Home Blog Page 51

तृतीयपंथीयांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी उचलले मोठे पाऊल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सबका साथ सबका विकास असे म्हणत असताना तृथीयपंथीय हा देखील समाजातील एक घटक आहे. या घटकातील लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या समाजातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुढाकार घेतला असून महाजन यांच्या हस्ते मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयामध्ये देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा मोठा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्य सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून ३० खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी.टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.

या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथीयांवर उपचार करण्यासाठी अद्यावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. २ व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या काही काळात सर जे.जी.समूहाच्या सेंट जॉर्ज, जे.जे. रुग्णालय आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे. रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असलयाचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष बाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

गिरीश महाजनांनी तृतीयपंथीयांसाठी उचलले मोठे पाऊल

राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या १३ जिल्हयांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथीय असा हा नवीन रकाना सुध्दा असणार असलयाचे या कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रस्ताविकात डॉ. सापळे यांनी सांगितले.

 

डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेचे राष्ट्र उभारणीसाठी योगदान महत्त्वाचे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शालेय शिक्षण घेण्याच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारे संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणीसाठी संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले.

डोंबिवलीतील गांधी नगर पीएनटी मधील ‘होली एंजल्स’ शाळेच्या दोन दिवसीय ३३ वा वार्षिकोत्सव नुकताच पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर उपस्थित होली एंजल्स शाळेचे संस्थापक डॉ.ओमेन डेव्हिड, मॅनेजिंग ट्रस्टी लीला ओमेन, प्राध्यापक बीजाॅय ओमेन, रोटरीयन जिल्हा गव्हर्नर कैलास जेठाणी, मुख्याध्यापिका रफट शेख अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांचे पालक, होली एंजल्स शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नांमुळे कुमारी दिक्षा सुवर्णा या विद्यार्थीनीने यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण प्राप्त करुन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक आणि खेळात देखील आंतरराज्यीय स्तरावर अग्रेसर आहेत. शालेय शिक्षणाच्या वयातच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील ‘होली एंजल्स’ शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणी साठी उत्तम संस्कार केले जात असून, हे राष्ट्रासाठी मोठे योगदान असल्याचे प्रांजळ मत कॅबिनेट मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शाळेचे कौतुक करताना मांडले. डॉ.ओमेन डेव्हीड व लिला ओमेन यांना शैक्षणिक क्षेत्रातील दिर्घ अनुभव असल्याने राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी घडत असल्याचे नामदार चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले. वार्षिकोत्सवात कुमारी दिक्षा सुवर्णा हिचा सत्कार नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक आणि खेळात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मॅनेजिंग ट्रस्टी लिला ओमेन आणि संस्थापक ओमेन डेव्हिड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या दोन दिवसीय ३३ व्या वार्षिक उत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या विविध कला सादर केल्या. या वार्षिक उत्सवासाठी सलग दोन दिवस पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होता.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती याच शाळेची माजी विद्यार्थिनी जिने २००९ साली दहावीच्या महाराष्ट्र राज्य बोर्डात ९१.६९ % गुण पटकावून शाळेत तिसरी आलेली कुमारी.अदिती अवधुत सावंत हिने जगातील ९ व्या मानांकित अमेरिकेतील एम्स शहरातील ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ तून ‘मास्टर्स इन ऍरोस्पेस ऍण्ड ऍरोनॉटीकल इंजिनियरिंग ची पदवी घेऊन नोकरी करत असून भारतात सध्या अमेरिकेतून सुट्टीवर आलेली आहे.

तिने खास करून या ३३ व्या वार्षिकोत्सवास उपस्थित राहून नामदार रवींद्र चव्हाण व ‘होली एंजल्स’ शाळेचे संस्थापक ओमेन डेव्हिड, लीला ओमेन, प्राध्यापक बिजॉय ओमेन, ऍनी बिजॉय, मुख्याध्यापिका रफट शेख, माजी शिक्षिका अनिता सोनावने, नेहा कामत, वीजी श्रीनिवासन, जयंती अखिलेश्वरन, रेवती टीचर यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या समस्त विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

“बारामतीत चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात” म्हणणाऱ्या पडळकरांवर अजित पवार संतापले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. सोमवारी नाशिकमध्ये पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या ४० वर्षात चुलते आणि पुतण्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे. शिरुर तालुक्याचा बिबट्या संदर्भातील १००० हजार कोटींचा निधी बारामतीला नेला. पण, बारामतीत एकही बिबट्या नाही. गेल्या ४० वर्षात यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांचं नुकसान केलं. त्यामुळे आपली वाताहात केली,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास अजित पवार मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. डिपॉजिट जप्त करुन पाठवलं आहे.”

“प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का ?”

