Home Blog Page 53

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ संचालित ‘जनगणमन’ शाळेच्या चिल्ड्रन्स स्मॉल सेविंग बँकेचे उद्घाटन उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या सहकार्याने ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ संचालित ‘जनगणमन’ शाळेच्या चिल्ड्रन स्माॅल सेविंग बँकेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या उद्घाटनाला माजी नगरसेवक विश्वनाथ राणे ‘जान्हवी मल्टी फाउंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव प्रेरणा कोल्हे, जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या जान्हवी कोल्हे, डोंबिवली युनियन बँकेचे व्यवस्थापक अवनीश कुमार, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात उपस्थित होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मंगल पांडे यांच्या ऐतिहासिक क्षणांचे भावनेने ओथंबून भरलेले नाट्य सादरीकरण केले. त्याला उपस्थितांकडून कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लहान मुलांमध्ये विशेषता, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता यावी. याकरिता प्रथमच जनगण शाळेमध्ये विद्यार्थी बँक, विद्यार्थ्यांनी सुरू केलेली व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन असलेली बँक सुरू करत असल्याबद्दल विश्वनाथ राणे आणि डॉ. कोल्हे यांनी युनियन बँकेचे आभार मानले. संचालक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही बँक निर्माण झाल्याने डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन आणि कौतुक राणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या बँकेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अवनिष कुमार यांनी सांगितले.

 

डोंबिवलीतील उद्योजकांना ‘महावितरण’ च्या नोटीसा; सुरक्षा अनामत रकमेविरुद्ध उद्योजकात संतापाची लाट..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील उद्योगक्षेत्रात कोरोना सारख्या भीषण महामारीनंतर आर्थिक बाजू कशी बशी सावरणाऱ्या डोंबिवलीतील उद्योजकांना महावितरणाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक ग्राहकांना सुरक्षा अनामत रकमेच्या लाखापासून ते कोटी पर्यंत आलेल्या नोटिसांमुळे उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खेळते भांडवल धोक्यात येण्याचा संभव असल्याचे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या ‘कामा’ या उद्योजकाच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कडून औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दिलेल्या नोटिसात उच्च दाब व जोडणीच्या ग्राहकांना सुरक्षा अनामत रक्कम देण्याच्या सूचना अचानक या नोटिसाद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळानंतर जड उद्योग, रसायन उद्योग, कापड उद्योग, तसेच लघुउद्योग, सूक्ष्म लघु उद्योग कोरोनाच्या महाभयंकर महामारीतून कसेबसे तगले आहेत. असं असताना आता डिसेंम्बर २०२२ पासून अशा प्रकारच्या नोटिसा उद्योजकांना ‘महावितरण’ कडून देण्यात येत आहेत. यामुळे अनेक उद्योजक आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्योजकांकडे असलेले खेळते भांडवल या नोटीसीतून देयक म्हणून आलेल्या रकमेसाठी भरले गेले तर उद्योग सुरू ठेवण्यासाठी भांडवल शिल्लक राहणार नाही. त्यामुळे उद्योग जोमाने कसा सुरू राहील ? याबाबत ‘कामा’ संघटनेचे कार्यकारी सदस्य उदय वालावलकर यांनी भिती व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील उद्योगांना आजतागायत अविरत आणि अखंडित वीज मिळाली नाही. कसेबसे उत्पन्न मिळवून देतात त्यांना लाखो करोडो रुपयांची अनामत रक्कमांची नोटीसा बजावण्यात काय हेतु आहे ? असा प्रश्न संघटनेच्या वतीने विचारण्यात आला असून, जग ‘हाय टेक’ तंत्रज्ञान अवलंबत असताना, महावितरण मात्र जुन्याच तांत्रिक पद्धतीने वीज वितरण करीत असल्याची खंत ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

 

दुतर्फा फुलझाडे बहरत एमआयडीसीतील रस्ते स्वच्छ होणार – उपायुक्त अतुल पाटील


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील ‘एमआयडीसी’ या औद्योगिक क्षेत्रातील अस्वच्छता आणि बकाल परीसर असल्याचा डाग आता पुसला जाणार आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने एक अभिनव संकल्प अभियान नव्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत परिसरातील रस्ते स्वच्छ होणार असून, रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे बहरणार आहेत. यासाठी येथील उद्योजक संघटना, औद्योगिक परिसरातील संस्था यांचे सहाय्य घेण्यात येईल असे पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले. या भागास भेट दिल्यानंतर त्यांनी या अभियानाची माहिती दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथील एमआयडीसी फेज मधील नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत संजय नगर – अभिनव शाळा हा रस्ता प्रामुख्याने सफाई साठी हाती घेण्यात आला आहे. प्रमोशन लॉज, साई पूजा लॉज, गणेश भुवन हॉटेल, संजय नगर जुना डम्पिंग ग्राउंड या भागात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे.

या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी जेसीबी आणि डंपर उपलब्ध केलेले आहेत. एक जानेवारीपासून या भागामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे योजना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले कि, डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज एक आणि फेज दोन मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे एक जानेवारीपासून येथे विशेष मोहीम पालिकेच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी स्वतंत्र जेसीबी, डंपर उपलब्ध करून देण्यात आले. एमआयडीसी परिसरात सुमारे साडेपाचशे औद्योगिक कारखाने आहेत. त्या कारखान्यांना आणि येथील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये. आपला परिसर स्वच्छ राहावा यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे संस्था संघटनांना आवाहन आहे. या परिसरातील स्वच्छते सोबत रस्ते सुशोभित करणे गरजेचे आहे फुलझाडे, ग्रीन बेल्ट रस्त्याच्या किनाऱ्याला करण्याची योजना आहे. ‘कामा’ संघटनेला सुद्धा महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येथे अनेक कारखाने असल्यामुळे महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

सहाय्यक आयुक्त भरत पवार, उपमुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी संदीप किस्मतराव, तसेच स्वच्छता निरीक्षक जयंत गाडे, अनिकेत धोत्रे आणि पालिकेचे कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे साफसफाई चे काम जोमाने सुरू आहे. ‘कामा’ या उद्योजकांच्या संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांची पालिका अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर पालिकेकडून अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर, ‘कामा’ संघटनेच्या वतीने पालिकेला पूर्ण सहकार्य केले जाईल असे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले, मात्र स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यानंतर पालिकेने देखभालीची जबाबदारी पूर्ण करावी अशी अट ‘कामा’ संघटनेच्या वतीने घालण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

दोन घरफोडीत चोरट्यांनी केला पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरफोडी प्रकरणी गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना जुने नाशिक येथील काझीगढी भागात घडली. छाया ओमप्रकाश सोनार (राहणार: शितळादेवी मंदिराजवळ, काझीगढी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनार कुटुंबिय सोमवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत व कोठ्यांमध्ये ठेवलेली रोकड, सोनसाखळी व मोबाईल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

दुसरी घटना गंगापूर रोड भागात घडली. संदिप निवृत्ती गिते (राहणार: अतुल अपार्टमेंट, नवरचना स्कूल नर्सरीरोड, सावरकर नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिते कुटुंबिय ३१ डिसेंबर निमित्त बाहेर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गिते याच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे ९६ हजार २०० रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात मंगळसुत्र आणि कानातील टॉप्सचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.

 

राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीच्या रमेश तोमर यांनी पटकावले तृतीय पारितोषिक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीतील ‘फ्लेक्स जिम’ चे ४५ वर्षीय रमेश तोमर यांना तृतीय पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे पार पडली ज्याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. या स्पर्धेत १२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

किशोर शेट्टी यांच्या ‘फ्लेक्स जिम’ मध्ये रमेश तोमर गेली १६ वर्ष सलग सराव करीत आहेत. ‘ठाणे श्री’, ‘महाराष्ट्र श्री’, किताबाचे ते मानकरी ठरले असून, देशपातळी वरील ‘भारत श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी त्यांची जोमाने तयारी सुरु आहे.

या स्पर्धेच्या तयारी करिता त्यांना त्यांच्या नियमित आहारात दररोज सव्वा किलो चिकन,२० अंडी, प्रोटीन, मल्टी व्हिटॅमिन, मास्याचे तेल, कॅल्शियम, सफेद तांदूळ, ओट्स, मध, जाम याचा समावेश करावा लागत असून त्याकरिता त्यांना दरमहा दीड लाख रुपये खर्च असून ते या स्पर्धेची तयारी करत असून ‘फ्लेक्स जिम चे किशोर शेट्टी हे त्यांचे प्रशिक्षक असून त्यांच्याकडून प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांच्या पत्नी कडून वेळोवेळी मिळणारा योग्य व पुरक आहारामुळे या स्पर्धेत मानकरी ठरलो आहे अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. मसालेदार व चमचमीत आहार न घेता ते फक्त उकडलेले अन्न प्राशन करून ते महत्वाच्या डाएट वर भर देत असल्याचे बोलले. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत त्यांना आतापर्यंत मिळाली नसून त्याबद्दल त्यांनी प्रसिद्धी माध्यामांसमोर खेद व्यक्त करत स्वखर्चाने ते या स्पर्धेचे तयारी करत असल्याचे सांगितले.

रमेश तोमर हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून ते या स्पर्धेसाठी सकाळी ४ ते ६ या वेळेत कारडीओ व एब्स आणि ११ ते ४ वर्कआऊट असा सराव करत आहेत. १९९८ मध्ये झालेल्या ‘डोंबिवली मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये रमेश तोमर यांनी १० किलोमीटर शर्यतीत भाग घेत ही शर्यत ३३ मिनिटं १२ सेकंद एवढ्या कमी वेळेत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला होता. भाजप डोंबिवली पूर्व मंडल उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी रमेश तोमर यांचे अभिनंदन करुन ‘भारत श्री’ स्पर्धेच्या किताबासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.