Home Blog Page 56

कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार – खासदर श्रीकांत शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार आहे. डोंबिवली पश्चिम येथे पांडूशेठ बाळा जोशी चौक ते जुनी डोंबिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण उद्घाटनाप्रसंगी कल्याण-डोंबिवकीचे लोकप्रिय खासदर श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.

डोंबिवली पश्चिम येथील पांडूशेठ बाळा जोशी चौक ते जुनी डोंबिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण तब्बल १३.५० कोटी निधी उभारण्यात आले आहे. हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून उपलब्ध केला गेला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी सांगितले. त्यामुळे प्रवास सुकर होऊन प्रवाश्यांच्या वेळ देखील वाचणार आहे. खासदर श्रीकांत शिंदे यांनी बोलताना या रस्त्या बरोबर माणकोली उड्डाणपुला मार्गे टिटवाळा परिसर जोडण्याचा आपला मानस असल्याचे सांगत त्यासाठी एमएमआरडीए कडून निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक रणजित जोशी, दिपेश म्हात्रे, शशिकांत कांबळे, भाऊ चौधरी व इतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

‘३२ वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं’, आदित्य ठाकरेंच्या विधानावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशात एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशाच्या मृत्यूप्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप शेवाळेंनी केला. यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली.

या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. “एका ३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहेत. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं,” असं विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी केलं होतं.

आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला आदित्य ठाकरेंवर बोलण्याची काहीही गरज नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसैनिक आहोत. आदित्य ठाकरेपेक्षा माझ्या मुलाचं वय जास्त आहे,” असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.

आधी चौकशी होऊ द्या की थेट फाशी लावणार- गुलाबराव पाटील

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी गायरान जमिनीच्या घोटाळ्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधीपक्ष सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते ठीक आहे. पण याची तुम्ही पहिली चौकशी करणार की नाही? की थेट फाशी लावणार… आधी चौकशी करा. चौकशीत तथ्य आढळलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यासाठी सरकारचं काम बंद पाडायचं आणि लोकांना मिळणारा न्याय मिळू द्यायचा नाही, ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही,” अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.

 

कर्जत – जामखेड तालुक्यात होणार औद्योगिक वसाहत; उद्योगमंत्र्यांची विधानसभेत माहिती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कर्जत-जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करू, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. उदय सामंत उत्तर देत होते.

यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २९३ औद्योगिक क्षेत्र विकसित केली असून महामंडळामार्फत विविध आकाराचे ८६ हजार ४१७ भूखंड आखण्यात आले आहेत. यापैकी ६२ हजार ३१७ औद्योगिक, ६ हजार १४४ व्यापारी व ४ हजार ५७ निवासी भूखंडांचे वाटप करण्यात आले आहेत. मौजे पाटेगाव व खंडाळा येथील औद्योगिक वसाहतींबाबत उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी सांगितले. याबाबत राज्य शासन सकारात्मक असून राज्यात विविध उद्योग यावेत, हीच शासनाची भूमिका आहे. मात्र, कायदेशीर तरतुदी तपासून निर्णय घेणार असल्याचे, मंत्री श्री. उदय सामंत यांनी स्पष्ट केले. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.

 

दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोनसाखळी केली लंपास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक येथील लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (वय: ७० वर्षे) राहणार साईशांती भवन, लॅमरोड यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिला अग्रवाल या रविवारी सायंकाळच्या सुमारास शेजारी राहणाऱ्याच्या घरी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने त्या पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोपेड दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळयातील वजनी पॅण्डल असलेली सोनसाखळी असा सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. याचा अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.

 

आदित्य ठाकरे आक्रमक; भाजप नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
समजते.

दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केलं जात आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांकडून जबाबदार धरले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता ते आरोप करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसते. ते आता याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं समोर आलं आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सत्ताधाऱ्यांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून ते दिशा सालियान प्रकरणात त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहेत.

“एका ३२ वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी लक्ष करण्यात आलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील एयू नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियान प्रकरणाची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेही आता आक्रमक झाले असून त्याकरिता कायदेशीर सल्ला घेत आहेत.