Home Blog Page 49

४०० कोटी रुपयांचा नागपूरमध्ये वाळू घोटाळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पदाचा गैरवापर करीत नागपूर मध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास पंचायतराज तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर यांनी केला.

उच्चस्तरीय चौकशी व्हावी

नागपूर येथील शिंदे गटातील स्थानिक राजकारणी यांनी पदाच्या दुरुपयोग करीत गौण खनिज संदर्भात (वाळू घोटाळा) ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा शासकीय महसुल गिळंकृत केला. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारची फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

काय आहे आरोप ?

राज्य सरकार द्वारा वैनगंगा नदी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे खनीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास वाळू उपलब्ध करून देण्याकरिता या नदीवरील चार घाट आरक्षित करण्यात आलेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील अरहर – नवरगांव, बोडदा चिंचगाव आणि हळदा या नावाने वैनगंगा नदीवरचे चार घाट खणीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास तसेच शासकीय योजनेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांना वाळू पुरवण्याकरिता दिलेले होते. शासकीय प्रकल्पाचे नाव पुढे करून अवैधरित्या थेट नदीमधून वाळू उत्खनन करून खाजगी बांधकामाच्या ठिकाणी पाठवून करोडो रुपयांची वाळू परस्पर विकण्यात आली. नियमानुसार वाळू उत्खनंन स्थानिक मजुराच्या माध्यमातून करायचे असते आणि नदीतून स्टॉक यार्ड पर्यंत ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करायची असते, परंतु या ठिकाणी सर्व नियम कायदा बाजूला ठेवत थेट नदीमधून ट्रक द्वारे, पोकलेन द्वारे हजारो ट्रक वाळू बाहेर विकण्यात आली, असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या संदर्भातील एक पुरावा म्हणजेच नागपूर जिल्ह्यातील भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत खनीकर्म महामंडळाच्या रेती वाहतूक करीत असणारा ट्रक व ट्रक चालक यांच्यावर झालेली कारवाई तसेच थेट नदी मधून पोकलेन द्वारे रेती उत्खनन करीत ट्रक मध्ये लोड करून सरळ खाजगी प्रकल्पाला खुलेआम देण्यात येत होतं.तेव्हा वरील सर्व उत्खनन व्यवहाराची व अनियमित आर्थिक व्यवहाराची निष्पक्षपणे उच्चस्तरीय चौकशी व्हावी या करिता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे सदर प्रकरण द्यावे अशी मागणी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

गुन्हे शाखा घटक-३ कडून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १३/०२/२०२३ रोजी रात्री २२.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील शेलार नाक्याजवळील शंकर मंदिराच्या बाजूला फिर्यादी देवेंद्र राजभर हा पाणीपुरी खात असताना आरोपी नामे १) शिवा तुसांबड, २) छोटा चंदया, ३) मोठा चंदया, ४) वाणी हे तीथे आले व आपसात संगनमत करून फिर्यादी देवेंद्र राजभर यांस चाकूचा धाक दाखवून दमदाटी करून त्याच्या जवळील ₹ १८,२००/- रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याबाबत रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. ६१/२०२३ भादंवि कलम ३९२, ३९७, ५०६, ३४ प्रमाणे दि. १४/०२/२०२३ रोजी दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दि.१५/०२/२०२३ रोजी गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्री.मोहन कळमकर व पथकाने डोंबिवली पूर्वेकडील बंदिश पॅलेस येथे सापळा रचून १) शिवा रिषीपाल तुसांबड (वय:१९ वर्षे) राहणार. गजा डुक्करवाला याचे घराजवळ, सार्वजनिक शौचालयाच्या समोर, त्रिमूर्तीनगर, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व), २) आकाश उर्फ वाणी हिरू राठोड (वय:२१ वर्षे) राहणार. रणविर डॉक्टरांच्या क्लिनिक समोर, स्वतःचे घर, त्रिमूर्तीनगर, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व) येथून ताब्यात घेऊन त्यांच्या पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपी शिवा रिषीपाल तुसांबड याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात ७ व खडकपाडा पोलीस ठाण्यात १ असे एकूण विविध ८ गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले.

सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अशोक मोराळे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री.शिवराज पाटील, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.राजकुमार डोंगरे, यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. नवनाथ कवडे, पोहवा. अनुप कामत, पोहवा. बालाजी शिंदे, पोहवा. बापूराव जाधव, पोहवा. विलास कडू, पोना. सचिन वानखेडे, पोशि. गोरक्ष रोकडे यांनी केली आहे.

 

हॉटेलमध्ये आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यवतमाळ येथे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला. ही घटना सोमवारी सकाळी स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये उघडकीस आली. पोलीस शिपायाचा नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झाले नसून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मागीलाल चव्हाण (वय: ३१ वर्षे) राहणार. पुसद असे मृतक पोलीस शिपायाचे नाव असून ती वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. गेल्या एक महिन्यापूर्वी त्याची शहर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रुजु झाल्यानंतर दोन दिवसापासून तो स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये राहत होता.

