Home Blog Page 50

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन पेन्शनर्ससाठी एक कौन्सिल तयार करावी – खासदार सुप्रियाताई सुळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली.

दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. पेन्शन स्कीमचा (ईएसओपी) मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो आवर्जून नमूद करताना देशातील साठ लाख पेन्शनर्संनी एका दिवसाचे उपोषण केले होते. त्यांचे प्रतिनिधी ४ मार्च रोजी पंतप्रधानांनादेखील भेटले होते. यावेळी त्यांनी सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन करेल असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी विचारला.

यासंदर्भात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समितीने एक अहवाल तयार केला आहे. त्याबाबतही गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नाही ही बाबही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निदर्शनास आणून दिली. पंतप्रधानांनी या पेन्शनर्सना त्यांच्या हक्काचा पैसा देणार असल्याचे वचन दिले आहे. या पेन्शनर्संनी आपल्या वेतनातून ४७० रुपये, ५४१ रुपये , १२५० रुपये योगदान दिले आहे. त्यांना आता मासिक निवृत्तीवेतन ४६० रुपये आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेत त्यांचा निर्वाह कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करताना या लोकांनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना आपण वाऱ्यावर कसे सोडू शकतो असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत असताना, जगाच्या व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि शिक्षणामुळे मराठी माणसांसमोर भविष्याविषयी चिंता व्यक्त करणारे बरेच प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. ते योग्य कि अयोग्य याची चर्चा व्हावी या हेतूने वृत्तपत्र चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयावर शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टाईप करून लेख <rajandesai759@gmail.com> या मेल आयडीवर पाठवावेत, रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून लेख दि. २० फेब्रुवारी पर्यंत पाठवावेत, पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर-पश्चिम येथील मराठी भाषा दिवस कार्यक्रमात होईल अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या
प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी राजन देसाई – ८७७९९८३३९०  यावर संपर्क साधावा.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करत ₹ ९,९१,०५० चा महसूल जमा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर वाहतूक उपविभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय रघुनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकल तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार व त्यांच्यासोबत असलेले वॉर्डन यांच्या कडून शहाड रेल्वे स्टेशन, शहाड जकात नाका, म्हारळ जकात नाका, शांतीनगर, उल्हास नगर रेल्वे स्थानक, सतरा सेक्शन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दंडात्मक कारवाईतून एकूण ९९२ चलन आकारणी करण्यात आली असून सरकारी तिजोरीत ९,९१,०५० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका!

कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची काँग्रेसची मागणी

भाईंदर: सध्या मीरा भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट न करता त्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना केली आहे.

कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध नसताना शहरातील नागरिकांवर विविध मार्गांनी कर लादले आहेत तर नव्याने 10 टक्के रस्ता कर लागू करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतल्याने त्याला काँग्रेस पक्षाने यापूर्वीच विरोध केला आहे. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक या नात्याने आयुक्तच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना, नगरसेवक संख्या, पॅनल पद्धत आदींचे कारण देत प्रकरण न्यायप्रविष्ठ करीत प्रलंबित ठेवल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट किती असावी याचीही कालमर्यादा हवी असे नागणे म्हणाले.

महासभा घेण्याचा अधिकार महापौरांना असतो तर धोरणात्मक निर्णय, धोरण ठरविण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना असला तरी प्रशासक या नात्याने राज्यशासनाने आयुक्तांना बहाल केलेले अधिकार तसेच प्रशासकीय राजवटीत आजतागायत किती सभा घेतल्या व प्रशासकीय ठराव केले याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात प्रशासनाकडे मागितली असल्याचे काँग्रेस प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

येणाऱ्या काही दिवसांत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारच्या नवीन कर वाढीचा प्रस्ताव आल्यास त्याला काँग्रेस पक्षातर्फे विरोध केला जाईल असे स्पष्ट मत काँग्रेसचे मिरा भाईंदर शहाराराचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी व्यक्त केले आहे!

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद आयोजित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई: ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संस्था जगभरातील ब्राह्मण व्यावसायिकांना एकमेकांशी व्यावसायिक रित्या जोडण्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून समाज बांधवांना नोकरी पेशातून व्यावसायिक आणि उद्योगी बनवण्यात आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देण्यात परिवर्तित करत आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ संशोधक श्री. अनिलजी काकोडकर उपस्थित राहणार आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन मा. श्री. रवींद्रजी चव्हाण ह्यांची पण उपस्थिती लाभणार आहे.

डोंबिवली येथील तसेच डोंबिवली बाहेरील सन्माननीय प्रथित यश असे उद्योगपती आणि महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले विविध सन्माननीय व्यक्ती वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत ज्यामध्ये सर्वश्री सतीश मराठे, संजय लोंढे, दीपक घैसास, उदय निरगुडकर, संजय खरे, डॉक्टर अजय शेष, शशांक पेंडसे, निवृत्त लष्करी अधिकारी सुदर्शन हसबनीस इत्यादी मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रतिथयश व्यावसायिकांना ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे आमंत्रण दिले गेले आहे. या परिषदेमध्ये विचार, व्यवसाय आणि विकास या त्रिसूत्री वर आधारित अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, ज्यात व्यावसाय संदर्भात अनेक चर्चासत्रे, मान्यवरांचे मार्गदर्शन, ट्रेड फेअर, फॅशन शो, अशासारखे अनेक कार्यक्रम असणार आहेत व त्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि भारताबाहेरील देखील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत असे ‘बीबीएन ग्लोबल असोसिएशन’ या संस्थेचे सहसंचालक श्री.अरविंद कोऱ्हाळकर यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक ब्राह्मण व्यावसायिकांनी <www.parivartan23.in> ह्या वेबसाईटवर रजिस्टर करणे अथवा 7208266169 ह्या क्रमांकावर फोन करून आपली उपस्थिती निश्चित करायची आहे असे आयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.