Home Blog Page 55

‘नववर्षाचे स्वागत करताना व्यसनापासून दूर रहा’; वाहतूक वपोनि उमेश गीत्ते यांचे नागरिकांना खुले आव्हान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नववर्ष २०२३ स्वागताचा पूर्वसंध्येला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून राबवल्या जाणाऱ्या ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देताना डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांनी नागरिकांना वरील आव्हान केले .
दारू पिऊन अथवा कुठलीही नशा करून नववर्षाचे स्वागत करून नका. कुठलंही व्यसन करून वाहने चालवू नका, यात तुमच्याच जिविताला धोका संभवतो. ‘ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह’ विरुद्ध ची कारवाई वाहतूक पोलीसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठीच करावी लागते, अशावेळी वाहतूक विभागावर प्रचंड ताण पडतो, अशी चिंता त्यांनी बोलताना व्यक्त केली.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या पुरोगामी विचारांच्या संकल्पनेतून राबवला जात असलेल्या ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा’ अश्या व्यसन विरोधी उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाला डोंबिवलीतील नागरिकांनी प्रचंड व मोठ्या उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला. दूध वाटून, व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करित नववर्षाचे स्वागत करतानाच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित श्री दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका युवकांना भेट देण्यात आल्या.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, काँग्रेस यांच्यासह विविध संस्था आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून या व्यसनविरोधी उपक्रमाला पाठिंबा दिला.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, महाराष्ट्राचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. नंदकुमार धुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. सुशील सामंत, सीपीआयचे कॉम्रेड अरुण वेळासकर, अंनिस ठाणे शाखेचे विजय मोहिते, डोंबिवली शाखेचे नितीन सेठ, उदय देशमुख, संध्या देशमुख , शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, विद्याधर राणे, एलन क्लासचे चीफ श्री गणेश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील फलदेसाई, मंगेश जाधव इत्यादी सहकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शवून सर्व नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

डोंबिवली स्टेशन जवळील राजाजी पथ येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे युवकांनी आणि स्त्रियांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. दुधाचा ग्लास देवून, नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अशा स्तुत्य उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. प्रवीण देशमुख यांनी समस्त नागरिकांना केले.

 

पंतप्रधान मोदींना मातृशोक: हिराबेन मोदींचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत. “मी तिला १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, बुद्धीने काम करा आणि शुद्धपणे आयुष्य जगा,” असंही मोदींनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘यू एन मेहता’ रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘यू एन मेहता’ रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.


हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे सातत्याने चर्चेत असतात. नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वस्व झोकून देऊन दिवसरात्र काम करतात, असे त्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने सांगितले जाते. मोदींच्या याच गुणाचा प्रत्यय शुक्रवारी देशवासियांना आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी साधारण सहाच्या सुमारास ट्विट करुन आईच्या निधनाबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर नरेंद्र मोदी आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अहमदाबाद येथील आपल्या भावाची घरी पोहोचले. येथून सकाळी आठच्या सुमारास हिराबेन मोदी यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर तास-दीड तासात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. आईच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करतील, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु, नेमक्या याचवेळी नरेंद्र मोदी यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी हे आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा देशसेवेसाठी रुजू झाले.

‘एसएससी’ व्याख्यानमाला मार्गदर्शिकेत दहावीचे वर्ष भविष्याच्या दृष्टीने करिअरला वळण देणारे; हभप प्रकाश महाराज यांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या नियोजन तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने गेली चोवीस वर्ष सातत्याने आयोजिले जात आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे त्यांच्या करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे असे हभप प्रकाश महाराज यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शुभारंभी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या शुभारंभाप्रसंगी हभप हनुमान महाराज, प्रकाश म्हात्रे, रतन म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, मुकेश पाटील, प्रेमा म्हात्रे, डॉ.सुनिता पाटील, अरुण पाटील, गजानन म्हात्रे, रघुनाथ पाटील, केशव पाटील, व्याखाते व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रकाश म्हात्रे म्हणाले कि, हि व्याख्यानमाला यंदा ‘रौप्य महोत्सवी’ वर्षात पदार्पण करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली अभ्यासाबाबत भिती, दडपण या मार्गदर्शिकेमुळे कमी होईल. या व्याख्यानमालेत उपस्थित राहून, अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करा. तर हभप प्रकाश महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. प्रत्येक वर्षी हि व्याख्यानमाला वुंध्दीगत होत आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

गुरुवार २९ ते ३१ डिसेंबर पर्यंत या व्याख्यानमालेत विविध शाळेतील तज्ञ शिक्षक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. कल्याण डोंबिवलीतील तेरा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थी यात सहभागी झाले असून, या विद्यार्थ्यांची दुपारच्या भोजनाची सोय भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे आणि सचिव पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

“मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय”,अजित पवारांचा बावनकुळेंना टोला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माझ्या बारामती दौऱ्यामुळेच अजित पवार इतके प्रभावित झाले की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले, कोण कोणाचा योग्य कार्यक्रम करणार, हे जनता २०२४ मध्ये सांगेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

एक दिवसापूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या बारामती दौऱ्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. आमच्या सर्वांची झोप उडाली आहे. मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणाऱ्या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे असे वाटते.” असे अजित अजित पवार प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाले.

