Home Blog Page 41

सुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवलीकर काल्पनिक सण साजरे करताना शहिदांचे वास्तव बलिदान नाकारत आहेत – कॉम्रेड काळू कोमासकर


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जात, धर्म, पंथ, सण हे सर्व काल्पनिक असून राजकारणी व राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करून देशासाठी ज्या शहिदांनी बलिदान केले आहे, त्या शहिदांचे वास्तव डोंबिवलीकर नाकारत आहेत. अशी टीका लालबावटा रिक्षा युनियन चे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कौन्सिल सदस्य कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी डोंबिवलीकरांवर केली आहे.

२३ मार्च या शाहिद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहीद सुखदेव यांना डोंबिवली येथील बाजीप्रभू चौकात आदरांजली वाहण्यासाठी इंदिरा चौक, टिळक चौक मार्गे बाजीप्रभू चौक अशी रॅली काढून एका कार्यक्रमाचे आयोजन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि लाल बावटा रीक्षा युनियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी काळू कोमास्कर बोलत होते. या शहीद दिनाच्या कार्यक्रमात डोंबिवलीतील पंधरा संघटनांनी सहभाग दिला होता.

दिनांक २३ मार्च शहिद दिनानिमित्त डोंबिवली शहरात विविध संघटनांनी मिळून रॅली व सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाजीप्रभू चौकात उभारलेल्या शहिद स्मारकापासून करण्यात आली, “इन्कलाब झिंदाबाद, भगतसिंग के देश में हिंदू-मुस्लिम जातीवाद नही चलेगा” अश्या घोषणांनी रॅली दरम्यान डोंबिवलीचे रस्ते दणाणत होते. रॅलीचे रूपांतर बाजीप्रभू चौकात सभेमध्ये झाले. क्रांतिकारी गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये काँम्रेड काळू कोमास्कर, जनता दल सेक्युलरचे राज्य सचिव रवी भिलाने, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम वाघचौरे, संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे दीपक अहिरे, विद्यार्थी संघटनेचे अष्टपाल कांबळे, हॉकर्स फेडरेशनचे बबन कांबळे, अनिसचे कॉ.संजय पटेल, परेश काटे, राष्ट्र सेवा दलाचे जीवराज सावंत, कॉम्रेड शहिद भगतसिंग मित्रमंडळाचे कॉ.महेश आवारे, स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे संजय गायकवाड, अन्याय अत्याचार निर्मूलन समितिचे केणी हे उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमात काळू कोमासकर म्हणाले की, “देशात गुढीपाडव्यासारख्या स्वागत यात्रेला महत्त्व दिले जाते. हे सण, जात, पंथ, धर्म हे काल्पनिक आहेत. परंतु ज्या शहिदांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा विसर सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणाऱ्या डोंबिवलीकरांना पडला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे“. रॅली दरम्यान अनेकांनी विचारले ही कशासाठी रॅली आहे. त्याचप्रमाणे काळू-कोमासकर यांनी महागाई मध्ये होरपळत चाललेल्या गरीब सामान्य माणसाची व्यथा मांडताना, भाजपला लक्ष्य केले. तर रवी भिलाने यांनी डोंबिवलीत आल्यानंतर मला काम करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते असे सांगितले. शाहीर पंकज कांबळे यांनी आपल्या शाहिरीने सभेचे वातावरण उत्साही केले. कार्यक्रमाची सांगता घोषणा आणि क्रांतिकारी गीताने करण्यात आला.

 

ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

श्री. शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.

न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते ? असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.

‘मोदी’ या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही शशिकांत कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी, संजय आदक, नगरसेविका पाटील, संतोष शिंदे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 

मालमत्ता कर आकारणी अंतिम जप्तीच्या नोटीसीमुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; कर आकारणी दुरुस्ती साठी ‘कामा’ चे निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली येथील एमआयडीसी भागातील उद्योजकांना भूखंड मालमत्ता कर आकारणी संदर्भात जप्तीच्या अंतिम नोटीसा देण्यात आल्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या ‘कामा’ संघटनेने महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना उद्योजकांना दिलासा देणारी कर दुरुस्ती प्रणाली महापालिकेच्या वतीने करण्यात यावी असे निवेदन दिले आहे.

