Home Blog Page 47

पुन्हा १०० रुपयांत सरकार कडून आनंदाचा शिधा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

कोणाला मिळेल हा शिधा ?

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.

१ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ‘ई-पास’द्वारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ‘ई-पास’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा ‘आनंदाचा शिधा’ दिला जाईल.

हा ‘आनंदाचा शिधा’ देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील सरकार तर्फे मान्यता देण्यात आली.

 

१० घरफोड्यांची उकल आणि १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत मानपाडा पोलीसांनी केले घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानपाडा पोलीसांना बंद घराची रेकी करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे केवळ तीन महिन्यात या आरोपीने डोंबिवली परिसरात धुमाकूळ घालत १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले १२ लाखांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे (वय: २६ वर्षे) असे गजाआड केलेल्या अट्टल घरफोड्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीला अटक करण्याविषयी सांगताना परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढल्याने गुन्ह्याचा उकल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सपोनि. सुनिल तारमळे, अविनाश वणवे यांच्यासह विशेष पथक स्थापन करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला असता पोलीस तपासावेळी एक संशयित व्यक्ती एका इमारतीच्या खाली सुरक्षा रक्षकासोबत बोलत असल्याचे घरफोडी झालेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या संशयित व्यक्तीचा शोध सुरु केला असता, हा व्यक्ती अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकातील सपोनि. अविनाश वणवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. राजेंद्र खिलारे, गडगे, ठिकेकर, पवार, पाटील, माळी, मिसाळ, पोना. भोईर, किनरे, पवार, पाटील, पोशि. मंझा, चौधर, आहेर, आव्हाड या पथकाने व्दारली गावात सापळा रचून आरोपी शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे याला ताब्यात घेतले.

१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदाराच्या मदतीने बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्यानंतर घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून १० घरफोडीच्या गुन्ह्यातील २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

१० घरफोड्या केल्याची दिली कबुली

अटकेतील आरोपी मूळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील राहणारा असून तो काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबई परिसरात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली भागात १० घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याने आणखी काही घरफोड्या केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे.

 

डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. डोंबिवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्व (ए)चे अध्यक्ष सदाशिव शेलार, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी पूर्व (बी)चे अध्यक्ष नवेंदु पाठारे, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी (ए) चे अध्यक्ष शशिकांत चौधरी, डोंबिवली शहर (ब) ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. एकनाथ म्हात्रे, डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्वचे जनरल सेक्रेटरी अशोक सदू कापडणे, अभय टावरे, जीतेंद्र मुळे, श्री. रमेशचंद्र जैन तसेच डोंबिवली शहरातील सर्व नागरिकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, तसेच काँग्रेस पदाधिकारी,महिला पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, ह्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी सर्वानी हजर राहून महाराजांना मानवंदना दिली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. महाराजांच्या सिद्धांताची बांधिलकी समाजासोबत होती. त्या विचारांचे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. आगामी पालिकेची निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील असे काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा भव्य शुभारंभ!

भाईंदरसह देशभरात 1100 ठिकाणी राबवले स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
स्वच्छ जलाबरोबरच स्वच्छ मनाचीही आवश्यकता आहे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीचा छट घाट (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.
या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.

या परियोजनेच्या अंतर्गत मुंबईलगत असलेल्या मीरा भाईंदर येथील उत्तन समुद्र किनाऱ्यावर हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये 600 पेक्षा अधिक निरंकारी सेवादल व अन्य भक्तगणांनी भाग घेतला. याप्रसंगी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह उपायुक्त रवी पवार, उपायुक्त शरद नानेगांवकर आणि मीरा भाईंदर भाजपा जिलाध्यक्ष रवी व्यास आदि मान्यवरांनी उपस्थित राहून मिशनच्या कार्याचे कौतुक केले तसेच स्वत: साफसफाई करत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला.

या व्यतिरिक्त मुंबईसह नवी मुंबई, ठाणे जिल्हा व उरण परिसरात व्यापक स्वरूपात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ठाणे शहरातील स्वच्छता कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मध्य प्रदेशमधील जिल्हाधिकारी नवजीवन पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आदिंचा समावेश होता. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव येथे केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी स्वच्छता अभियानास भेट देत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बदलापूर येथे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील उपस्थित राहून मिशनच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे वर्जित होत्या.

“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” यशस्वीरित्या संपन्न!

वन महोत्सव 2023 समारोप प्रसंगी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभली तर
आयुक्त दिलीप ढोलेंनी मानले सर्वांचे आभार!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत दिनांक 25, 26 व 27 फेब्रुवारी रोजी “वनमहोत्सव 2023” आयोजित करण्यात आला होता. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सदर वन महोत्सव 2023 समारोप प्रसंगी अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभली. वन महोत्सव 2023 मिरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.

पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांच्या माहितीची जनजागृती करणेकामी महानगरपालिकामार्फत वनमहोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या वनमहोत्सवात पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध प्रकारचे भव्य विक्री प्रदर्शन आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक व सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे, अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प जसे की सोलार सेल्स, सोलार बॅटरी, EV चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी श्रेणीतील प्रदर्शन भरवण्यात आले होते.

तसेच 27 फेब्रुवारी 2023 म्हणजेच समारोपाच्या दिवशी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने, चित्रकला स्पर्धा विजेता, सायक्लोथॉन विजेता क्रीडा महोत्सव 2023 मधील विजेत्यांना अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चा अध्यक्ष, मणींदरजित सिंह बिट्टा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

मणींदरजित सिंह बिट्टा यांनी पर्यावरणाशी निगडित आयोजित केलेल्या “वनमहोत्सव 2023” या उपक्रमाचे व पर्यावरण संवर्धनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून सतत राबवत येत असल्याने मिरा-भाईंदर महापालिकाचे अभिनंदन व कौतुक त्यांनी केले. शहरातील नागरिकांनी पर्यावरण आणि निसर्ग याविषयी संवेदनशील बनणे, नैसर्गिक साधन संपत्तींचे संवर्धन करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” मध्ये शहरातील जबाबदार नागरिक म्हणून सहभाग नोंदवल्यामुळे हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी मिरा भाईंदर शहरवासीयांचे आभार व्यक्त केले.