 

महिलेच्या गर्भाशयातील २.२५ किलो वजनाच्या १४ फायब्रॉइड्स काढण्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना यश!

मिरारोड, प्रतिनिधी: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ रचना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमला 39 वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून 2.25 किलो वजनाचे फायब्रॉइड काढण्यात यश आले आहे.

गर्भाशयात असलेल्या विविध आकाराच्या अनेक फायब्रॉइड्समुळे आणि गर्भाशयाच्या अवयवाची रचना विकृत झाल्यामुळे रुग्णाला मासिक पाळीत असामान्य रक्तस्त्रावाची तक्रार होती. तिला भविष्यात तिला गर्भधारणेत अडचणी येणार नाही याची देखील पुरेपुर खबरदारी घेण्यात आली.

महिला रुग्ण आयुषी मेहरा (नाव बदलले आहे) ही एक गायिका आहे तिला मासिक पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव, वेदनादायक पाळी अशा तक्रारी होत्या. वेदना वाढत गेल्याने तिची प्रकृती ढासळू लागली आणि तिच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ लागला. रुग्णाला वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरारोड येथे पाठवण्यात आले जेथे तिला त्वरित वैद्यकीय मदत मिळाली.

फायब्रॉइड्समुळे महिलेचे पोट गर्भवती स्री सारखे दिसू लागले होते.

डॉ. रचना शर्मा सांगतात गर्भाशयातील फायब्रॉइड्स ही एक अशी स्थिती आहे जिथे स्त्रीच्या गर्भाशयात कर्करोग नसलेल्या गाठी दिसून येतात. उपचार न केल्यास, ते आकाराने मोठ्या होतात आणि मूत्राशय आणि आतड्यांसारख्या आसपासच्या अवयवांवर दबाव टाकतात. फायब्रॉइड सामान्यतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतात. स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेकदा गंभीर गुंतागुंत निर्माण होते.

या रुग्णाला काही वर्षांपासून मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होत होत्या. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे मोठे फायब्रॉइड दिसले, सर्वात मोठे 12″-13″ होते. तिला प्रथम मायोमेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता, म्हणजे प्रजननक्षमतेला हानी न पोहोचविता फायब्रॉइड्स काढून टाकणे.

डॉ रचना पुढे म्हणाल्या, आम्ही प्रसंगावधान राखुन या शस्त्रक्रियेचे नियोजन केले. सहसा अशा मोठ्या फायब्रॉइड्ससह, संपूर्ण गर्भाशय काढून टाकले जाते, कारण यात गर्भाशयाला वाचवणे आव्हानात्मक ठरते. परंतु रुग्णाला भविष्यात गर्भधारणा करायची असल्याने ते आव्हान पेलत तिचे गर्भाशय वाचविण्यात आले. सोनोग्राफीमध्ये 9 मोठ्या आकाराचे फायब्रॉइड आणि इतर लहान फायब्रॉइड्स दिसून आले. आम्ही एकूण 14 फायब्रॉइड्स काढले ज्यांचे वजन सुमारे 2.25 किलो होते.

आम्ही एकाच चीराद्वारे शक्य तितक्या फायब्रॉइड्स काढल्या, कारण गर्भाशयावर अधिक चीरे तिच्या भावी गर्भधारणेसाठी धोकादायक असतील. ही मोठी शस्त्रक्रिया असल्याने ती पूर्ण होण्यासाठी ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. एनेस्थेसिया देत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला आणि 36 तासांनंतर आहाराचे सेवन केले. वोक्हार्ट हॉस्पिटल्स मिरारोड येथील “ममा केअर” युनिट कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला योग्यरित्या हाताळून सर्व सुविधांनी सुसज्ज आहे.

“माझ्या शरीरात अनेक फायब्रॉइड्स वाढत आहेत हे मला माहीत देखील नव्हते. मला क्रॅम्पिंग, वेदनादायक मासिक पाळी आणि असामान्य मासिक रक्तस्त्राव होत होता. माझे शरीर फुगले होतो आणि असह्य वेदना होत होत्या. गर्भाशयात तब्बल 14 फायब्रॉइड्स असल्याचे समजल्यावर मला धक्काच बसला. यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल मी वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानते. माझ्यासाठी हा एक चमत्कारच होता कारण डॉक्टरांनी माझ्या गर्भाशयाचे रक्षण केले. मला आनंद आहे की मला नवीन आयुष्य मिळाले आहे,” असे सांगून रुग्ण आयुषी मेहरा (नाव बदलले आहे) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.