Home Blog Page 52

सोनारपाड्यातील शेतकऱ्यांचा लोकनेते दि.बा. पाटील जयंतीदिनी आत्महत्येचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने शासन प्रशासनाच्या संगनमताने संरक्षित कुळे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधकाम व्यावसायिकाला परस्पर जमीन विक्री केल्याने, उपासमारीची वेळ आल्याने सोनार पाडा (मौजे दावडी) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी मंत्रालय किंवा मुंबई भिक्षा सोसायटीच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

सोनार पाड्यातील शेतकरी व त्यांचे पूर्वज १९३२ पासून शेत जमिनी कसत आहेत. भात,भाजीपाला अशी तत्सम पिके घेत आहेत. असे असताना मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने आम्हां शेतकऱ्यांची कुठलीही विक्री परवानगी च्या विश्वासात न घेता ८० (८०.७१) एकर जमिनीची परस्पर विक्री केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भारतीय संविधान अनुच्छेद २१ चा भंग करून ही विक्री बांधकाम व्यावसायिक अजय प्रताप अशर आणि जतीन देसरिया यांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. तत्कालीन धर्मदाय आयुक्त एन.व्ही.जोशी यांना खोटी माहिती देऊन ही विक्री करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्तांच्या विक्री परवानगी मध्ये ते १ ते ७१ क्रमांकाच्या संरक्षित कुळांचा उल्लेख आलेला आहे. सदर जमिनीचे सातबारा आमच्या नावावर आहेत. पिकपाणी उतारे आहेत.अशाप्रकारे शेत जमीन विक्री करण्याचा बेकायदेशीर प्रकार हिंदुस्थानात प्रथमच झाला असावा.

आजपर्यंत शासनाच्या ५८ विभागात आमच्या केसेस आम्ही लढवित आहोत. निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या ‘मित्र’ संस्थेवर सरकारने बांधकाम व्यवसायिक अजय प्रताप अशर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी भावना झाल्याने, विधिमंडळाचे माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे की लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जयंतीदिनी आम्ही सोनारपाडा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत दहा दिवस रंगणार दोन लाख पुस्तकांचा आदान प्रदानचा भरगच्च शानदार सोहळा कार्यक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा ठरलेले ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यंदा दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करून जगभरात या शहरातील सोहळ्याचा विक्रम गाजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २० ते २९ जानेवारी या कालावधीत हा सोहळा आपल्या डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणात संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या शुभारंभाला प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, डोंबिवलीचे लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्या सर्व परिसराला यंदा एपीजे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

दहा दिवसांत माजी केंद्रीय लोकसभा स्पीकर सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सर्व उपक्रमात कल्याण-डोंबिवली महापालिका देखील यंदा सहभागी झाली असून ती एक जमेची बाजू आहे, ‘वाचाल तर वाचाल’ ही वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने आयुक्त चितळे यांनी या उपक्रमात महापालिका सढळ हस्ते सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी तातडीने वास्तू देऊन सहकार्याचा हात पुढे केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण हे तर ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतात. साहित्य टिकणे वाढीस लागणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशा नात्याने ते नेहमीच मदत करतात, या सोहळ्याला देखील त्यांनी भरीव अर्थ सहाय्य केले असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ हे या उपक्रमाचे सहआयोजक असल्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.

राष्ट्रपती महामहीम द्रौपदीजी मुर्मू मॅडम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

कॉफी टेबल बुक


यानिमित्त ‘फ्रेंड्स लायब्ररी’ एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, ‘आझादी के ७५ साल’ या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे.

या सर्व उपक्रमात प्रख्यात ‘एम्स हॉस्पिटल’ने हॉस्पिटल पार्टनर ही महत्त्वाची जबाबदारी उचलली आहे. डॉ.मिलींद शिरोडकर यांनी त्याबाबत पुढे येऊन या सोहळ्यात मोलाचे योगदान दिले आहे.

यानिमित्ताने शहरातील ३०हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.


