Home Blog Page 59

योग गुरू रामदेव बाबा यांच्या ‘पंतजली’ कंपनीला मोठा धक्का; कंपनीला टाकले काळ्या यादीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील योगगुरू रामदेव बाबा यांनी निरोगी राहण्यासाठी बनविलेल्या औषध कंपनी असलेली पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या ‘दिव्य फार्मसी’ला मोठा धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’ला नेपाळने काळ्या यादीत टाकले आहे. केवळ ‘दिव्य फार्मसी’ विरोधातच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरोधातही हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.

नेपाळच्या ‘ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी’च्या या निर्णयानंतर नेपाळमध्ये पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठं संकट उभं राहिलं आहे. ‘दिव्य फार्मसी’ सोबतच नेपाळमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या १६ भारतीय औषध कंपन्यांसमोरही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पतंजलीसह सर्व १६ भारतीय औषध कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) औषध निर्मिती मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्या. नेपाळमध्ये या औषधांचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक एजंटला कडक सूचना देत औषध प्रशासन विभागाने १८ डिसेंबर रोजी नोटीस बजावली आहे. त्यांना या कंपन्यांची सर्व उत्पादने तातडीने मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. विभागाने जारी केलेल्या नोटिसीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी तयार केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची यादी नेपाळमध्ये जाहीर करण्यात आली आहे. ज्या कंपन्या डब्ल्युएचओच्या मानकांचे पालन करते, त्यांनाच नेपाळमध्ये औषधे विकण्याची परवानगी आहे.

काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ‘दिव्य फार्मसी’ शिवाय रेडिएंट पॅरेंटर्स लिमिटेड, मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, अलायन्स बायोटेक, कॅप्टॅब बायोटेक, अॅग्लोमेड लिमिटेड, जी लॅबोरेटरीज, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा, युनिझुल्स लाइफ सायन्सेस, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद लाइफ सायन्सेस, आयपीसीए लॅबोरेटरीज, कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स आणि मॅक्चर लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

 

अंबरनाथ एमआयडीसी येथील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीतील नेलेस (वॉलमेट) कंपनीत पाईपलाईन कंट्रोलसाठी वापरले जाणारे प्रेशर कंट्रोल वॉल तयार केले जातात. या कंपनीत २८ वर्षीय श्रीकांत सुरेश कदम हा कर्मचारी काम करत होता. आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास श्रीकांत हा कंपनीत काम करत असताना प्रेशर कंट्रोल वॉलमध्ये हवा भरून त्याची चाचणी केली जात असताना अचानक हा वॉल फुटला आणि त्याचं झाकण श्रीकांतच्या अंगावर उडालं. या दुर्घटनेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला, तर अन्य दोन कामगारही जखमी झाले. या तिघांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे श्रीकांत याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. यातील मयत श्रीकांत कदम याला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

 

महाराष्ट्र नक्षलवाद्यांना घाबरून थांबणार नाही – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गडचिरोली येथील सूरजागड प्रकल्पाचे काम बिलकुल थांबू दिले जाणार नाही, स्थानिकांना तिथे मोठा रोजगार दिला आहे, आता नक्षलवादी दलामध्ये स्थानिक लोक नाहीत, त्यांना अन्य राज्यातून लोक आणावे लागत आहे, स्थानिक युवकांना आता रोजगार मिळतो आहे यामुळे नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात ठामपणे सांगितले.

आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना आलेल्या धमकीची गंभीर नोंद शासनाने घेतली आहे. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
सुरजागड प्रकल्प या भागातील विकासाला एक नवा आयाम देणारा प्रकल्प आहे. आणखी २०,००० कोटींची गुंतवणूक तेथे होत आहे. आता जनतेचे सुद्धा त्याला समर्थन मिळत आहे असे फडणवीस म्हणाले.

साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर शासकीय मालमत्ता यांना शासन कर्ज हमी देते, त्या बुडीत गेल्यानंतर अशा कारखान्यांच्या मालमत्ता विकत घेताना खासगी लोकांना फायदा होतो, आता राज्य सरकारची मालमत्ता कंपनी यावर नियंत्रण ठेवेल, त्यामुळे शासनाचे होणारे नुकसान टाळता येईल, रिझर्व्ह बँकेची परवानगी या कंपनीला मिळण्यासाठी अकासमिक्ता निधी दिला आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला, सर्व प्रकारच्या मालमत्ता धारक शासकीय संबधित कंपनी यात समाविष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा खुलासा मागितला होता.

 

सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथे सुरू झाले , वंदे मातरम् ने दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुरुवातीलाच केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली , त्यांना कोणता अधिकार असा सवाल करीत पवार यांनी ही दडपशाही खपवून घेऊ नये, अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंद घेत त्यांना खाली बसण्यास सांगितले त्यावर विरोधक आक्रमक झाले होते.

देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्या मागणीवर एक बैठक घेतली हे पहिल्यांदाच घडले, आम्ही ठोस भूमिका घेतली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. क्रियेला प्रतिक्रिया होईल याची समज आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिली , गृहमंत्र्यांनीही त्यांना योग्य समज दिली आहे, माध्यमांसमोर गृहमंत्री अमित शहा यांनी हे स्पष्ट केलं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. या विषयावर राजकारण करू नये, हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

आम्ही जत तालुक्यातील ४८ गावांसाठी दोन हजार कोटींची योजना मंजूर केली आहे. सीमा वादावर आम्ही कारावास भोगला तेव्हा बोलणारे कुठे होते असा सवाल त्यांनी केला, सीमावसियांच्या योजना ठाकरे सरकारने बंद केल्या होत्या, त्या आम्ही पुन्हा सुरू केल्या असे मुख्यमंत्री म्हणाले.

या योजनेचा लाभ घ्या आणि २ कोटी आणि त्याहून अधिक मर्यादेपर्यंतच्या कर्जावर वार्षिक ३% व्याज सवलत मिळवा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कृषी क्षेत्राचा विचार केला तर देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ८१ टक्के असून ८३ टक्के क्षेत्र कोरडे असल्याने हवामानातील बदल तसेच बाजारातील शेतमालाच्या विक्री किमतीतील चढ-उतार यांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो.

कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, नवी दिल्ली, भारत सरकार द्वारे कृषी उत्पादनांचे कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा योजना २०२०-२१ ते २०३२-३३ या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे ?

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच पणन सहकारी संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था इत्यादींना या योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये, मार्केटिंगच्या मूलभूत सुविधांचा विकास करणे, ज्या आवश्यक आहेत, शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात थेट विक्री करण्याची परवानगी देते आणि आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होते.

या योजनेचे स्वरूप काय आहे ?

या वित्तपुरवठा योजनेद्वारे २ कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंतच्या कोणत्याही कर्जावर सात वर्षांपर्यंत वार्षिक तीन टक्के व्याज सवलत उपलब्ध आहे. हे कोणत्याही पात्र कर्जदारासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योजक योजनेच्या क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट अंतर्गत २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वित्तपुरवठा सुविधेतून क्रेडिट गॅरंटी कव्हर प्रदान करेल. त्यासाठी लागणारे शुल्क सरकार भरते.

यासाठी कोणते प्रकल्प पात्र आहेत ?

योजनेद्वारे प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रिया उद्योगांना लाभ दिला जातो. म्हणजेच पीक काढणीनंतरचे व्यवस्थापन जसे की मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदामे तसेच पॅक हाऊस, मुरघा संग्रह केंद्रे, वर्गीकरण आणि वर्गीकरण घरे, शीतगृहे तसेच पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, राईपनिंग चेंबर्स आणि सामूहिक शेतीसाठी आवश्यक असलेले इतर फायदेशीर प्रकल्प. या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

योजनेसाठी पात्र लाभार्थी

या योजनेद्वारे प्राथमिक कृषी पतसंस्था, पणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था तसेच बचत गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी-उद्योजक, स्टार्टअप यांना लाभ दिला जातो. केंद्र आणि राज्य संस्था किंवा स्थानिक संस्थांद्वारे प्रायोजित कृषी आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांचे क्षेत्र समाविष्ट आहेत.