Home Blog Page 54

महापालिकेच्या नवीन रस्ता कर आकारणीला काँग्रेसचा विरोध

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचा कालावधी संपलेला असून महासभा आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना महापालिकेवर प्रशासक म्हणून कार्यरत असलेले दिलीप ढोले यांनी आपल्या मनमर्जीने सर्वसामान्य जनतेवर नव्याने ‘रस्ता कर’ लावण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून करदात्या नागरिकांवर नवा आर्थिक भुर्दंड लावणे अयोग्य असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक पदाचा कालावधी संपल्याने राज्यशासनाने प्रशासकीय राजवट लावली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात अनिश्चितता आहे, त्यात प्रशासकीय राजवटीत प्रशासक या नात्याने आयुक्तांकडून करवाढी सारखे जन विरोधी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून कित्येक भागात सुविधा न देता अनेक वर्षांपासून मलप्रवाह कर वसूल केला जात आहे, त्यात शहरातील मलनिस्सारण केंद्र प्रक्रिया अभावी (एस. टी. पी. प्लांट) बंद अवस्थेत आहेत. याबाबतीत जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना निवेदनही दिले होते, युवक काँग्रेसने जन आंदोलन करून सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागणे यांनी केला आहे.

दरम्यान राज्यसरकार व पालिकेचा असे दोन दोन प्रकारचे शिक्षण कर वसूल करूनही पालिका शिक्षणाचा दर्जा सुधारलेला नाही. सुविधा देणार नसाल तर मग जनतेने कर का भरावेत असा सवाल नागणे यांनी केला आहे. शहरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांची वाट लागलेली असताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपयांची टेंडर काढून उधळपट्टी केली जात आहे.

या प्रशासक दिलीप ढोले यांनी तात्काळ हा निर्णय रद्द न केल्यास शहरातील जनतेवर लादण्यात येणाऱ्या या अन्याय्य रस्ता कर (रोड टॅक्स) आकारणी विरोधात मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा मिरा भाईंदर शहरातील काँग्रेस पक्षाने दिला आहे.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे संपूर्ण नाव एड्‌सन आरेंटीस डू नाशसिमेंटू असे होते. त्यांचा जन्म ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात झाला, लहानपणापासून त्यांना फुटबॉलची आवड होती. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. जगभरचे चहाते त्यांना ‘किंग’ पेले किंवा ‘ब्‍लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले.

पेले यांची एकूण गोलसंख्या

१,३६३ सामान्यांत १,२८१ एवढी होती. १ ऑक्टोबर १९७७ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी पेले फुटबॉल खेळातून निवृत्त झाले.

 

अनिल देशमुखांच्या भेटीला संजय राऊत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले, “अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जिवनात आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं आहे. त्यांनी विदर्भातेच नेतृत्व केलं आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांच्यावर माझ्यावर तसंच नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे, यावरून मनी लॉंडरिंग कायद्याचा कशा पद्धतीने गैरवापर होतो आहे, हे दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“काल शरद पवार यांनीही सांगितलं की आमच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा होतो, त्याच उत्तम उदाहरण आहे. शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही घरी पोहोचलो आहे”, असेही ते म्हणाले.

“या देशातील न्यायवस्थेत असे काही रामशास्री आहेत. ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुखांना जामीन देताना उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणं फार गंभीर आहेत. माझ्या जामीनाच्या बाबतीतही सत्र न्यायालयाची निरीक्षणं अत्यंत गंभीर आहेत. अशा वेळी ज्या तपास यंत्रणांनी चुकीची कारवाई केली, राजकीय सुत्रधार म्हणून ज्यांनी काम केलं. त्यांच्या भविष्यात कारवाई नक्कीच होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

ही तर हिऱ्यापोटी निपजली गारगोटी, त्यांची अंडी पिल्ली आमच्याकडे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे, आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत, अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, ते विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते.

ठाकरे शिवसेना गटाचा समाचार घेताना ते म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारा सोबतच प्रबोधनकरांच्या विचारांना ही तिलांजली दिली, आम्हाला अनेक प्रकारे हिणवलं गेलं, मात्र बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली कामं करतो म्हणूनच गोविंद बागेत न जाता रेशीम बागेत गेलो असे सांगत ज्यांना अंडी पिल्ली माहीत आहेत त्यांना हिम्मत दाखवण्याची भाषा केली जात आहे अशी टीका त्यांनी केली.
आम्ही कोरोनात पीपीई कीट घालून रुग्णालयात फिरलो, पूर्वी लाठ्या काठ्या खाल्ल्या, आम्हाला आव्हान देऊ नका, तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी शिवसेना प्रमुखांना तुरुंगात टाकणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ही तर हिऱ्यापोटी निपजलेली गारगोटी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाल वीर दिवस साजरा करायला गेलो तर टीका केली, हा शीख धर्मीयांचा आणि बलिदान करणाऱ्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कायम वंदनीयच आहेत आणि राहणार, मात्र त्यांच्या वारसांकडे पुरावे कोणी मागितले, छत्रपती संभाजीराजे यांच्या कडे उमेदवारी साठी प्रतिज्ञापत्र कोणी मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान कोण करतो, याबद्दल का बोलत नाही असे खडा सवाल त्यांनी केला.

