Home Blog Page 64

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांचं युतीबाबत मोठ विधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इंदु मिल’च्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभं करण्यात यावं यासाठी मागणी केली होती मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी इंदू मिलमध्ये पुतळा बसवण्याची मागणी केली, त्याच विषयावर आज चर्चा झाली.

आता पुतळ्यासोबत म्युझियम देखील उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. त्याच विषयावर रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा झाली. येवढंच या बैठकीत झालं बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. तर त्यांनी शिवसेने सोबतच्या युतीवर भाष्य केलं ते म्हणाले, “काँग्रसवाल्यांनी आम्हाला वापरायचं तेवढं वापरलं, तरीही आम्ही कधीही भाजप सोबत जाण्याचा विचार केला नाही. सेने सोबतच्या युतीवर ऑफर आम्ही त्यांना दिली होती मात्र त्यांच्या समोर एक अट ठेवली होती की, तुम्ही भाजपची साथ सोडा परंतु सेना त्यावेळी साथ सोडायला तयार नव्हती. मात्र आता युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे.” त्यामुळे आजूनही ठाकरे-आंबेडकर ऐकत्र येतील की नाही हे अजून तरी स्पष्ट झालं नाही.

 

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी लावण्यात आलेले ३०७ कलम काढले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११ पोलीसांवर निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबित पोलीसांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात त्यांचावर लावण्यात आलेले ३०७ हे कलम काढून टाकण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, संघटनांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता या पोलिसांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे. यात तीन पोलिस अधिकारी व आठ पोलीसांचा समावेश आहे. या प्रकरणात ३०७ हे कलम काढून टाकले आहे.

 

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची एक संयुक्त समिती तयार करुन त्यामध्ये चर्चा करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. तसेच हा वाद न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर दावा करु नये असे निर्देश अमित शाह यांनी दिले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या सांगलीतील आणि सोलापुरातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळाले होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं. संसदेच्या इमारतीत जवळपास २५ मिनीटे ही बैठक झाली. त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले.

 

‘आरबीआय’कडून रेपो दरात वाढीची घोषणा; कर्जे पुन्हा महागण्याची चिन्हे !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय बँक म्हणून ओळखली जाणारी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ देशातील सर्व बँकांना व्यवसायाचा परवाना तर देतेच शिवाय परवाना काढून घेण्याचे अधिकार देखील या बँकेकडे आहेत. रिझर्व्ह बँकेकडे बँकिंग व्यवसायाचे नियमन करण्याचे अधिकार असल्याने वेळोवेळी पतधोरण ठरवण्यात या बँकेची भूमिका महत्वपूर्ण ठरते. नुकत्याच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे रेपो दरात वाढ होणार आहे, त्यामुळे विविध बँकेकडून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना याचा फटका बसण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

‘रेपो रेट’ म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांना कर्ज उपलब्ध केल्या जाते त्यावर आकारण्यात येणारे व्याज दर असतात त्यामुळे हे दर स्वस्त असेल तर देशातील बँक देखील ग्राहकांना स्वस्तात विविध कर्जे उपलब्ध करून देतात. मात्र जर ‘रेपो रेट’ महागला तर इतर बँका देखील व्याजदर वाढवितात त्याचा नेमका फटका कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसतो. अशीच काहीशी स्थिती आता निर्माण होणार आहे. यापूर्वी देखील रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. यंदा रिझर्व्ह बँकेकडून अनेकदा रेपो दरात वाढ केल्या जात आहे, ही परिस्थिती कर्जदारांवरील कर्जाचा बोजा वाढविणारी ठरणार आहे.

सध्या जागतिक मंदीचे सावट असताना देशांतर्गत महागाईला नियंत्रण लागणे आवश्यक आहे, मात्र मंदीचा परिणाम भारतावर होणार नसल्याचे आशादायी चित्र निर्माण करत अशाप्रकारे रेपो दराच्या वाढीचा काय अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम येत्या काळात होणार का ? हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे. भारतासारख्या देशात जिथे कष्टकरी वर्ग स्वप्ने साकारण्यासाठी बँकेकडून कर्जे घेतात त्यांना यामुळे अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल, हे देखील तितकेच सत्य आहे, हा नियम मध्यमवर्गीयांना देखील तितकाच लागू होतो.

 

राजभवनातील त्या ‘मॉडेल’ सोबत फोटोमुळे राज्यपाल पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि वाद यांचे जणू अतूट नाते असल्याची स्थिती आहे, आजवर वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले राज्यपाल आता एका नव्या प्रकरणाने लक्ष्य बनण्याची लक्षणे दिसून येत आहे. प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन मालिका ‘भाग्य लक्ष्मी’ फेम मायरा मिश्रा हिचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत राजभवनात काढण्यात आलेले फोटो खुद्द मॉडेलने ट्विटर अकाउंट वर शेअर केल्याने नव्याने वाद उफाळून आला आहे.

मायरा मिश्रा हिने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती यावेळी खुर्चीवर बसून तसेच राजभवन परिसरात विविध जागी तिने राज्यपालांसोबत फोटो काढले होते, हे सर्व फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने मनसेने यावर संतप्त प्रतिक्रिया देत आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी या फोटोंना शेअर करत ट्विटर पोस्ट द्वारे खडेबोल सुनावले आहे, ही बाई राजभवनात काय करत आहे ? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही असा प्रश्न मनसे नेत्याकडून उपस्थित केला गेला आहे.

दरम्यान हे ट्विट अधिक लोकांपर्यंत वेगाने पोहचत असल्याने अगोदरच शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यपालांविरोधात राज्याचे वातावरण तापले असताना त्यात नव्याने एका नव्या वादाची भर पडणार आहे. मनसेनंतर इतर काही विरोधी पक्ष राज्यपालांवर प्रश्नांची सरबत्ती करण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच कुठल्या ना कुठल्या मुद्द्याने आजवर राज्यपाल वादाचे कारण बनले आहे, मात्र यावेळी एका वेगळ्याच प्रकरणाने विरोधाचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.