पत्रकार परिषदेला मंत्री चव्हाण, महापालिका सिटी इंजिनियर रोहिणी लोकरे, वृंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, ललिता छेडा, प्रवीण दुधे, प्रभू कापसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

५ तोळे सोने असलेली ऑटो रिक्षात विसरलेली बॅग रिक्षावाल्याने केली परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील प्रवासी दिपाली राजपुतय या दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ‘श्रम-साफल्य बंगला’ ते डोबिवली स्टेशन मच्छीमार्केट असा प्रवास करत होत्या. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बँग रिक्षामध्ये राहीली आहे. त्यावेळी त्यांनी ताबडतोब रिक्षा स्टँण्डवर येऊन चौकशी केली. तेव्हा महात्मा फुले रोड रिक्षा स्टँण्डवरील रिक्षा चालक श्री.संतोष राणे, रिक्षा क्र. एमएच ०५ डीएल ४१८५ यांनी त्यांच्या रिक्षामध्ये शोध घेतला असता प्रवाशांची ५ तोळ्याचे दागिने असलेली बँग सापडली. त्यांनी ती बँग प्रवासी महिला यांना संपुर्ण दागिन्यासह प्रामाणिकपणे परत केली.

या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मंदार धर्माधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गित्ते यांनी रिक्षा चालक श्री.संतोष राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पतीला सोडून राहणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पतीला सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला उल्हासनगर हिल लाईन पोलिसांकडून दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्ती सोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध पोलीसांनी सुरु केला असता, दीड महिन्यानंतर पोलीसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. वैभव देवकाते असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

शेजाऱ्यांना आढळून आला मृतदेह

मृत महिला दोन महिन्यापूर्वी आरोपी प्रियकर वैभव सोबत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीतील भाड्याच्या घरात राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच मृतक महिला लक्ष्मीबाई मनोहर तायडे आरोपी वैभवकडे सतत लग्नाचा तगादा लावत होती. यामुळे दोघांमध्ये वादही होत होते. असाच वाद ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्याच पहाटेच्या सुमारास तिची चाकूने गळा चिरून घरताच निर्घृण हत्या केली गेली. सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात शेजाऱ्यांना आढळून आला. मात्र तिच्यासोबत रहाणारा वैभव पसार झाला होता.

आधी साडीने तिचा गळा आवळला, नंतर चाकूने  गळयावर केले सपासप वार

घरात खून झालेल्या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी हिललाईन पोलिसांना देताच पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. मृतदेहाच्या अहवालात आदी साडीने तिचा गळा आवळला नंतर चाकूने गळयावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून वैभवचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला.

औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर अटक

तपासा दरम्यान वैभव देवकाते हा याच भागातील एका बांधकाम साईटवर वाहनचालक असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी आरोपीची अधिकाअधिक माहिती गोळा करून त्याच्या शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ, गुन्हे प्रकटीकरणं टीमचे सुभाष घाडगे, बाबू जाधव, बडे आणि प्रमोद लोंढे या पोलीस पथकाची नेमकणूक करण्यात आली. मात्र आरोपी हा वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बद्दल असल्याने पोलीसांना गुंगारा देत होता. त्यातच पोलीस पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वैभव हा औरंगाबाद शहरात असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर वैभव देवकाते याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ह्या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण नाही; वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मकतेने विचार करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्य शासन मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याने संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याचे घोषित केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ऊर्जा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार भाई जगताप, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री फडणवीस म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. सर्व कायदेशीर आयुधे वापरून पॅरलल लायसन्स संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी) मध्ये आक्षेप मांडण्यात येईल. कंपनीवर होणारा परिणाम व ग्राहकांचे हित यावेळी प्राधान्याने मांडण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वीज कंपन्या अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून आर्थिक बळकटीकरणासाठीही ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात त्यांचे नक्कीच स्वागत करण्यात येईल. फ्रॅन्चायजी कुठे करायच्या याचा विचार होणे गरजेचे असते. फ्रॅन्चायजीचा उपयोग झाला पाहिजे. त्याद्वारे काही नवीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जास्तीची गुंतवणूक होऊन नव्याने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.