Home Blog Page 320

स्वप्नांची नगरी ‘मुंबई’ सारखी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उभारणं खरोखर शक्य आहे का?

मुंबई, प्रतिनिधी : दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी ‘फिल्म सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतलाय.

नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.

प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.

पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, “हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे.”

ते पुढे सांगतात, “ही अत्याधुनिक फिल्मसिटी सुरू झाल्यानंतर चित्रपटांचं प्रॉडक्शन वाढण्यास मदत होईल. मुंबईत चित्रपटांसाठी काम फार मर्यादीत होतं. इथं टीव्ही सिरिअलचं काम खूप आहे. आता, वेब सिरीज बनू लागल्या आहेत. मोठे सेट उभारल्यामुळे फिल्मसिटी बूक होत होती. आता नोएडामध्ये फिल्मसिटी तयार होत असल्याने काम वाढेल. येत्या काही दिवसात चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.”

बॉलीवूड स्टार्स मुंबईत रहातात. शूटिंगनंतर त्यांना आपल्या घरी जाणं सोपं असतं. मग, अशा परिस्थितीत आपलं घर सोडून ते नोएडामध्ये शूटिंगसाठी काही महिने रहाणं पसंत करतील?

यावर बोलताना राज बंसल म्हणतात, “असं आधी होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधी कलाकार एक दिवस शूटिंग केल्यानंतर तीन दिवस येत नव्हते. मात्र, आता चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते घरापासून दूर रहातील. काम लवकरात-लवकर संपवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.”

हल्ली, शूटिंग संपवून 40 दिवसात चित्रपट तयार होतो. शक्य तितक्या लवकर चित्रपटाचं शूटिंग संपवण्याची कलाकारांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांचा पैसा जास्त खर्च होणार नाही, असं बंसल पुढे सांगतात.

“मुंबईहून दिल्लीला जाणं सहज शक्य आहे. विमानांची संख्या जास्त आहे, पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही,” असं राज बंसल पुढे सांगतात.

बॉलीवुडमध्ये फक्त कलाकारच नाहीत. तर सेट्सवर काम करणारे मजूरही मोठ्या संख्येने काम करतात. मग या मजुरांचं काय? यावर बोलताना राज बंसल दाक्षिणात्य चित्रपटांचं उदाहरण देतात. ते म्हणतात, मुंबईतील मजुरांच नुकसान होणार नाही.

ते पुढे म्हणतात, “दक्षिण भारतातील चित्रपट निर्मात्यांची स्वत:ची टीम असते. काम करणारे मजूर वेगळे असतात. उत्तर भारतातून अनेक मजूर कामासाठी मुंबईत येतात. आता, नोएडामध्ये शूटिंग सुरू झालं तर मजुरांना कामासाठी मुंबईत यावं लागणार नाही. त्यांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी मिळेल.”

मला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते. अशा घोषणा अनेकवेळा करण्यात आल्या. यावेळी, ही फक्त घोषणाच राहू नये, तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असं बंसल यांच मत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई युनिअनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांच्या सांगण्यानुसार, “नोएडामध्ये फिल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील.”

“लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो,” असं ते पुढे म्हणतात.

परदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सिडी मिळते. परदेशात चांगले लोकेशन आणि सुविधा मिळत असल्याने लोक बाहेर शूटिंग करतात.

दुसरीकडे भारतात मात्र फिल्मसिटीबाहेर शूटिंग करायचं असल्यास फार कठीण आहे. अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी असेल तरी, महापालिका, पोलीस आणि रहिवासी अडवणूक करतात, याची खंत तिवारी व्यक्त करतात.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, परवानगी घेऊनही ही प्रॉपर्टी आमची आहे असं म्हणत लोक लूटतात.

तिवारी पुढे सांगतात, “ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, त्याच ठिकाणी काम होईल. आता आमच्या स्पर्धेत अनेक लोक उतरले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी बॉलीवुडशी चर्चा केली. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरूख खान आणि सलमान खान सारख्या कलाकारांनी उत्तरप्रदेशात शूटिंग केलं आहे.”

चांगल्या सुविधा मिळत असल्याने लोक उत्तरप्रदेशात जात आहेत. महाराष्ट्रात कोणीच लक्ष देत नाही. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आम्हाला सरकारी बनवं लागतं, असा त्यांचा आरोप आहे.

बी एन तिवारी सांगतात, “सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर याचा परिणाम दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत.”

लेख सौजन्य : बीबीसी मराठी

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर रंगणार भारत-इंग्लंड डे-नाईट टेस्ट मॅच

मुंबई, प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठे असे नाव लौकिक मिळविलेल्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात गुलाबी बॉलने टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) जय शाह यांनी गुरुवारी म्हटलं की, नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह गुलाबी बॉलने टेस्ट सामन्यांचे आयोजन केले जाईल. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.

७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौर्‍यावर येणार आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल. मंडळाने या दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोटेरा हे दोन्ही देशांमधील डे नाईट टेस्ट मॅचचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली होती.

अहमदाबाद गुलाबी बॉलने टेस्ट सामने खेळले जाणार आहे. टेस्ट सीरीज ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आणि डे-नाईट टेस्ट २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळली जाणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय टीम भारतात परतेल. बीसीसीआयने आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२० मधील वनडे वर्ल्डकपवर आधारित वनडे आणि टी-२० मालिकेसाठी योजना आखली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अंतर्गत कर्णधार विराट कोहलीची टीम पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपची तयारी करेल.

तरुणपणीच योग्य ठिकाणी गुंतवणूक करा! म्हातारपणात दिसतील बचतीचे फायदे!

मुंबई, प्रतिनिधी : स्वत:साठीच्या पुरेशा खर्चासाठी, विविध कामे तसेच आरामदायी जीवनशैलीकरिता पैसे बाजूला ठेवून दीर्घकालीन योजना आखण्यासंबंधीचा दृष्टीकोन योग्य असू शकतो. वेळोवेळी गुंतवणूक केल्याने व्याज वाढेल. त्यामुळे कार, मालमत्ता खरेदी किंवा सुटीवर जाण्याची वैयक्तिक इच्छा होईल, तेव्हा पैशांचा झालेला संचय कामाला येईल, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ इक्विटी संशोधन विश्लेषक जयकिशन परमार यांनी व्यक्त केले.

१. चक्रवाढ व्याज लक्षात ठेवून बचत करणे: एखाद्या पदवीधराला नवी नोकरी लागते तेव्हा खर्च कमी होतो, असे बहुतांशवेळा दिसून येते. त्यामुळे याच काळात लहान रकमेची बचत आणि चक्रवाढ व्याज घेत, वेळोवेळी संपत्ती कशी वाढवता येईल, हे पाहणे योग्य ठरते. तसेच, पगार जमा होतो तेव्हा ते रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, प्रोव्हिडंट फंड इत्यादीमध्ये जमा करता येतो. त्यामुळे काही काळानंतकर पैसे वाढतात व संबंधित व्यक्तीला जेव्हा गरज असते, तेव्हा ते उपयुक्त ठरू शकतात. सतत बचत केल्यानंतर ३० ते ४० वर्षांनंतर त्यांची रक्कम किती होईल, याची कल्पना करा. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अशा व्यक्तीला खूप आराम मिळू शकतो.

२. २१ व्या शतकात गुंतवणूक करणे सोपे: आजच्या तरुण पिढीमध्ये एक नवा प्रवाह दिसून येतो. बँक आणि इतर वित्तीय सेवा प्रदात्यांकडून मिळालेले विविध पर्याय आजमावून पाहण्यात त्यांना कमालीचा रस आहे. ९० किंवा २००० च्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे किचकट न भासता ही सर्व प्रक्रिया आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. बँका, ब्रोकरेज फर्म, म्युच्युअल फंड इत्यादींसारख्या वित्तीय संस्थांनी त्यांचे स्वत:चे अॅप लाँच केले असून त्यातून लाखो तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी केवळ गुंतवणूक करायला सुरुवात केली असे नाही तर म्युच्युअल फंड्स, बाँड्स, स्टॉक व मोडिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची माहितीही ते घेत आहेत.

३. कुटुंबाच्या भविष्यासाठी नियोजन: वैयक्तिक आयुष्य जगताना भविष्यात अनेक जबाबदाऱ्या जोडल्या जातात. त्यामुळे वित्तीय नियोजन नसेल तर मोठा त्रास भोगावा लागू शकतो. एखाद्याचे लग्न झाले, मूल झाले तर खर्च चौपट होऊ शकतो. यातच नियोजनशून्य दृष्टीकोन असेल तर आणखी मोठा खर्च झेलावा लागू शकतो. लवकर गुंतवणूक केल्यास एक सुरक्षिततेची जाणीव होते. मग कुटुंबात जेव्हा तीव्र गरज असते, घरात आवश्यक वस्तू खरेदी करायच्या असतात, तेव्हा याचा फायदा होतो.

४. अनपेक्षित करिअर बदल आणि स्वत:मध्ये गुंतवणूक: आज दररोज जगातील इंडस्ट्रीमध्ये दर काही वर्षांनी बदल होत असताना कामाच्या ठिकाणीही कालौघात बदल होऊ शकतो. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने एखाद्या परिस्थितीत करिअर सुरू करण्याची योजना आखली असेल, तेव्हा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. पण तरुण वयापासूनच वित्तीय दृष्टीकोनातून निर्णय घेतले गेल्यास करिअरमधील महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेता येतात. एखादा अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकतो किंवा जगाच्या सफरीवर जाऊ शकतो. गुंतवणूक नियोजन केल्याने लोकांना असंख्य संधी आणि स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळू शकते.

५. जोखीम पत्करण्याची संधी मिळते: तरुणांमध्ये जोखीम पत्करण्याची क्षमता जास्त असली तरीही कुटुंब तयार करण्याच्या टप्प्यावर येताना त्यांना आयुष्यातील मोठी गुंतवणूक करण्याची वेळ येते. मोठ्या मार्जिनसाठी निवृत्तीची योजना आकाराला येईपर्यंत अस्थिर पोर्टफोलिओची निवड करता येते. मार्केटमध्ये गँबलिंग करण्यासाठी पुरेसे भांडवल मिळवण्याकरिता बचतीची सोय होते. तसेच काही कल्पनाही आकारास येऊ शकतात. सुरुवातीच्या २० वर्षात बचत करायला शिकल्यास लोकांना नवा बिझनेसदेखील सुरू करता येऊ शकतो.

लेख सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स

वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू !

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात बुधवारी कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा शिरला. पोलीस, अग्निशमन दल, वनविभाग यांनी बघ्यांच्या गर्दीला प्रतिकार करत या रानगव्याची सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भुलीचं इंजेक्शन देऊन तसंच जाळीचा वापर करून त्याला रोखण्यात आलं. भूगावच्या प्राणी केंद्रात त्याला नेण्यात आलं. मात्र रानगव्याने तिथे प्राण सोडले.

मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांच्या निमित्ताने प्राणी विरुद्ध माणसं हा संघर्ष अनेक महानगरांमध्ये तीव्र होताना दिसतो आहे. पुण्यातल्या गच्च लोकवस्तीच्या भागात आलेल्या रानगव्याविषयी फार माहितीही लोकांना नव्हती.

सुरुवातीला अनेकांना म्हैसच वाटली, मात्र रंग, चेहरा आणि आकारमान पाहून हा वेगळा प्राणी असल्याचं स्थानिकांच्या नंतर लक्षात आलं.

पुण्यातल्या शहरी भागात आलेला गवा नर होता. त्याचं वजन जवळपास 700 ते 800 किलो एवढं होतं. पाच ते साडेपाच फूट एवढी त्याची उंची होती.

पुणे शहरालगतच्या मुळशी, वेल्हा, पुरंदर हे तालुके आहेत. या भागात दाट झाडी आणि डोंगरारांगा आहेत. पुण्याच्या काही भागात बिबट्या आला होता. सात वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात गवा आला होता.

“पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700-1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो,” असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितलं.

त्यांनी रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांसंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, “पुण्यात घडलेल्या प्रकारातही गव्यासमोर पाचशेहून अधिक माणसं होती. त्यांच्यापैकी एकालाही छोटी जखमही झाली नाही. गव्याने त्यांना काहीही केलं नाही. म्हैस असती तर उपस्थित लोकांपैकी एखाद्याला फ्रॅक्चर किंवा गंभीर जखम झाली असती. रानटी म्हशी आक्रमक असतात, त्या एकत्र येऊन सिंहावर हल्ला करू शकतात पण गवा तसं करत नाही. कळपाने राहतात.”

“गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे वास तीव्रतेने कळतात मात्र ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी तितकी सक्षम नसते. प्रचंड शरीर आणि वास ओळखण्याची हातोटी हे गव्याचं गुणवैशिष्ट्य असतं,” असं खरे यांनी सांगितलं.

“पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन हजार किलोपर्यंत असू शकतं. गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो. नोव्हेंबर ते मार्च हा गव्यांचा प्रजननकाळ असतो.

“गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही. पुण्यात आलेल्या गव्याने कोणालाही जखमी केलं नाही. कात्रजच्या केंद्रात त्याच्या जखमांवर उपचार करून त्याला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नेणार होते. मात्र प्रचंड गर्दी, आवाज याने तो गोंधळून गेला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.”

पुण्याच्या आसपास गव्यांचा अधिवास ऐकिवात नाही. बुधवारी पुण्यात शिरलेला गवा आपल्या कळपापासून भरकटला असावा असं त्यांनी स्पष्ट केलं.

“प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळलेले, घाबरलेले असतात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वनविभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतात. गर्दीला रोखण्यात पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाची भूमिकाही मोलाची असते.

“पाण्याचा फवारा मारणं तसंच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं,” असं पेठे यांनी सांगितलं.
असं असले तरी वन विभागाने वेळेवर काहीतरी करून रानगव्याला सुरक्षित स्थळी नेले असते तर या रानगव्याचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.