१२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सदर पोलीस शिपाई हॉटेलमध्ये गेला होता. दरम्यान १३ फेब्रुवारी रोजी सकाळी हॉटेलच्या रुममधून बाहेर न आल्याने आतमध्ये पाहिले असता मागीलाल चव्हाण हा पोलीस शिपाई मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलीसांना अजून मृत्यूचं नेमकं कारण कळु शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. गेल्या काही दिवसापूर्वीच त्याचा साखर पुडा झाला होता. त्याच्या मागे त्याचे आई-वडील, बहिण, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

राज्याच्या विकासात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.

काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याच्या विकासात माध्यमांचे योगदान मोठे आहे. आम्हीही राज्यात लोकसत्ता आणली आहे. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करीत असून ही माध्यमे विकासाची वाट दाखविणारे आहेत. त्याचबरोबर राज्य शासन करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन देखील माध्यमे करीत असतात, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबवित असून या प्रकल्पांना गती दिली जात आहे. यात राज्यातील रस्त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्यवस्था उभी करण्यासाठी गेमचेंजर असलेला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ गडचिरोली पर्यंत, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता प्रस्तावित आहे. याचबरोबर राज्यात मेट्रो प्रकल्प सुरु आहेत. अशा विविध प्रकल्पांमुळे वाहनांची संख्या कमी होऊन पर्यायाने प्रवाशांची वेळेची बचत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही आर्थिक राजधानी असून कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. उद्योगवाढीसाठी नुकतेच दावोस येथे कोट्यवधींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकास आणि लोकहितासाठी प्रसारमाध्यमांनी सूचना केल्यास त्यांच्या सूचनांवर राज्य शासनाकडून नक्कीच कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले. यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध २०२२’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

जगातील सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांची उत्तुंग भरारी – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा हाती तलवार घेतली आणि समाजाला सुधारकांची गरज असताना सुधारकांचे काम केले. जगातील प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांचे योगदान असून ब्राह्मणांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण उद्योजकांच्या परिषदेत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृह सांगितले. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’च्या मुंबई विभागातर्फे डोंबिवलीतील उद्योजकांच्या दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ७०० हून अधिक ब्राह्मण उद्योजक उपस्थित होते. रविवारपासून ब्राम्हण उद्योजकांची दोन दिवसीय परिषद डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत उद्योजकांना ‘उद्यम जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद कोऱ्हाराळकर, महेश जोशी, श्वेता इनामदार, मकरंद पुंडलिक, अरविंद नांदापूरकर, विवेक वामोरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कडोंमपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाने समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम केलेलं आहे ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या निस्वार्थीपणे काम करीत आहेत त्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी हाती तलवार घेत आणि ज्यावेळी समाजाला सुधारण्याची वेळ आली त्यावेळी सुधारकाचे काम केले. प्रसंगी आपल्याच समाजाच्या माणसासमोर उभे राहण्याला ते कधीच कचरले नाहीत. आता स्टार्टअप पासून ते मोठ्या उद्योग व्यवसाय पर्यंत ब्राह्मण समाजाने प्रगती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातील आर्थिक क्षेत्रांमध्ये पाचव्या स्तरावर आहोत २०३० साली आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ असा आशावाद यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशातील दूरसंचार क्रांतीमुळे नवे नवे व्यवसाय उभे राहिले असून या नव्या व्यवसायांना आपण समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण समाजामध्ये विशेषता तरुणांमध्ये शिक्षणाच्या व रोजगाराच्या बाबतीत कमतरता व्यक्त केली जाते. ही कमतरता दूर करण्याचे काम समाजाने केले पाहिजे जगामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत हे समजून सांगणारं कुणीतरी हवं. देश वेगाने प्रगती करत असताना ब्राह्मण समाजाने मोठे योगदान देशांमध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीने यापुढेही ब्राह्मण समाजाने देशात आपले योगदान द्यावे. जगातील सात महत्वपूर्ण उद्योग कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मुख्य अधिकारी हे ब्राम्हण समाजातील असल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला. विदेशातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ब्राम्हण वर्गाची सरशी असून बाकरवडी ते मद्य निर्मितीपर्यंत साऱ्या क्षेत्रात ब्राम्हण उद्योजकांनी भरारी घेत देशाच्या उद्योग आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लावत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलून दाखविले.

बीबीएनजी सारख्या संस्था शासनाकडे कधी काही मागत नसून त्या स्वयंभू असून त्यांचे कौतुक करत सरकार म्हणून अश्या संस्थांना गरजू व्यावसायिक, मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार संधी याविषयी काही मदत साहाय्य हवे असल्यास आपण ते व्यक्तिशः आणि सरकार म्हणून मदत करू असे आश्वासन तेथील उपस्थित उद्योजकांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्या तरुणांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.