उद्योजकांच्या ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मंगेश चितळे यांची भेट घेतली. याबाबत देवेन सोनी यांनी अशी माहिती दिली की, ग्रामपंचायत कडून या उद्योजकांच्या भूखंडांना कर लावला जात असे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे येथील २७ गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने शंभर पट कर उद्योजकांच्या भूखंडांना लावला गेला आहे. कोरोनाच्या काळातून उद्योजक कसेबसे सावरत असताना, हा कर उद्योजकांना परवडत नाही. कोरोना काळामध्ये काही लघुउद्योग बंद पडले असून, या उद्योजकांना सुद्धा अवाच्या सव्वा सुमारे करोडो रुपयांचा कर पालिकेने लावला आहे. आता हे कर न भरल्यास त्यांना अंतिम जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यामुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये एमआयडीसीतील उद्योजकांना दिलासा देणारी कर प्रणाली दुरुस्ती करण्यात यावी. असा देखील ठराव करण्यात आला होता. मात्र त्याबाबत महापालिकेकडून आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. २०१७-१८ पासून मालमत्ता कर हा जुन्या पद्धतीने आकारणी करण्यात यावा ही पालिकेला मागणी आम्ही करत आहोत. ज्यांची मिळकत २००२ च्या पूर्वीची आहे. त्याप्रमाणे कर आकारणी सुरू करावी असा ठराव महापालिकेने केला आहे. हे वारंवार आम्ही महापालिकेला निवेदनाद्वारे सांगितलेले आहे. पुन्हा डिसेंबर २०२० पासून आम्ही मालमत्ता कर दुरुस्ती बाबत पाठपुरावा करत असूनही, अद्याप त्याबाबत महापालिकेने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

‘कामा’ संघटनेच्या वतीने पालिकेला दिलेल्या निवेदनात डोंबिवली येथील टप्पा एक आणि टप्पा दोन यामधील भूखंडाचे निवासी,औद्योगिक आणि बिगर निवासी असे वर्गीकरण स्तर करावेत. सध्या निवासी आणि बिगर निवासी असे दोन स्तर आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील तीन स्तर असावे असे निर्देश दिले होते. राज्यातील नाशिक आणि अंबड पालिकांमध्ये तीन स्तर असणारी रचना औद्योगिक क्षेत्रात आहे. मालमत्ता कर यासंबंधी महापालिकेने काही उद्योजक भूखंडधारकांना नोटीसा दिल्या आहेत. त्या तात्काळ मागे घ्याव्यात किंवा त्यांना स्थगिती द्यावी आणि १८९ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. तोपर्यंत कोणतीही कारवाई एमआयडीसीतील उद्योजकांवर करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

दुरुस्ती कर आकारणी प्रणालीप्रमाणे उद्योजक एक हाती कराची रक्कम भरण्यास तयार आहे असे ‘कामा’ संघटनेच्या वतीने उपस्थित पत्रकारांना सांगण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेने करावी, अशी विनंती कामाच्या वतीने निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आली आहे. येत्या आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट ‘कामा’ संघटनेच्या वतीने घेण्यात येईल असे संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते ‘रिजन्सी अनंतम’ मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बायोगॅस वर शाळेत असताना आपण सर्वांनी अभ्यास केला होता. पण ही गोष्ट फार कमी वेळा अमलात आणली जाते. सरकारच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचे प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उभे केले जातात. पण खाजगी गृह संकुलामध्ये फार कमी वेळा बायोगॅस प्रकल्प उभारला जातो. पण डोंबिवली मध्ये यंदा पहिल्यांदाच एका खाजगी गृह संकुल ‘रिजन्सी अनंतम’ मध्ये बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. ज्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर पडणारा कचऱ्याचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल. ओल्या कचऱ्याचे विघटन जागेवर करता येणं शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणाऱ्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री.भाऊसाहेब दांगडे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते बायोगॅस प्रकल्पाची मशीन ऑन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम मधील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.

‘पाणी वाचवा’ या विषयावर एक छोटेसे स्किट देखील रिजन्सी अनंतम मधील रहिवाशांनी सादर केले. सर्वांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीर रित्या शप्पथ देखील घेतली. यावेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रिजन्सी अनंतम मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये ची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आल्या. ज्यामध्ये आपली कला रेखाटून वेदांत राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष् कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.

 

भाजपाचे समीर चिटणीस यांच्या संपर्क कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन..*


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम मंडळाचे सरचिटणीस समीर चिटणीस यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी अध्यक्ष संजीव बिडवाडकर, युवा आघाडी अध्यक्ष मितेश पेणकर, महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, चिटणीस बंधू, त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक, रिक्षा चालक आणि इतर मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी रोड वर असलेल्या अंबिकानगर येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भावे सभागृह येथे समीर चिटणीस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच लोकउपयोगी कामे, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. पारदर्शी व्यावसायासोबत सामाजिक कार्यात चिटणीस बंधूंचा डोंबिवलीमध्ये सहभाग असून, समीर चिटणीस यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोकण तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोकणात आणि डोंबिवली मध्ये नागरिकांना सहाय्यभूत ठरेल असे कार्य त्यांचे सहकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू केले होते. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये समीर चिटणीस हे अभ्यासू लोकप्रिय व्यक्तिमत्व असून, सर्वपक्षीय मित्रमंडळी त्यांचे स्नेही आहेत. समीर चिटणीस हे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मर्जीतील असून डोंबिवली पश्चिम येथील भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे भाजपमधील त्यांचे सहकारी पाहत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामाजिक कार्याचा व्याप आणि कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने आकाराने मोठे कार्यालय घ्यावे लागल्याची चर्चा उद्घाटन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.