Home Blog Page 40

महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अयोध्या नगरीत कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रामनवमी उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महेश पाटील प्रतिष्ठान च्या वतीने डोंबिवली मानपाडा येथील अयोध्या नगरीतील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज घरत, ग्रामीण भाजप महिला अध्यक्ष मनीषा राणे, कामाचे कार्याध्यक्ष देवेन सोनी, समाजसेवक सुजित नलावडे तसेच डोंबिवली शहरातील राजकीय, व्यावसायिक, उद्योजक, विविध संस्थाचे तसेच सामाजिक संघटनांच्या व्यक्तींनी या राम मंदिरास भक्ती भावाने भेट दिली. डोंबिवलीत जवळजवळ सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. त्यातीलच एक हिंदू धर्मीय बांधवांच्या साठी महत्त्वाचा दिवस म्हणजे रामनवमी. हा दिवस डोंबिवली येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांनी साजरा होत असतो. यंदा रामनवमी जन्मोत्सवासह गुरु पुष्यामृत योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी असे योग एकत्रितपणे आले असल्यामुळे रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठीचा उत्साह अजूनच वाढला.

अयोध्या नगरीत देखील देखील रामनवमीच्या उत्सवाचे वातावरण होते. यावेळी महेश पाटील प्रतिष्ठानचे संचालक तसेच माजी नगरसेवक महेश पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीतील आयोध्या नगरीमध्ये रामनवमी साजरी करण्यात येत असून संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. भक्तगणांना प्रत्यक्ष अयोध्येत जाता येत नसले तरी, त्यांच्यासाठी हिच अयोध्या नगरी आकर्षक रोषणाईने सजली असून, पहाटेपासून श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची रीघ लागली आहे. सकाळपासून भजन कीर्तनाचा सोहळा मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सायंकाळी मानपाडा येथील अग्रवाल हॉल मध्ये सुमारे ४००० भक्तगणांना प्रसाद म्हणून भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, आरोग्य विषयक व्यक्तिगत सहाय्य नागरिकांसाठी केले जाते. महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील, त्यांची मुले आणि प्रतिष्ठानचे महिला मंडळ या रामनवमी उत्सवात हिरीरीने आणि उत्साहात सहभागी झाले होते.

‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ च्या वतीने श्रीराम नवमी निमित्त गीत रामायण आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्यरुपांतर सादर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जान्हवी मल्टी फाउंडेशन च्या डोंबिवली पश्चिम येथील जन गण मन शाळेच्या प्रांगणात श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा जीवनपट आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत नाट्यरूपात सादरीकरण करण्यात आले. सीतामाई, लक्ष्मण, हनुमानजी, लव कुश आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ढोल ताशामध्ये अश्व रथातून आगमनाच्या उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे तसेच ज्ञानेश्वरीवर पीएचडी केलेल्या डॉ. सौ.अनुराधा सुधीर कुलकर्णी, ब्रह्मकुमारीचे माउंटअबू वरून खास उपस्थित असलेले डॉ. कुमार वैद्य, सौ.चारुलता गुजराती असे अनेक मान्यवर या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होते.

सुमारे २०० कलावंत आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रेक्षक तसेच पत्रकार बंधू-भगिनी यांच्या साक्षीने नाट्यमय, रंगारंग आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आपला छंद जोपासला पाहिजे आणि डिजिटल डॉट्स ही संकल्पना। मांडली. रोज सायंकाळी सात ते आठ वाजता आपण सर्वांनी दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी म्हणजेच ‘डिजिटल वर्ल्ड’ पासून दूर राहावे म्हणजेच त्याचा वापर एक तासासाठी करूच नये आणि या वेळात आपला छंद जोपासावा असे सांगितले. भविष्यात संस्थेत सम्राट अशोक, महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील असेही ते म्हणाले.

डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष बजरंग वाळुंज आणि ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांचा सत्कार डॉ. कोल्हे यांनी केला. पत्रकार नरेंद्र थोरावडे, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक अवधूत सावंत, अनघा पाटील, मीनल पवार, आयूषी विचारे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना जान्हवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा कुमारी जान्हवी राजकुमार कोल्हे यांची होती आणि ती कल्पना प्रत्यक्षात साकाराण्यासाठी श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे आणि सर्व जेएमएफ परिवारातील सदस्य यांनी अथक प्रयत्न केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांनी बग्गीमध्ये बसण्याचा मनमुराद आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ने झाली.

 

नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदाही दरवर्षी प्रमाणे नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा मानाच्या साडीचा व अलंकाराचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदिवली गावात देवीची पालखी काढण्यात आली होती. पालखीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक गीते बँडवर वाजवण्यात आली. या पालखीच्या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीमध्ये गुलाल उधळत पालखी उत्सवानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक गीतांवर सगळ्याच आबाल वृद्धांनी ठेका धरला होता. पालखी गावदेवीच्या देवळाजवळ आल्यानंतर फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावदेवी आईचे आरती करून सर्व भक्तांना प्रसाद वाटण्यात आला.

गावदेवी मंदिराचे अध्यक्ष चांगदेव सिताराम म्हात्रे, उपाध्यक्ष तुकाराम पुंडलिक म्हात्रे, उमेश बाबूराव पाटील, जितेंद्र मधुकर म्हात्रे, अनिल सिताराम म्हात्रे, वर्गीस पदू म्हात्रे, विजय म्हात्रे, दीपक कृष्णा म्हात्रे, बंडू पदू म्हात्रे, यशवंत बाबुराव म्हात्रे, दिनेश अनंता पाटील, बबन हनुमान म्हात्रे, जनार्दन विठ्ठल म्हात्रे, राजेंद्र हरिश्चंद्र म्हात्रे आणि इतर पदाधिकारी, महिला गावदेवी आईचा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी झटत होते.

गावदेवी पालखी उत्सवाचे ४९ वे वर्ष असून, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात गावदेवी आईचा उत्सव प्रवेश करणार आहे. सुवर्ण महोत्सव मोठ्या धुमधडाकात व उत्साहात गावदेवी आईचा पालखी सोहळा करण्यात येईल. असे गावदेवी उत्सव मंडळाचे पदाधिकारी अनिल सीताराम म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या गावदेवी देवळात दरवर्षी गुढीपाडव्याला भंडाऱ्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येत असून सुमारे ५००० भक्तगणांना महाभोजनाचा लाभ दिला जातो. गावदेवी ही नांदिवली पंचानंदची नवसाला पावणारी जागृत ग्रामदेवता असल्याचे गावदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नांदीवली पंचानंद येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी या गावदेवी पासळखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

 

अज्ञात इसमांनी फाडले ठाकरे गटाचे बॅनर; डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छांचे बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर डोंबिवलीत काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस तक्रार ठाण्यात दाखल केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ६ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडले असून रविवारी सकाळी बॅनर फाडल्यचे निदर्शनास येताच डोंबिवलीतील ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा रजि क्र. ४८२/२०२० आयपीसी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

 

मुख्य नेते पदावरून संजय राऊत यांची गच्छंती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यापुढे जात आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी शिंदे गटातील ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. “२१ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. यामध्ये एकमताने ठराव करण्यात आला आहे की, संजय राऊत हे आता संसदेतील मुख्य नेतेपदी नसणार आहेत. तर गजानन किर्तीकर यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.”

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. याआधी यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी खासदार संजय राऊत होते. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालयदेखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते. त्यानंतर संजय राऊतांची मुख्य गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यांनतर आज शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे.