Home Blog Page 63

उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करायची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. मराठा युवा सेनेनंतर आता विश्व वारकरी सेनेने ही मागणी केली आहे. सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ ‘विश्व वारकरी सेने’ने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

‘विश्व वारकरी सेने’चे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी पश्चिम बंगालच्या गंगा सागर येथील समुद्र किनारी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ दिली आहे. आगामी काळात राज्यातील वारकरी देखील अशी शपथ घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात सुषमा अंधारे व वारकरी संघटना यांच्यात नवीन संघर्ष बघायला मिळू शकतो.

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी याआधी मराठा युवा सेनेने देखील केली आहे. अंधारे यांचं हिंदुत्व खोटं आहे. त्यांची हक्कालपट्टी न केल्यास शिवसेना भवनासमोर महाआरती करणार असल्याचा इशारा ‘मराठा युवा सेने’ने दिला आहे.

 

‘सिल्व्हर ओक’ वर शरद पवार यांना फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने गुन्हा दाखल होत पक्षात खळबळ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.

पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गांवदेवी पोलीसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.

 

“शिंदे गटाला वेळ देण्यासाठी निवडणूक आयोगानं तारीख पुढे ढकलली”; अरविंद सावंतांचा गंभीर आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरी शिवसेना आमचीच असून ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावं, अशी मागणी दोन्ही गटाकडून केला जात आहे. हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं आहे.

खरी शिवसेना कुणाची ? याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने २३ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. ठाकरे गटाकडून जवळपास २० लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत. शिंदे गटाकडून मात्र किती प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत, याबाबतची स्पष्टता नाहीये. एकंदरीत अशी स्थिती असताना निवडणूक आयागाने प्रतिज्ञापत्रे जमा करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाला आणखी वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोगाने ही तारीख पुढे ढकलली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. ते नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्राची संख्या मोठी आहे. हा आकडा २० लाखांच्या आसपास आहे. पण निवडणूक आयोग आता पळवाट काढत आहे. निवडणूक आयोगाने २३ डिसेंबर शेवटची तारीख दिली होती. पण ही तारीख पुढे ढकलण्याचं कारण काय होतं ? हे मला कळलं नाही. शिंदे गटाला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या संस्था बरबटल्या आहेत. महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार बसलं आहे, त्याच्यावर अजूनही निर्णय दिला जात नाही. ही बाब गंभीर असून लोकशाहीसाठी धोकादायक आहे. केवळ निर्णय पुढे ढकलायचं काम सुरू आहे. कारण त्यांना नकार देता येत नाहीये आणि होकार कसा देणार ? अशी अडचण निर्माण झाली आहे. हे सगळं राजकीयदृष्ट्या सुरू आहे. उद्दिष्ट आणि कर्तव्यापासून या संस्था भरकटल्या आहेत” अशी टीकाही अरविंद सावंतांनी केली आहे.

 

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, येत्या तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस !..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशावर ‘मंदौस’ चक्रीवादळाचं संकट घोघावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात ‘मंदौस’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

आधीच आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसचं झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रविवारी मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूवर दिसून आला होता. आता या वादळाची दिशा बदलून नैऋत्य झाली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राकडे येणार नाही. तरी सुद्धा राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सकाळपर्यंत मंदौस वादळ आणखी कमजोर होणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ नवाब मलिकांनाही जामीन मिळणार? मुंबई हायकोर्टात आज तातडीने सुनावणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मलिक यांचा जामीन फेटाळला होता. या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज जामीन मिळणार की त्यांना तुरूंगातच राहावे लागणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती.

विशेष न्यायालयात नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिक यांच्या वतीने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी जामीन मिळाला. कथित १०० कोटी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने देशमुखांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढच्याच क्षणी कोर्टाने त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली कारण, सीबीआयने या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांनी सुद्धा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर आज तातडीने सुनावणी होणार असून देशमुखांपाठपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळतो का ? की त्यांना तुरुंगातच रहावे लागते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.