औषध, इंजेक्शन देऊन करायचे गुरांची चोरी

हे गुरे चोर सायंकाळी मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून त्यांच्या वाहनाद्वारे पनवेल मार्गे रायगड जिल्ह्यातील प्रवेश करतात. रात्रीच्या वेळी वाडी-वस्तीवर तसेच रस्त्यांवर फिरणार्‍या गाय-बैल या जनावरांना गुंगीचे औषध ब्रेडला लावून खाण्यास देतात. कधी कधी गुंगीचे इंजेक्शन देतात. सुमारे 15 मिनिटांत जनावर बेशुद्ध झाल्यानंतर त्यास बांधून वाहनात भरतात किंवा निर्जन स्थळी आल्यानंतर त्यांच्याजवळील हत्याराने जनावरांची कत्तल करुन मुंडके, कातडे, कोथळा तेथेच टाकून मांस वाहनांत भरुन निघून जातात. चोरी केलेले जनावर मार्केटमध्ये विकतात तसेच मांसाची मार्केटमध्ये विक्री करतात, असे निष्पन्न झाले आहे.

विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त मोफत ऑनलाईन लेखन कार्यशाळा सप्ताह

जगदीश काशिकर, मुक्त पत्रकार, मुंबई : विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषदेच्या वतीने सात मोफत लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

विश्व मराठी परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन पहिल्या विश्र्व मराठी संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या संमेलना निमित्ताने नि:शुल्क ऑनलाईन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित मराठी लेखकांनी घ्यावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.

या कार्यशाळा ऑनलाईन लाईव्ह पद्धतीने १० ते १६ डिसेंबर या दरम्यान भारतीय वेळेनुसार रोज सकाळी ९ वाजता सुरू होतील. यामध्ये भारताबाहेरील ३५ देशातील, अमेरिकेतील ५० राज्यातील आणि भारतातील महाराष्ट्रासह २५ राज्यातील मराठी भाषिकांना सहभागी होता येणार आहे.

कार्यशाळांचे विषय: १) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( ११ डिसेंबर ) ३) संशोधन पद्धती व उपयोजन ( १२ डिसेंबर ) ४) अनुवाद कसा करावा ( १३ डिसेंबर ) ५) ब्लॉग लेखन ( १४ डिसेंबर ) ६) कथा लेखन ( १५ डिसेंबर ) ७) कविता लेखन ( १६ डिसेंबर )

या कार्यशाळांमध्ये भारत सासणे, लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. रेखा इनामदार-साने, अंजली कुलकर्णी, राजन लाखे, अँड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani येथे नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क
दैदिप्य जोशी – समन्वयक – विश्र्व मराठी परिषद
मो.+९१ ९०२१७ ३२३३७
यांना संपर्क करावा. —- डाॅ. नितीन पवार, पुणे जिल्हा प्रतिनिधी,पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन 2121

ठाणे – घोडबंदर रोड आता होणार ट्रॅफिक फ्री! खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश…

मिरा-भाईंदर प्रतिनिधी: ठाणे महानगरपालिकेची हद्द संपते व मीरा भाईंदर महापालिकेची हद्द सुरु होते त्याठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पहाणी आज खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासमवेत केली.

घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाबाबत गती देण्यासाठी दिनांक 10 ऑगस्ट 2016 रोजी संसदेत खासदार राजन विचारे यांनी शून्य प्रहर मार्फत मुद्दा उपस्थित केला होता, या कामाला वन खात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे असा हि सवाल त्यावेळी केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत तातडीने गायमुख ते फाउंटन हॉटेल असा ४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनविण्यात आला व दिनांक 24 नोव्हेंबर 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळाची सदर प्रस्तावास 667 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळवली.

आज खासदार राजन विचारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकत्रित पाहणी व बैठक आयोजित करून या प्रकल्पाला चालना व गती दिली. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा मिळवून देण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. सुनील लिमये यांनी सदर जागा महिन्याभरात मिळवून देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले. खासदार राजन विचारे यांनी येणाऱ्या नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू असे सांगितले.

