Home Blog Page 48

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव-२०२३ चे आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते शुभारंभ

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर कला-क्रीडा महोत्सव 2023 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (क्रीडा) कल्पिता पिंपळे, महानगरपालिका अधिकारी, शालेय मुख्याध्यापक व स्पर्धेत भाग घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान आयुक्त यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, त्यांचा शारीरिक व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव अंतर्गत 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत विविध खेळ व सांस्कृतिक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी रोजी कबड्डी व लंगडी, 24 फेब्रुवारी रोजी खो-खो व लगोरी, 25 फेब्रुवारी रोजी धावणे व 26-27 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक स्पर्धा व खुला क्रिकेटचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

मशाल प्रज्वलन करून स्पर्धेस उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी शुभेच्छा दिल्या व सदर कला-क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्या असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे आहे.

डोंबिवलीत महाशिवरात्री उत्साहात साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात तसेच ग्रामीण भागातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शंकर मंदिरात भक्तांना फळवाटप सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोले शंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात शिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वात जुन्या असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बेलपत्र, बेलफळे वाहत, शिवलिंगावर दूध अर्पण करून यथासांग पूजा करण्यात आली. येथील शिवमंदिरात भाविकांनी पूजा करून महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी या सणानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शिवभक्तांनी भंडाऱ्याचेही आयोजन केले होते. आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भक्तांना शुभेच्छा देण्याचे मंदिर परिसरात बॅनर्स लावल्याचे दिसून येत होते.

श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे महाशिवरात्री हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीत भजन-कीर्तन तसेच अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. सागाव, मानपाडा, सोनारपाडा, सागर्ली परिसरातील अशा गावांमधील भाविक श्रावणी सोमवारीच नव्हे, तर प्रत्येक दिवशी या मंदिराला भेट देत असतात. येणाऱ्या सर्व भक्त जणांसाठी प्रसाद म्हणून खिचडी, केळी, खजुराचे वाटप केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोकप्रतिनिधी या मंदिरास भक्तिभावाने भेट देत असतात. मंदिराचे विश्वस्त प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, पूजा मात्रे, पंढरीनाथ पाटील, रिक्षा संघटनेचे अंकुश म्हात्रे हे महाशिवरात्रीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी झटत असतात.

श्री सागांवेश्वर शिवमंदिर यांच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष कर्ण जाधव यांनी मानपाडा क्रॉस रोडवरील शिवमंदिर येथे केले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांसाठी भंडारा ठेवण्यात आला होता. ‘मानस प्रचार हौसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट’ सेवा संस्थेच्या वतीने श्री राम कथायज्ञ श्री रामजी मिश्रा महाराज यांचे सुश्राव्य किर्तन १० ते १८ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते. रात्रीपासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी रीघ लावली होती यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाशिवरात्रीच्या सकाळीच मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतल्याचे कर्ण जाधव यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळते काही दिवसापूर्वी श्री त्रिंबकेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘दर्शन यात्रा’ आयोजित केली होती महादेवाच्या भक्तांना दूर जाऊ लागू नये म्हणून हे मंदिर २०१४ साली बांधण्यात आल्याचे कर्ण जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले, ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत करणे त्याप्रमाणे सामाजिक कार्य नेत्रदान वैद्यकीय शिबिर असे आयोजित आम्ही करीत असतो असे ते म्हणाले.

कोपर येथील नागेश्वर मंदिरात देखील ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी असा हा साप्ताहिक कार्यक्रम होता यामध्ये धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते तसेच १९ फेब्रुवारी रविवारी रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

“अमित शाहजींनी जे सांगितले ते केले” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच पक्षाचे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे सुपूर्द केले. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खरी शिवसेना-खोट्या शिवसेना वादाला पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत हा शिवसेनेच्या नावाची आणि चिन्हाची चोरी असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण वादावर आता प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार फोडून महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्याचे सरकार स्थापन करण्याचे विधान केले. अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “अमित शाहजींनी मला सांगितले, शिंदे जी तुम्ही पुढे जा. आम्ही तुमच्या मागे खडकासारखे उभे राहू. शाहजींनी जे सांगितले ते केले.”

शिवसेनेच्या वादावर अमित शहांनी उद्धव गटाची खिल्ली उडवली

खऱ्या शिवसेना वादावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘सत्यमेव जयते’ हा शब्द काल प्रत्यक्षात उतरला. निवडणूक आयोगाने दूधाचे दूध पाण्याचे पाणी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही मिळाल्याचे ते म्हणाले. जे खोट्याचा आधार घेत ओरडत होते, त्यांना आज सत्य कोणाच्या बाजूने आहे हे कळले आहे. ते म्हणाले की, आज पुण्यातील कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व जागा शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला जातील, असा ठराव घेऊन जायचे आहे.

या कार्यक्रमात अमित शहा यांच्या हस्ते ‘मोदी @२०’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पद वाटप करण्याबाबत कोणताही करार झाला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली असे अमित शहा म्हणाले.

 

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांचीच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला दिले असून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दणका दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” हे नाव दिले असून मूळ पक्षाचे धनुष्य बाण हे चिन्ह ही एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आले आहे.

ठाकरे घराण्याकडे आता शिवसेना नाही

निवडणूक आयोगाने आज हा निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाच्या नाव आणि अधिकारावरून लढाई सुरू होती. यामुळे ठाकरे घराण्याच्या हातून आता तरी शिवसेना निसटली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवेसना प्रमुख म्हणून ओळखले जाणार आहेत.

शिवसेनेतील बदल आयोगाला माहितीच नाहीत

२०१८ मध्ये शिवसेना पक्ष घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ च्या पक्ष घटनेत समाविष्ट केलेले पक्षांतर्गत लोकशाही नियम बदलण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून बदलांना मान्यता दिली होती. पण २०१८ मधील बदल नोंदवले गेले नाहीत असे आजच्या आयोगाच्या निकालात स्पष्ट झाले आहे. २०१८ मध्ये शिवसेना पक्षाने पक्ष घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नसल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पक्षीय निवडणुका न घेताच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला आहे असे आयोगाने म्हटले आहे.

हा निर्णय लोकशाही ला घातक

आजचा हा निर्णय हा अत्यंत अनपेक्षित आहे चोरालाच तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, देशात आता बेबंदशाही माजली आहे अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी यावर दिली आहे. आमची मशाल आता पेटली आहे, आमची शिवसेना लेचीपेची नाही, आमच्या देव्हाऱ्यात शिवसेना प्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आहे तो आमच्याकडेच राहील असेही ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, आयोगाचा निकाल हे कट कारस्थान आहे हे स्पष्ट झाले आहे, मात्र धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही, चोरांना आता आनंद झाला असेल पण तो अल्पकाळच टिकेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

सामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना अवश्य पोहोचवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण सोहळा व भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी या कार्यक्रमात उपस्थित होते.

या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थींना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्यातील दिवाण-ए-आम मध्ये १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमास मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शपथविधी नंतर घेतलेले प्रत्येक निर्णय हे सर्वसामान्यांना मदत करणारे, त्यांना न्याय देणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे व सरकार घरापर्यंत पोचण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद आहे. राज्याच्या हितासाठी निर्णय घेत आहोत. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्पबधितांना युएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील तरूण स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक होण्यासाठी ‘इनोव्हेशन हब’ला राज्य शासन सहकार्य करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवू या. योजना फक्त कागदावरच न राहता लोकांपर्यंत अवश्य पोहोचल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले.