Home Blog Page 58

तुमच्या ईपीएफ संबंधित ईपीएस ९५ खात्याचा आर्थिक लाभ कसा घ्यावा ? ‘ईपीएफओ’ने दिली माहिती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  तुम्हीही ईपीएफओ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ईएफआयएफओ खातेदारांच्या हितासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत असून अनेक योजना चालवत आहे. नोकरदार आणि पगारी वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि संकटाच्या काळात या योजना अतिशय उपयुक्त ठरतात. ईपीएफओचे सध्या देशभरात सहा कोटीहून अधिक ग्राहक आणि ७५ लाख पेन्शनर लाभार्थी आहेत. ईपीएफओ खातेधारकांसाठी कामगार मंत्रालय ईपीएस-९५ नावाची योजना चालवत आहे. या (ईपीएस) अंतर्गत खातेदारांना किमान महिन्याचे पेन्शन मिळते. ईपीएफओने ट्विट करून आपल्या खातेदारांना या योजनेची माहिती दिली आहे.
  पेन्शन संस्थेच्या म्हणण्यानुसार, ईपीएस-९५ योजनेत खातेदार तसेच त्यांच्या विधवा पुरुष किंवा महिला तसेच मुलांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या खातेदाराचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारास किमान १००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. पेन्शनर पेन्शनर असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारालाही संरक्षण दिले जाते. याअंतर्गत पेन्शनधारकाला मिळणाऱ्या पेन्शनपैकी निम्मे म्हणजे ५० टक्के रक्कम विधवा स्त्री किंवा पुरुषाला दिली जाते.
  एवढेच नव्हे तर खातेदाराच्या मृत्यूवर खातेदाराच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनच्या २५ टक्के इतकी रक्कम दोन मुलांना मिळते. दोन्ही मुलांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत २५-२५ टक्के इतकी समान रक्कम मिळते. या योजनेचे संपूर्ण नाव ‘कर्मचारी पेन्शन योजना-१९९५’ असे आहे. १९९५ मध्ये ही योजना सुरू झाल्यामुळे ईपीएफओ योजनेचे नाव ईपीएस-९५ ठेवण्यात आले होते.

 

 

आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे ठाण्यातील नेते आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

दम्यान, मुलाखतीत आरोप करताना निलेश राणे म्हणाले, ‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना नेहमीच एक मर्यादा पाळली होती. आम्ही याआधी बाळासाहेब ठाकरेंवर केव्हाही आरोप केले नव्हते. आमच्या राणेसाहेबांचं आज सुद्धा बाळासाहेबांवर प्रेम होतं, परंतु स्वतः ते कधीच व्यक्त करु शकले नाहीत. मी त्यांना राणे साहेब बोलत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला सुद्धा बाळासाहेबांची खरी परिस्थिती सगळ्यांना सांगावीच लागेल.

ठाण्यातील तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते धर्मवीर आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू इस्पितळात झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र हे २ शिवसैनिकांना अजिबात सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा देखील आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी काय दाबली गेली ? असे अनेक सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे. तसेच मी स्वतः आजपर्यंत खूप मर्यादा ठेवल्या होत्या परंतु, जर राणेसाहेबांवर कोणी खालच्या पातळीचे माणून आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल तर आपण हे सहन करणार नाही असे सुद्धा त्यांनी ठणकावले. कारण माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली, परंतु विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती अजिबात पाळली नाही असे निलेश राणे म्हणाले.

तसेच बाळासाहेबांना बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला देखील ठार करायचे होतं. तसे अनेक वेळा प्रयत्न सुद्धा झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय ? हे तुम्ही मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व जाहीरपणे सांगेन. त्यामुळे आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं महाराष्ट्र विधानसभेतून निलंबन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं महाराष्ट्र विधानसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्यासाठी अपमानजनक शब्द वापरल्याप्रकारणी जयंत पाटील यांचं आज निलंबन करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. “माझी विनंती आहे की आपण फक्त भास्कर जाधव यांना थोडं बोलण्याची परवानगी द्यावी. तिकडच्या १४ लोकांना बोलायची परवानगी दिली. मी इकडनं एकटा बोललो आहे. सभागृहं असं कसं चालवताय तुम्ही ? आज फक्त भास्कर जाधवांना बोलू द्या म्हटलं तर तुम्ही ऐकत नाही विरोधी पक्षाचं. तुम्हाला सभागृह चालवायचं नाही का ? अख्खा विरोधी पक्ष म्हणतोय की एका भास्कर जाधवांना बोलू द्या. ही आमची विनंती आहे”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू दण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. भास्कर जाधवांनीही तशी मागणी करायला सुरुवात केली.”आमची हरकत आहे. १४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केलं. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय”, असं भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान, याचवेळी जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असं म्हटलं. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केलं. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका आस्थापनेवरील 21 कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत शिपाई, मजूर, शिपाई तथा सफाई कामगार, रखवालदार, सफाई कामगार अश्या 21 कर्मचाऱ्यांना अखेर लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे आपला पदभार सांभाळत उत्कृष्ट कामगिरी करत असताना हे कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतिक्षीत होते.

महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 25% होते. सदरची बाब मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी लक्षात घेत शासनाच्या मंजुरीने पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण 40% करून एका अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली त्यामध्ये सुनिल राठोड, तुकाराम तळपे, श्रीकांत धिवर, सतीश सुळे, प्रवीण गढरी, समीर भोपतराव, भारती सानप, संतोष तिटमे, सुजित घोणे, कुणाल म्हात्रे, फिरोज तडवी, सचिन गोसावी, योगेश चौधरी, दिपक मोहिते, राकेश गायकवाड, दक्षता केंजळे, प्रविण दिवे, नितीन बर्नवाल, आत्माराम तुंगार, माधव होकारणे, ललिता जोजारे या कर्मचाऱ्यांना लिपीक टंकलेखक या पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांनी ही पदोन्नती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने व्हावीत या हेतूने आयुक्त यांनी ही पदोन्नती दिली असून त्या सर्व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून जनतेची कामे इमानेइतबारे केली जातील अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीचे रहिवासी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख आणि नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांची बुधवारी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली. संजय राऊत यांचे खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊंची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांचे खास समर्थक म्हणून मागील अनेक वर्षापासून भाऊ चौधरी यांची ओळख होती. राऊत यांचा आश्रय आणि आशीर्वादाने भाऊ चौधरी यांनी शहरप्रमुख, पालिका निवडणुकीतील उमेदवारी ते नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. कोणतेही संघटन कौशल्य, जनसंपर्क नसलेला आणि सामान्य शिवसैनिकाला मानाची पदे देण्यात आल्याने डोंबिवलीतील जुनेजाणते शिवसैनिक त्यावेळी नाराज होते. राऊत यांचा पाठिंबा असल्याने उघडपणे कोणीही याविषयी चकार शब्द काढत नव्हते.

डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून भाऊ चौधरी यांनी पदभार सांभाळला होता. या कालावधीत विधायक कामे करण्यापेक्षा सवतासुभा पध्दतीने कामे करण्याची त्यांची पध्दत असल्याने निष्ठावान शिवैसनिक मध्यवर्ति शाखेपासून दुरावले होते. राऊत आणि थेट मातोश्रीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असा भाऊंचा अविर्भाव असल्याने त्यांच्या वाटेला कोणत्याही शिवसैनिकाने कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे आता शिवसैनिक उघडपणे बोलतात.

शहरप्रमुख असताना संघटनापेक्षा गटतटाचे राजकारण अधिक तयार झाले होते. कोणतेही विधायक कार्यक्रम त्या काळात शहरप्रमुख त्यांनी राबविले नाहीत. गॅस पुरवठादार व्यावसायिक म्हणून भाऊंची ओळख आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची ‘मॉडर्न गॅस’ कंपनी आहे. कोरोना महासाथीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे म्हणून स्थापन समितीत भाऊ चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता. नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने जिल्ह्याला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या कामात भाऊंनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. कोरोना काळात नाशिकमधील शेतकऱ्यांची औषध फवारणी यंत्र कल्याण, डोंबिवलीत आणून शहर स्वच्छतेत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. स्वच्छतेचा नाशिक पॅटर्न म्हणून हा उपक्रम प्रसिध्द झाला होता.

रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी शिवसेनेविषयी काही वाद्ग्रस्त वक्तव्य केले होेते. त्यावेळी दानवे यांचा निषेध करण्यासाठी भाऊ चौधरी यांनी दानवे यांच्या प्रतिमेची गा‌ढवावरुन धिंड काढली होती. त्याचा राग आल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि आता शिंदे गटातील महेश पाटील यांनी भाऊ चौधरी यांना त्यांच्या गोग्रासवाडीतील घराजवळ गाठून भाऊंच्या तोंडाला काळे फासले होते. यावेळी प्रतिकार करण्याऐवजी काळे फासताना भाऊ चौधरी हसत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाले होते. त्याचीच चर्चा सर्वत्र त्यावेळी सुरू होती. या प्रकाराविषयी शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील निवडणुकीत ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक पदाचे उमेदवार होते. दांडगा जनसंपर्क नसल्याने ते पराभूत झाले होते. डोंबिवलीत शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक यांच्याशी त्यांचे सख्य नव्हते. नेते संजय राऊत भाऊंच्या पाठीशी असल्याने कोणी कधी भाऊंशी पंगा घेण्याचा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

नाशिकमध्ये नाराजी

नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख असतानाही स्थानिक खासदार, आमदार, पदाधिकारी चौधरी यांच्या कामकाज पध्दतीमुळे नाराज होते. स्थानिक पातळीवर भाऊंचे कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सूत जुळत नसल्याने त्यांना नाशिकमध्ये पदाची सोय करुन देण्यात आली होती. अशी चर्चा होती.

आर्थिक कोंडीमुळे शिंदे गटात उडी

ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका, इतर शासकीय विभागात भाऊ चौधरी निविदा प्रक्रियेतील स्पर्धेतून कामे घेत होते. बहुतांशी कामे वरिष्ठांच्या आशीर्वादाने भाऊंना मिळत होती. या कामांची देयके भाऊंचे वरपर्यंत असणाऱ्या संपर्कामुळे झटपट मिळत होती. शिवसेनेत फूट पडुनही भाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. कामे आमच्यामुळे (शिंदे गट) मिळाली आणि सोबत (ठाकरे गट) त्यांना देता. त्यामुळे शिंदे गटाकडून भाऊंची महापालिकांमधील कामे, देयकांबाबत कोंडी करण्यास सुरुवात झाली होती. तो त्रास वाढू लागल्यामुळे भाऊ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच उध्दव ठाकरे यांनी भाऊंची हकालपट्टी केली असल्याचे समजते. भाऊंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. भाऊ तिकडे गेल्यामुळे आम्हाला काही फरक डोंबिवलीत पडणार नाही असे शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.