या पाहणी दौऱ्याला आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर व इतर शिवसैनिक, पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एम एस आर डी सी चे मुख्य अभियंता श्री सोनटक्के, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंबई पश्चिम प्रदेशचे सुनील लिमये, उपमुख्य वन संरक्षक ठाणे गजेंद्र हिरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन तसेच मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे अमित काळे, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

कसा असणार आहे हा प्रकल्प –

१. अस्तित्वातील असलेल्या 2+2 या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्यात साडे सहा मीटर उंचीचा पिलेर उभे करून त्यावर नवीन एलिव्हेटेड 2+2 मार्ग बनविण्यात येणार आहे. त्यामुळे वर-खाली 4+4 असे एकूण 8 लेनच्या मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.

२. टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 3+3 अस्तित्वात असलेल्या मार्गिका 6+6 करण्यात येणार आहे.

३. संपूर्ण प्रकल्प बीओटी तत्त्वावर असणार आहे. या रस्त्याची लांबी ४ कि. मी. असणार आहे.

या वर्सोवा पुलाच्या कामाचे दि. ११ जानेवारी २०१८ रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याची परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. त्यामुळेच दि. २९ एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु कोरोनाच्या महामारी व मजुरांच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे हे काम २०२२ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या मार्गावरून (पी सी यु) पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पामधील २ अंडरपास फाउंटन चौकामध्ये असल्याने त्याचे काम सुरु करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन व परवानगी आवश्यक असल्याने खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त सदानंद दाते व वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमित काळे यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीने देण्याची विनंती करण्यात आली. व त्यावर त्यांनी या परवानग्या १५ दिवसात देऊ असे आश्वासन दिले.

वर्सोवा पुलाच्या कामाला गती मिळाली – खासदार राजन विचारे
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम संत गतीने सुरु असल्याने खासदार राजन विचारे यांनी आज पाहणी करून त्यामधील अडथळे दूर करून त्या कामाला गती दिली.

समुद्राच्या भरतीचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाड्यांना नाले ठरवून बांधकाम करण्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा आणखीन एक नवा प्रताप.

भाईंदर, प्रतिनिधी : मीरा भाईंदर शहर हे समुद्राचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक खाडयांना आणि खाडी पात्र परिसराला चक्क नाले ठरवून काँक्रीटचे पक्के नाले बांधण्याचा नवाच प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे उघड झाले आहे. प्रतिबंधीत सागरी किनारा क्षेत्र आणि कांडालावनात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमएकडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांनी घातला असून अशाच प्रकारे यापूर्वी देखील पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी दिपक खांबीत वर चार गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे एमसीझेडएमए आणि कांदळवन सेलने देखील खाड्याना नाले ठरवत अटीशर्तींवर प्राथमिक परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच पर्यावरणाच्या मुळावर उठल्याने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत सह महापालिकेचे अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांचेवर पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी अनेक गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर अनेक तक्रारी गुन्हे दाखल होण्याची प्रक्रीया सुरू आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करायचे असते. प्रतिबंधित सागरी किनारा क्षेत्र, कांदळवन, प्रतिबंधित हरित क्षेत्र किंवा इतर कोणतेही प्रतिबंधित क्षेत्र या सर्व क्षेत्रांचे संरक्षण करण्याची जबाबदारी व कर्तव्य सर्व शासकीय अधिकाऱ्यांची असते तसे असून देखील मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात नेहमीच आघाडीवर राहिलेली असून शहरातील अनेक ठिकाणी नियमांचे आणि न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम केले गेले आहेत.

आधीच महापालिकेने शहरातील मलमूत्र व सांडपाणी बेकायदेशीरपणे थेट खाडीपात्रात आणि कांदळवनात सोडलेले असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी पालिकेच्या ह्या जलप्रदूषणास अभय देत आले आहेत. शहरातील खाडीच्या किनाऱ्यावर आणि समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या अनेक भूखंडावर, खाडी व खाडी पात्रात कांदळवनाची तोड करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भरीव करून अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. त्यावर पर्यावरण विभाग असो महसूल विभाग असो किंवा वन विभाग असो शासनाची कोणतीच यंत्रणा कारवाईस तयार नाही त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडत चाललेला आहे. आणि आता तर पालिकेने नैसर्गिक खाड्यांना चक्क नाले ठरवून त्यासाठी कांदळवन सेल आणि एमसीझेडए मार्फत नाल्यांच्या बांधकामासाठी मंजुऱ्या सुद्धा मिळवण्याचा प्रकार चालवला आहे.

मिरा महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागने उत्तन नका ते पाली पर्यंतची नैसर्गिक नवीखाडी हि चक्क नाला म्हणून नमूद केली आहे. वास्तविक सदर खाडी हि समुद्राला मिळणारी असून या ठिकाणी खाडीपात्रात दाट कांदळवन आहे. ह्या खाडी पात्रात पालिकेने बेकायदेशीर सांडपाणी सोडले असून पालिकेच्या आशीर्वादाने येथे कांदळवन तोडून भराव व बांधकामे झाली आहेत. खाडीचा नाला सांगून या ठिकाणी काँक्रीटच्या भिंती उभारून पक्का नाला करण्याचा प्रस्ताव महापालिकेने एमसीझेडएमएकडे दिला आहे.

मिरारारोड पूर्वेकडील कनकिया परिसरातील संत थॉमस शाळा ते खाडी पर्यंतच्या नाल्याचे पक्के बांधकाम करण्यासाठी पालिकेने मंजुरीसाठी एमसीझेडएमएकडे प्रस्ताव दिला होता. वास्तविक ह्या ठिकाणी पूर्वीपासून कांदळवन होते आणि ते नष्ट केल्या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तरी देखील पालिकेने कोणतीही परवानगी नसताना आधीच कांदळवनात आधी कच्चा आणि नंतर काँक्रीटचा पक्का नाला बांधला आहे.

भाईंदर पश्चिमेकडील क्रांतीनगर ते बजरंगनगर आणि ओंमसाई कॉम्प्लेक्स ते जयअंबे नगर व वसई खाडी पर्यंत देखील दोन पक्के काँक्रीट नाले बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव दिला आहे. ह्या ठिकाणी देखील नैसर्गिक खाडी प्रवाह असून येथे मोठमोठी कांदळवनाची झाडे आहेत. अनेक तिवरांची झाडे माफियांनी तोडून येथे बेकायदेशीर भराव करून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. परंतु त्यावर कारवाई न करता आता कांदळवन व खाड्याच नष्ट करून काँक्रीट नाले बांधण्याचा घाट पालिकेच्या बांधकाम विभागाने घातलेला आहे.

मीरारोडच्या संत जोसेफ शाळा ते सृष्टी पूल पर्यंतचा परिसर हा जाफरी खाडी व खाडी पात्रचा परिरसर असून या ठिकाणी देखील कांदळवनाची मोठमोठी झाडे आहेत. काही झाडे तोडण्यात आली आहेत तर काही ठिकाणी तिवरांच्या झाडांना आगी लावण्याचे प्रकार केले असून भराव व बांधकामे केली गेली आहेत. तसे असताना ह्या ठिकाणी नैसर्गिक जाफरी खाडी व कांदळवन नष्ट करून काँक्रीटचा नाला बांधण्याचा घाट पालिकेचा आहे. धक्कादायक बाब म्हणजे एमसीझेडएमएच्या २७ व २८ ऑक्टॉबर रोजी झालेल्या बैठक क्रमांक १४७ मध्ये ह्यातील उत्तनची नवीखाडी वगळता अन्य ४ ठिकाणी नाले बांधण्याची परवानगीच अटीशर्तींची पूर्तता करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. त्यासाठी सदर चार ठिकाणी कांदळवन नसून ५० मीटरच्या बफर झोन असल्याचा कांदळवन सेलच्या पाहणी अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. ह्या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

“नैसर्गिक खाड्यांना नाले दाखवून पक्के नाले बांधकामास मंजुरी देणे अतिशय गंभीर बाब आहे. ह्या मुळे आजूबाजूचे कांदळवन आणि नैसर्गिक खाडी व पात्र नष्ट होणार आहे. परंतु अनधिकृत बांधकाम करणारे व बिल्डर आदींच्या फायद्यासाठी आणि करोडो रुपयांच्या निविदा काढून ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांचे उखळ पांढरे करण्यासाठी महापालिका हा प्रकार करत असताना वास्तविक कांदळवन सेल आणि एमसीझेडएमए ह्यांनी पालिकेवर गुन्हे दाखल करून झालेले उल्लंघन हटवण्याचे निर्देश दिले पाहिजे होते. पण ह्यांचे संगनमत असल्याचे ह्या प्रकाराने आता स्पष्ट झाले असून एमसीझेडएमए आणि कांदळवन सेलच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित केले पाहिजे.- स्टॅलिन दयानंद (संचालक, वनशक्ती)