कृषी प्रदर्शनासाठी शरद पवारांनी पैसे घेतले, असा आरोप भाजपाने केल्याचं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “कृषी प्रदर्शन होतं असताना शरद पवारांनी पैसे मागितले, असं सांगणारा एक शेतकरी उभा करा, मी राजकारण सोडून देईन. प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का? आव्हान स्वीकारत राजकारणातून निवृत्त व्हायचं. भारताला स्वयंपूर्ण करण्यात काम शरद पवारांनी केलं. त्याची नोंद जगाने घेतली,” असेही अजित पवार म्हणाले.

 

भाजपचे हिंदुत्व ‘ ढोंगी ‘ असल्याची विद्याताई चव्हाण यांची ‘जन जागर यात्रा’ रॅलीदरम्यान खरमरीत टिका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत भाजप विरोधात राष्ट्रवादी तर्फे ‘जन जागर यात्रा’ रॅली काढ्यात आली होती. या रॅली दरम्यान भाजपाने विकासाचे कोणतेही काम केलेले नाही. दिशाभूल करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी यावेळी केली आहे.

डोंबिवली येथे बेरोजगारी आणि महागाई विरोधातल्या ‘जन जागर यात्रा’ रॅली निमित्त आल्या असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही खोचक टीका केली आहे. यावेळी ठाणे विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, प्रदेश संघटक सचिव व ठाणे जिल्हा निरीक्षक माया कटारिया, जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, डोंबिवली विधानसभा १४३ चे अध्यक्ष सुरेश जोशी, महिला अध्यक्ष तनुजा पाटणकर, कार्याध्यक्ष नंदू धुळे, प्रदेश पदाधिकारी रमेश हनुमंते, खजिनदार मिलिंद भालेराव, ऍडव्होकेट ब्रह्मा माळी, वार्ड अध्यक्ष भरत गायकवाड, इतर मान्यवर पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या जन जागर यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महापालिकांच्या निवडणुका गेले वर्षभर होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. या अधिकाऱ्यांचा वाट्टेल तसा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी काम करीत नाहीत. कल्याण-डोंबिवली मध्ये भाजपाने नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवलेल्या नाहीत. भाजपने तर कामचं केलेले नाही. बेरोजगारी वाढून महागाईने जनता होरपळलेली असताना, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्वच करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. त्यामुळे मूलभूत समस्यांवरील लक्ष विचलित होत आहे. कल्याण-डोंबिवलीत काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. २७ गावातील नागरिक टॅक्स भरत असताना सुद्धा, त्यांना चालायला चांगले रस्ते व मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे आहे. निवडणुका झाल्या की, नगरसेवक निवडून येतील. या नगरसेवकांना निदान नागरिक जाब तरी विचारू शकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे घाणेरडे शहर असल्याची टीका केली होती. याबद्दल विद्या चव्हाण म्हणाल्या की, गडकरी हे नेहमी खरं बोलतात. यावेळी मोदी-शहा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर देखील त्यांनी टीका केली.

बुधवारी डोंबिवली येथे आयोजित ‘जन जागर यात्रा’ रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या गणेश नगर मधील संपर्क कार्यालयापासून महागाई आणि बेरोजगारी विरोधातल्या जन जागर यात्रेला सुरुवात झाली. ही रॅली डोंबिवली पश्चिम येथील नवापाडा, भोईरवाडी, सम्राट चौक, उमेश नगर, गुप्ते रोड, अशी काढण्यात आली होती. गुप्ते रोड येथे सायंकाळी यात्रेची सांगता झाली. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी चौक सभा घेऊन बेरोजगारी आणि महागाई विरोधात नागरिकांचे जन जागर करण्यात आले. या यात्रेस नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. या रॅलीदरम्यान ‘महंगाई कम करो, मोदी-शहा होश मे आओ, शिंदे-फडणवीस होश मे आओ’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.

दि.बा. पाटील जयंतीदिनी शेतकऱ्यांच्या आत्मदहनाचा निर्णय कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी आज आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन तूर्तास पुढे ढकलले आहे. सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने सोनारपाड्यातील शेतकऱ्यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी १३ जानेवारी रोजी उपासमारीमुळे सहकुटुंब आत्महत्या करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

शेतकऱ्यांच्या आत्मदहन करण्याच्या इशाऱ्याची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा व आत्मदहनापासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली. त्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.

तर शेतकऱ्यांची मागणी शासनाकडे पोहोचवण्यासाठी तहसीलदारांची भेट घेतली असून तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मिळून महसूल मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

यावेळी बैठकीला सोनारपाडा येथील शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, शिवनाथ म्हात्रे, हरिदास जोशी, ज्ञानदेव ठाकूर, सोपान ठाकूर, गणपत केणे, रवींद्र म्हात्रे, दिलीप ठाकूर यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.