महात्मा फुले दाम्पत्याचे तैलचित्र आम्हीच मंत्रालयात लावले, त्यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्यात करण्याचे काम सुरू आहे, बाळासाहेबांचे तैलचित्र विधिमंडळात लावले, वडुजला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करू, प्रताप गडावरील अतिक्रमण हटविले तसेच पंढरपूर कॉरिडॉर चे काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, पत्रकार अर्णव गोस्वामी, राहूल कुलकर्णी , अभिनेत्री कंगना राणावत, आमदार रवी राणा, खासदर नवनीत राणा यांच्या वर केलेल्या कारवाया , षडयंत्र याबद्दल काय, आम्ही सहन करतो म्हणून काहीही बोलाल का ? आम्हीही खस्ता खाल्ल्या आहेत, घरा दारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करतोय, तोंड आहे म्हणून काहीही बोलायचं हे चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.

हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल आणि जनतेची कामं पूर्ण ताकदीने करेल, पुढच्या वेळेस संपूर्ण ताकदीने पुन्हा निवडून येऊ, लोकायुक्त विधेयक मंजूर करून आम्हीच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले,
आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करीत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करता आलं पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करतो आहे, महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कारवाई साठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सत्तर हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल, दोन तीन महिन्यात मोठे उद्योग इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत , मात्र येणाऱ्या उद्योगांकडे टक्केवारी कोणी मागितली, उद्योगांचे प्लॉट परावर्तीत कोणी केले याची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केले.

 

१०७ बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण-डोंबिवली शहर; वाचा सविस्तर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वर्षभरात १०७ बालात्काराच्या घटनेने कल्याण-डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर कायद्यासह अनेक पथके स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही महिलांना “पावला पावलावर असते भय, आणि सरकारनं म्हणे केली संरक्षणाची सोय’ असा अनुभव कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळाला आहे. खळबळजनक बाब म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून गेल्यावर्षी १८ वर्षाखालील ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तिच यंदा ५८ झाली आहे. तर १८ वर्षावरील महिलांवर अत्याचार मध्ये गेल्यावर्षी ३६ तर यंदा ४९ गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे.

विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ

१०० टक्के गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी केला असला तरी महिला कल्याण-डोंबिवली शहरात सुरक्षित नसल्याचे यावरून दिसून येते. तर विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ झाली असून गेल्यावर्षी १२० गुन्हे नोंद होते, त्यातील १११ गुन्ह्यांची उकल झाली होती. यंदा १८० विनयभंगाचे गुन्हे दाखल असून १७४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये १८ वर्षावरील गुन्हे जास्त आहेत.

अपहरणाच्या घटनां २२४ च्या घरात

अपहरणाच्या घटनां मध्ये देखील यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी १५४ घटना अपहरणाच्या नोंद झाल्या होत्या यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा २२४ च्या घरात गेला आहे. १८ वर्षांखालील मुलींचे अपहरणमध्ये १४५ घटना नोंद झाल्या आहेत, तर मुलांंमध्ये ७३ घटना नोंद आहेत. १८ वर्षांवरील मुली १ तर मुलांच्या ५ घटनांची नोंद आहे. या गुन्ह्यांची देखील ८० टक्के उकल पोलीसांनी केली आहे.

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत

कल्याण-डोंबिवली शहरात वाढती गुन्हेगारी पाहता, पोलीसांनी कल्याण डोंबिवलीतील १२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सराईत १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खेमा गँग, कल्याण पूर्व अभिजित कुडुलकर गॅंग, डोंबिवलीतील वांग्या गॅंग व सोनसाखळी चोरी करणाऱ्या ८ इराणी गॅंगचा समावेश आहे.

पोलीसांच्या आरोग्यावर ताण

कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत ८ पोलीस ठाणे आहेत. परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा पोलीसांनी अहोरात्र प्रयत्न केला आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या विचारात घेता या पोलीस ठाण्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.परिणामी गुन्ह्यांचा तपास, नाकाबंदी, व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न, १२ ते १४ तासांची ड्यूटी, रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा घेता येत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही. अशा ताण-तणावाने पोलीसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलीसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.

३ हजारच्या आसपास गुन्हे दाखल

कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत २०२२ मध्ये अखेरपर्यंत जवळपास ३ हजारच्या आसपास गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलीसांची उल्लेनीय कामगिरी आणि सीसीटिव्हीच्या स्मार्टनेसपणामुळे शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ८० टक्के आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे १०० टक्के उघडकीस आले आहेत. कल्याण-डोंबिवलीत यंदाच्या वर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८० टक्के महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण पाहता बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे देखील १०० टक्के उघडकीस आले आहेत.१२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली गेली आहे, तर एमपीडीए अंतर्गत नऊ जणांवर कारवाई केली आहे. तर १०० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे, अशी माहिती झोन-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

सीसीटीव्हीचा स्मार्टनेस आला उपयोगी

कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच अनेक दुकाने आणि सोसायटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. शहरात सुमारे १ हजारांच्या वर सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यामुळे एखादा गुन्हा घडला, तर त्या आरोपीला पकडण्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज हा मोठा दुवा ठरत असल्याने पोलीसांनी सांगितले.

दाखल तसेच उघड झालेले गुन्हे            2022                             –                      2021
गुन्हे दाखल/उघड                        –                 दाखल/उघड

खून                                                  18/18                             –                     19/18

खूनाचा प्रयत्न                                     22/22                             –                     17/17

दरोडा                                                 1/1                                 –                      0/0

जबरी चोरी                                      140/117                              –                  101/66

घरफोडी                                          154/93                               –                   170/67

चोरी                                                 616/311                             –                   611/242

वाहन चोरी                                        381/176                             –                  390/147

दुखापत                                             399/383                            –                  366/359

बलात्कार                                           107/107                            –                    84/83

विनयभंग                                           180/174                             –                  120/111